अ‍ॅम्बुलन्स व्दारा गाय तस्करी

अ‍ॅम्बुलन्स व्दारा गाय तस्करी

दैनिक पोलीस शोध
संपादकीय
दि. 18/1/2024


व्हँव.. व्हँव.. करत जाणार्‍या अ‍ॅम्बुलन्स
सुद्धा पोलीसांनी तपासून सोडाव्यात !


या राज्यात अवैध व्यवसाय करणारे काय शक्कल लढवतील याचा भरवसा नाही. असे अनेक किस्से जेव्हा समोर येतात तेव्हा मेंदूला झिणझिण्या आल्याशिवाय राहत नाही. असाच एक किस्सा काल शिरपूर पोलीसांनी उजेडात आणला. एका रूग्णवाहिकेतून गोवंशाची तस्करी हा फंडा निश्चितपणे धक्का देणारा असून पोलीस प्रशासनासाठी आव्हान देणारा आहे.

राज्य सरकारने राज्यातील गोशाळा चालकांच्या समस्या, त्यांच्या संचलनात येणार्‍या अडचणी यावर उपाय योजना करण्यासाठी गोसेवा आयोगाची स्थापना केली आहे. आणि या गोसेवा आयोगाचे अध्यक्षांची व संचालक मंडळाची सुद्धा नियुक्ती आहे, हा अतिशय चांगला निर्णय आहे. विशेष म्हणजे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष ज्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे ते शेखर मुंदडा 13 व 14 जानेवारी रोजी दोन दिवस धुळे जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते.

विविध गोशाळा चालकांनी त्यांची भेट घेवून गोशाळा चालकांच्या समस्या त्यांना सांगितल्या, विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना निवेदने दिली आणि सविस्तरपणे चर्चा देखील केली. कारण या देशात गोवंश वाचेल तर शेती वाचले आणि शेती वाचली तरच शेतकरी सुद्धा वाचेल आणि शेतकरी वाचला तरच या देशाला चांगले अन्न-धान्य मिळू शकेल. म्हणून हे चक्र जे प्राचिन काळापासून सुरू आहे ते रासायनिक खते, पेस्टिसाईडस्च्या अतिरेक वापरामुळे संपण्याच्या मार्गावर आहे. म्हणून घराघरात कर्करोगाचे रूग्ण आढळत आहेत, सामाजिक स्वास्थ धोक्यात आले आहे, शेतीची उत्पादक क्षमता संपत चालली आहे, शेती बंजर होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करते आहे. परंतू या बाबी सरकार लक्षात घ्यायला तयार नाही.

शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते विकणारे विक्रेते लक्षात घ्यायला तयार नाहीत. आणि अतिरिक्त उत्पादनाच्या नादात शेतकरी सुद्धा ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. परंतू दोन गायी पाळा आणि पाच एकर शेती सेंद्रीय पद्धतीने करा असे पोटतिडकीने सांगणारे राजीव दिक्षीत या देशात होवून गेले त्याची दखल घ्यायला कुणाजवळही वेळ नाही. या देशातील गोवंश वाचला पाहिजे, शेतकर्‍यांना परवडत नसेल तरी त्यांनी दोन पाच जनावरे पाळली पाहिजे, सेंद्रीय शेतीसाठी सरकारने शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, परंतू असे होतांना दिसत नाही. उलट सरकार रासायनिक खतांसाठी सबसीडी देते आणि शेणखतासाठी कोणत्याही प्रकारची साधी जाहिरात देखील करत नाही, म्हणून शेतकर्‍यांनीच आता स्वतःहून सेंद्रीय शेतीकडे वळण्याची आवश्यकता आहे.

परंतू या राज्यात ज्या पद्धतीने गोवंशाची तस्करी सुरू आहे ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर होते आहे की, मुसलमान समाजासह हिंदू लोकांचा सुद्धा त्यात समावेश आहे. गोमांस निर्यातीत देशातील किती लोकांचा समावेश आहे, त्यात किती हिंदू आहेत, किती मुसलमान आहेत यांची नावे बाहेर काढा, मेंदूला झिणझिण्या आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून राम मंदिराची निर्मिती, त्याचे भव्य उद्घाटन, त्याचा देशभर गवगवा हा आमच्यासाठी सुद्धा आनंदाचा विषय आहे.

परंतू या देशात 2014 पासून एकही गाय कापली जाणार नाही याचा कायदा सरकार करू शकले नाही, हे भक्तांनी सुद्धा लक्षात घेण्यासारखे आहे. आम्ही हिंदू, मुसलमान, शिख, इसाई हा भेद मानत नाहीत. सर्वधर्मसमभावाचे आम्ही पुरस्कर्ते आहेत. परंतू लिखाणाच्या निमित्ताने आम्ही जातीवाचक लिहितो आहोत हे मान्य केले तरी या देशात एकही गाय कापली जाणार नाही आणि ती मरेपर्यंत जर शेतकरी त्यावर खर्च करू शकत नसेल तर सरकार त्यासाठी अनुदान देईल अशा योजना राबविण्यास काय हरकत आहे? ज्यांना गुरांचे मांस खायचे आहे, त्यांचेसाठी भाकळ म्हशी, भाकळ बैल आहेत.

परंतू त्यावर बोलायला, निर्णय घ्यायला कुणीही तयार नाही. राज्यात अधिकृत कत्तलखाने किती, अनधिकृत कत्तलखाने किती यांची संख्या तपासून पहा. लक्षात येईल की अनधिकृत कत्तलखान्यांची संख्या ही 80 टक्के आहे. आता तर गल्ली बोळात तरण्याबांड गायी कापल्या जात आहेत. आणि यासाठी वेगवेगळे फंडे वापरण्यात येत आहेत. जुन्या टाटासुमो सारख्या गाड्या खरेदी करायच्या त्या गाडीतली सर्व बैठक व्यवस्था काढून टाकायची आणि गाडीला काळा काच असल्याने आत काय आहे हे बाहेरून कुणाच्याही लक्षात येत नाही. परंतू अशा या गाड्यांमध्ये अतिशय क्रूर आणि निर्दयीपणे 3 गायींना कोंबलेले असते, छोटा हत्ती सारख्या गाड्यांमध्ये सुद्धा अतिशय निर्दयीपणे जनावंराना कोंबून त्यांची अवैधपणे कत्तलखान्याकडे वाहतूक केली जाते. आणि भरधाव वेगाने अशा गाड्या सर्वांसमोर निघून जातात, विशेष म्हणजे यातील तरण्याबांड गायी, वासरे, गोर्‍हे हे शेतकर्‍यांच्या खळ्यातून, मळ्यातून चोरी केलेले असतात. 407 सारख्या वाहनातून 20 ते 25 जनावरे बेदरकारपणे कोंबून जेव्हा वाहून नेली जातात तेव्हा वाहतूकीतच काही जनावरांचो मृत्यू झालेला असतो असे अनेक वेळा जप्त केलेल्या वाहनांमधून निदर्शनास आले आहे.

या सर्व प्रकारासोबत काल शिरपूर पोलीसांनी मध्यप्रदेशातील सेंधव्याहून 10 चांगल्या गायी कोंबून जी गाडी हाडाखेड चेकपोस्टवर पकडली ती दुसरी-तीसरी कोणतीही गाडी नव्हती तर ती रूग्णांना वाहून नेणारी चक्क अ‍ॅम्बुलन्स होती, जीला मराठी भाषेत रूग्णवाहिका आपण म्हणतो. या रूग्णवाहिकेत अत्यंत निर्दयीपणे 10 मोठ्या धष्टपूष्ट गायी कोंबलेल्या आढळल्या.

सेंधव्याहून मालेगावच्या दिशेने निघालेली ही एमपी-09-बीए-981 क्रमांकााची रूग्णवाहिका चक्क अवैधपणे गोवंश वाहून नेत होती आणि तशा प्रकारची गुप्त माहिती शिरपूर पोलीसांना कळाली असल्याने त्यांनी सापळा रचून हाडाखेड चेकपोस्टवर ही रूग्णवाहिका पकडली. आणि त्यातील 10 गोवंश जप्त केले. या रूग्णवाहिकेच्या चालकासह अन्य दोघांना देखील अटक करण्यात आली.

प्रश्न असा आहे की, आजारी माणसांना, मृतदेहांना, इमर्जन्सी रूग्णांना वाहून नेणार्‍या या अ‍ॅम्बुलन्स जेंव्हा व्हॅव.. व्हँव.. करत रस्त्याने जातात तेव्हा रस्त्यावंरी सर्व वाहन चालक बाजूला होत त्यांना जाण्यासाठी प्राधान्यक्रमाने मार्ग करून देतात. टोलनाक्यावर सुद्धा त्यांना शिघ्रगतीने सोडण्यात येते. कारण मानवी संवेदना त्यासोबत जुडलेल्या असतात. परंतू आता रूग्णवाहिकेतून जर अवैध गोवंश वाहतूक होत असेल तर पोलीसांनी या रूग्णवाहिका सुद्धा दोन मिनीटे थांबवून तपासून पहाव्यात आणि मग सोडाव्यात अशी परिस्थिती यातून निर्माण झाली आहे. रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी एक-एक क्षम महत्वाचा असतांना आता या हरामखोरांनी अशा प्रकारचे फंडे वापरणे म्हणजे त्यांना फासावर लटकविण्यासारखे आहे.

राज्य सरकारने यावर कड निर्बंध लादून अशा प्रकरणांसाठी कठोर कायद्यांची तरतूद करावी असे आम्ही या निमित्ताने सांगू ईच्छीतो. अन्यथा विश्वास कुणावर ठेवावा असा प्रश्न निर्माण होईल म्हणून या विषयावर पोलीस प्रशासन, गोरक्षक, आरटीओ आणि सरकार यांनी मिळून निर्णय घेण्याची गरज आहे.

तुर्तास एव्हढेच…

Leave a Comment