आग्रारोड हॉकर्स समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढा

आग्रारोड हॉकर्स समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढा

दैनिक पोलीस शोध
संपादकीय…
दि. 6/1/2024

आग्रारोड हॉकर्स समस्येवर
कायम स्वरूपी तोडगा काढा !

आपले शहर सुंदर कसे ठेवता येईल यासाठी हॉकर्सनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. तर हॉकर्स प्रश्नावर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केवळ वोट बँकेचा विचार न करता शहराचा आणि शहरवासियांचा देखील विचार करावा पायी चालतांना सुद्धा आता आग्रा रोडवर जागा मिळत नाही. त्यामुळे या प्रश्नावर सर्वसमावेशक कायम स्वरूपी मनपा प्रशासनाने मार्ग काढावा, यातच सर्वांचे हित सामावले आले.

शहरातील अतिशय गंभीर बनलेल्या हॉकर्स व पथारीवाल्यांच्या समस्येवर सत्ताधारी पक्ष कधीही तोडगा काढू शकत नाही. मग सत्ता कोणत्याही पक्षाची असो. कारण या प्रश्नाचे मुळ हे वोट बँकेत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा यावर मागील पाच वर्षात तोडगा काढू शकले नाहीत. आता महापालिकेवर प्रशासक आहे. त्यामुळे आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी देवपूर मधील नगावबारी उड्डाणपूलापासून ते पांझरा नदीवरील मोठा पुलापर्यंतच्या हॉकर्सना, पथारी वाल्यांना दि. 3 जानेवारी पासून पांझरा नदी काठावरील मोठा पूल ते हत्ती डोहापर्यंत एका रांगेत बसावे असे आदेश काढले आहेत. तर शहर पेठ भागातील आग्रा रोडवरील गांधी पूतळा ते दसेरा मैदान येथील हॉकर्स व पथारी वाल्यांना पांझरा नदी काठावरील अग्रवाल विश्राम भवन ते साक्री रोडवरील समता पूलापर्यंत बसावे असा आदेश काढला आहे. परंतू दिलेले पर्याय अमान्य करत हॉकर्स बांधवांनी या व्यतिरिक्त दूसरे पर्याय मागितले आहेत. अर्थात दिलेले पर्याय हे अतिशय उत्तम असून खरेदीदारांसाठी सुद्धा अनुकूल आहेत. परंतू यावर गांभिर्याने विचार करून दिलेले पर्याय स्विकारण्याची मानसिकता तयार करण्याची आवश्यकता आहे. एकदा एखादी नवी जागा पर्याय म्हणून दिली तर ती ‘रेग्यूलाईज’ (नियमित) होते. त्याला आठ-पंधरा दिवस नियमित होण्यासाठी लागतील परंतू ती कायमस्वरूपी पर्यायी जागा म्हणून खरेदीदार सुद्धा स्विकारतात आणि मोठ्या महानगरांप्रमाणे या ठिकाणी भाजी बाजार भरतो ही मानसिकात तयार होईल. त्यामुळे राजकीय पदाधिकार्‍यांनी सुद्धा हॉकर्स आणि पथारीवाल्यांना समजून सांगण्याची गरज आहे. अर्थात आग्रारोड महापालिकेच्या अखत्यारीत येत नाही. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग जेव्हा अतिक्रमण काढतो तेव्हा ते कुणाचेही ऐकून घेत नाही. त्यामुळे मनपा समोर ढोल वाजविण्यापेक्षा चांगला पर्याय आहे तो दिलेल्या जागा स्विकारण्याचा. आग्रा रोडवर थांबण्याची आणि नागरीकांना चालण्यासाठी सुद्धा जागा न ठेवण्याची मानसिकता आता बदलली पाहिजे. ज्या पद्धतीने हॉकर्स या रोडवर आपल्या मनमानी पद्धतीने चालतात ती एकदम चूकीची पद्धत आहे. परंतू बोलत कुणीही नाही. ट्रॉफिक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात. एका गाडी समोर तीन लोट गाड्या लावून संपूर्ण रस्ता अडवला जातो. आणि तरीही हॉकर्सच्या आठमुठे पणाने वागल्याचे समर्थन कुणी करत असेल तर ईश्वर त्यांचेवर दया करो, एव्हढेच म्हणता येईल. एक आदर्श शहर म्हणून या शहराकडे राजकीय नेत्यांनी पाहण्याची गरज आहे. पथारीवाले, हॉकर्स, रिक्षा चालक यांना शिस्तबद्ध पद्धतीने थांबे देण्याची योजना मनपा प्रशासने तयार करून ट्रॉफिक विभाग पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त कृतीतून नियोजन होण्याची आवश्यकता आहे. आणि यात अजून कुणाची आवश्यकता भासत असेल तर या शहरात सेवा निवृत्त बुद्धीमान अभियंता आहेत. त्यांची मदत देखील घेता येवू शकते. परंतू शहराचे विद्रुपीकरण थांबायला हवे. या शहरात हॉकर्सची अधिकृत नोंदणी होणे गरजेचे आहे. ठेला गाडी वाल्यांनी हजारो गाड्या तयार करून त्या भाड्याने दिल्या आहेत. आणि कुणीही उठतो व ती लोटगाडी भाड्याने घेवून कुठेही उभी करून व्यवसाय करतो त्यामुळे हॉकर्सची नोंदणी करून त्यांना क्रमांक देण्याची गरज आहे. परंतू सत्तेत असतांना कुणालाही चांगल्या गोष्टी करायला आवडत नाहीत. टक्केवारी आणि भागीदारीच्या नादात पाच वर्षात करोडपती कसे होता येईल याचे प्रयत्न मात्र सुरू असतात. परंतू हे शहर माझे शहर आहे हे नियोजनबद्ध असावे, सुंदर असावे, आखिव-रेखीव असावे असे कुणालाही वाटत नाही हे या शहराचे दुर्भाग्य म्हणाले लागेल. त्यामुळे आता प्रशासक आमिता दगडे पाटील यांनी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे तसेच जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची बैठक घेवून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि आग्रा रोडचा श्वास मोकळा करावा यामुळे नागरीकांना आनंद होईल.

तुर्तास एव्हढेच

Leave a Comment