उगवतीचे रंग
आकाशझुला या पुस्तकातून
कावळा आणि सदाफुली
परवा सकाळी बागेत सहज फिरत असताना मला एका झाडावर एक पक्षी बसलेला दिसला. मला वाटले तो भारद्वाज असावा म्हणून मी कौतुकाने त्याच्याकडे पाहू लागलो . प्रत्यक्षात तो एक कावळा होता. मग मी ” अरेच्या ! कावळा आहे का ? ” असे मनातल्या मनात म्हणून पुढे जाऊ लागलो . चालता चालता माझ्या मनात विचार आला की असे का व्हावे ? केवळ तो एक कावळा म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले हे बरोबर नाही. म्हणजे शेवटी आपणही रंगरूपालाच महत्व देतो. झगमगाटालाच महत्व देतो . कावळा निसर्गाचा एक महत्वाचा घटक आहे . तो निसर्गाच्या स्वच्छतेच्या चक्रातील स्वच्छतादूत आहे. पण त्याचे हे योगदान आपण कुठे लक्षात घेतो ?
लहान मुलांना आपण चिऊ आणि काऊची गोष्ट सांगतो . त्यातही चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं .मग मोठ्ठा पाऊस आला. चिमणीचं घर गेलं राहून आणि कावळ्याचं घर गेलं वाहून असं सांगतो.
म्हणजे अगदी लहानपणापासूनच चिमणी चांगली आणि कावळा म्हणजे वाईटच असे नाही का आपण अप्रत्यक्षपणे शिकवत ?
ज्ञानेश्वर माउलींनी कावळ्याला उद्देशून एक अभंग लिहिला आहे . त्यात तो कावळा येणाऱ्या परमेश्वराच्या भेटीचा शुभशकुन घेऊन येतो असे माउली म्हणतात . तो अभंग लता मंगेशकरांनी अतिशय सुंदर म्हटला आहे . आणि तो अभंग अर्थातच मला खूप आवडतो . आपणही तो ऐकला असेल . ” पैल तो गे काऊ कोकताहे … ” हा तो अभंग . अतिशय अर्थपूर्ण . त्याला संगीताची सुरेख साथ . ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात.
तर असा हा काऊ . पण आजकाल कावळ्यांची संख्या अतिशय कमी झाली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वाढत्या शहरीकरणामुळे असेल ,प्रदूषणामुळे असेल कावळे आता फारसे दिसतच नाहीत. बऱ्याच वेळा तर अगदी पिंडाला शिवायलाही कावळा मिळत नाही . मग गुरुजी दर्भाचा कावळा करायला सांगतात . ( उगवतीचे रंग विश्वास देशपांडे )
जी गोष्ट कावळ्याची तीच गोष्ट सदाफुलीची . सदाफुली हे बाराही महिने फुलं देणारं झाड. म्हणून त्याच नावच सदाफुली . सदा फुलांनी बहरलेलं . मन प्रसन्न करणारं . आकर्षक रंगरूप नाही ,सुवास नाही म्हणून काय झालं ? या गोष्टी त्याच्याजवळ नाहीत म्हणू त्याचं महत्व कमी होतं का ? मला तर सदाफुलीचं झाड साध्या माणसासारखं वाटतं . साधी माणसे कशी असतात ? प्रसिद्धीची हाव नसते. आपलं काम शांतपणे कोणताही गाजावाजा न करता ते करीत असतात . त्यांना कोणी चांगलं म्हणेल याची अपेक्षा नसते आणि वाईट म्हटले तरी पर्वा नसते. अगदी तशीच आहे माझी सदाफुली . माझ्या दाराच्यापुढे बारोमास फुलते. जेव्हा इतर कोणतीही फुलं नसतात तेव्हा सदाफुली हजर असते . मग मी देवपूजेलाही तीच फुले वापरतो. देव काही म्हणत नाही की मला सुगंधीच फुलं हवीत. जी उपलब्ध असतील ती भक्तिभावाने वाहा म्हणजे झालं . नाहीतरी गुरुजी सुद्धा पूजा सांगताना म्हणतातच ,”ऋतुकालोद्भवं पुष्पं समर्पयामि ..”
आपल्याही रोजच्या जीवनात अशा सामान्य वाटणाऱ्या पण आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी असतात . त्याही आपले जीवन समृद्ध करीत असतात. त्यांच्याकडे लक्ष देऊ या. त्यांचा आनंद घेऊ या.
© विश्वास देशपांडे ,चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी 9403749932