कर्माचे फळ भास्कर वाघ कसा धर्मभास्कर झाला

कर्माचे फळ भास्कर वाघ कसा धर्मभास्कर झाला

दैनिक पोलीस शोध संपादकीय

कर्माचे फळ !
गीतेत भगवान श्रीकृष्ण यांनी स्वतः सांगितले आहे की, आपल्या कर्मानेच माणूस सिद्धी प्राप्त करू शकतो, आणि सुख-दुःख, लाभ-हानी, यश-अपयश यासाठी सुद्धा माणसाचे कर्मच कारणीभूत असते. अर्थात भारतीय दर्शनशास्त्र आणि धर्मशास्त्रात सुद्धा मानव आपल्या विवेक बुद्धीनुसार केलेल्या कर्माचे फळे सुख-दुःखाचे कारण बनते. काही कर्माची फळे तात्काळ मिळतात तर काही कर्माच्या फळांसाठी काही काळ लागतो. मात्र आपल्या कर्माची फळे मिळतातच हे निश्चित.

गीता सार हा मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ आहे आणि याच गीतेत म्हटले आहे की,

‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’

चांगली कर्मे नेहमी आपल्या बरोबर राहणार असतात. त्याचे फळ ताबडतोबीने मिळाले नाही तरी ते मिळणारच असते. परंतू चुकीच्या कर्माची फळे तात्काळ मिळाली नाही म्हणून आनंदी होण्याचे कोणतेही कारण नसते. परंतू त्या कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागते. गीतेच्या कर्मयुगात कर्मफळाची माहिती आणि परिणाम विस्ताराने सांगितला आहे. कर्माला नेहमी नशिबाशी किंवा दैववादाशी जोडले जाते जे चुकीच आहे. धुम्रपान कर्माचं चांगल उदाहरण आहे. कारण जेव्हा आपण एक सिगारेट ओढतो तेव्हांच दुसरी सिगारेट ओढण्याची क्षमता निर्माण होते आणि आपण जस-जसे अधिक सिगारेट ओढू लागतो तस-तशी धुम्रपानाची सवय बळावत जाते. म्हणजे सवयीतून निर्माण होणारी प्रेरणा आणि त्यातून कर्करोग होण्याची शक्यता या आपल्या सवयीच्या परिणास्वरूप निर्माण होतात त्यालाच कर्माची फळे संबोधले जाते.

आपल्या सर्वच सवयींचा परिणाम हा अशा प्रकारे बळावत जात असतो.म्हणून आपल्या वर्तमानातील आणि भूतकाळातील कर्मवृत्तीमुळे आपल्याला भविष्यात काय अनुभवावे लागू शकतो याचा आपण अंदाज बांधू शकतो. परंतू त्यात ‘मोहा’ची लालसा बाधा ठरते. कर्म करतांना फळाची अपेक्षा केली तर आणि त्या कर्मात मोह असेल तर आपल्या कर्मात त्याची फळे दळलेली असतात, ती दिसत नसली तरी त्याचे प्रतिबिंब काही काळानंतर आपल्या दिसतन येते. परंतू हे आपल्या पूर्वकर्माचे फळ आहे. याची जाणीव आपल्याला होत नाही हे विशेष. म्हणजे प्रत्येक कर्माची फळे ठरलेली आहेत असा कर्माचा सिद्धांत आहे. कर्म फळाच्या या गीतेतील सिद्धांताचे विश्लेषणाची थोडक्यात मांडणी आम्ही या ठिकाणी यासाठी मांडली आहे की.

देशभर गाजलेला धुळे जिल्हा परिषदेतील अपहाराची एक बातमी

सर्व प्रसारमाध्यमातून प्रसारीत झाली आहे. आणि आमच्या समाजवादी मित्राला कर्मयोगातील ‘कर्मफळा’चा सिद्धां आठवला.

तथाकथीत धर्मभास्कर वाघ नावाची एक व्यक्ती धुळे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागात रोखपाल या पदावर कार्यरत होती. पांढरे स्वच्छ कपडे, माथ्यावर लालभडक रंगाचा टिळा, मध्यम बांधा, मीतभाषी व्यक्ती नव्वदच्या दशकात जिल्हाभर चर्चेत आली. या व्यक्तीच्या दिवसाची सुरूवात ही एकवीरा देवीच्या भव्य पुजाअर्चनाने सुरू व्हायची. जयहिंद सिनीयर कॉलेज समोरील ‘प्रभाम’ या बंगल्यासमोर सकाळपासूनच काही ठरावीक याचकांची गर्दी असायची. या बंगल्यातून येणारा फुलांचा आणि सुंगधीत अत्तराचा सुगंध हा रस्त्यावरील रहदारीला आकर्षीत करणारा असायचा.

विशेष म्हणजे धर्म भास्कर या व्यक्तीला देवी प्रसन्न असल्याची चर्चा हळूहळू सर्वदूर पसरू लागली. कारण ही व्यक्ती जेव्हा खिशात हात घालत असे तेव्हा खिश्यातून नेहमी करकरीत ‘प्रेसकट’ नोटा निघायच्या. चुकूनही एखादी जुनी नोट धर्म भास्कर वाघ यांच्या खिश्यातून निघत नसल्याने याचकांचा त्यावर विश्वास बसला होता. भास्कर या नावापूढे ‘धर्म’ या शब्दाला जोडून ‘धर्मभास्कर’ हे नामकरण करण्याचा सुद्धा एक स्वतंत्र अध्याय आहे. परंतू या नावानेच भास्कर वाघ या नावाचे उदात्तीकरण झाले. आणि तब्बल चाळीस वर्षानंतर देखील आजही या नावानेच भास्कर वाघ यांचे नावाचा उल्लेख केला जातो. म्हणजे नावात काय आहे ? असे सेक्सपियर म्हणून गेला असे म्हणून सुद्धा चालत नाही. नावातच जादू असते असे म्हणायला हरकत नाही. हळूहळू या नावाला ‘वलय’ प्राप्त होत गेलं. धर्मभास्कर वाघ म्हणजे एक ‘दैवीशक्ती’ असल्याचा प्रचार नावारूपास येवू लागला. स्थानिक पुढारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक अशा अनेक लोकांची गर्दी या दैवीशक्ती भोवती वाढू लागली. प्रत्येक व्यक्ती धर्मभास्कर यांच्या पायाला हात लावून नमस्कार करू लागली. काही काळानंतर प्रसार माध्यमातून दररोज या दैवीशक्तीची बातमी येवू लागली. जिल्हा परिषदेतील लघु सिंचन विभागाच्या भास्कर वाघ यांच्या कार्यालयातून देखील सुगंध दरवळू लागला. जिल्हा परिदेश्च्या तळमजल्यावरील पहिल्या पायरीवर पाय ठेवताच हा सुगंध येणार्‍या-जाणार्‍यांना मोहित करत असे. याच काळात राज्याचे एक मोठे नेते त्या काळी या प्रभाम बंगल्यावर आले आणि त्यांनी धर्मभास्कर यांच्या पाया पडल्याची चर्चा राज्यभर गाजली. 1974 ते 1989 या कालखंडात एकीकडे दैवीशक्तीचा चमत्कार आणि दुसर्‍या बाजूला हातावर मोजण्याइतके या चमत्काराच्या गोलमालात शामील असल्याचा आरोप करणारी प्रसारमाध्यमातील मोजकीच मंडळी होती.

जिल्ह्यात लोक दबक्या आवाजात चर्चा करायचे. कुणी दानशूर म्हणायचे, कुणी देवी प्रसन्न असल्याचे सांगायचे. परंतू सभ्य नागरीक यापासून लांब राहिले. शेवटी शंभर पापांचा घडा फुटला. मुख्यकार्यकारी अभियंत्याने धनादेशावर स्वाक्षरी केल्यानंतर त्यातील रकमेत वाढ करण्याचे कौशल्य भास्कर वाघ याने आत्मसात केले होते. आणि यातून जिल्हा परिषदेत पंधरा वर्षाच्या कालखंडात कोट्यावधींचा अपहार करण्यात आला. याचवेळी धुळे जिल्हा परिषदेत मनुकूमार श्रीवास्तव नावाची अत्यंत बुद्धीमान तरूण व्यक्ती मुख्यकार्यकारी अधिकारी या पदावर रूजू झाली आणि त्यांनी अतिशय सुक्ष्म पद्धतीने या गोष्टीचा छळा लावला. आणि ‘धर्मभास्कर’ या नावातील ‘दैवीशक्ती’ गुन्हेगारीत रूपांतरीत होवून 2 ऑगस्ट 1989 रोजी धर्मभास्कर वाघ यांचेसह अन्य सहकार्यांवर ज्ञात संपत्तीपेक्षा अधिक संपत्ती असल्याच्या निनावी तक्रारीवरून अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला. आणि जिल्हा न्यायालयातील इन कॅमेरा चौकशी, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा हा अपहार खटल्याचा प्रवास न्यायालयाच्या निर्णयासाठी फिरत राहिला.

दरम्यानच्या काळात मात्र भास्कर वाघ यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. अवघ्या 30 ते 35 वर्षाच्या कालखंडानंतर या घटनेचा निकाल हा धर्मभास्कर यांची कोट्यावधीची स्थावर मालमत्ता सरकार जमा करण्याचे आदेश गृह विभागाने मंजूर केले आहेत. अपहाराच्या 15 आणि अपसंपत्तीच्या 15 अशा एकूण 30 केसेस दाखल झाल्या असून त्यापैकी अपहाराच्या 5 तर अपसंपदेची एक केस अद्यापही न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणात एकूण 30 आरोपी असून त्यातून 15 मयत झालेत. प्रमुख आरोपी म्हणून भास्कर वाघ कारागृहात असून विविध खटल्यांमध्ये त्याला 112 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घटनेशी किंवा अपहाराशी ज्या मुलांचा दुरान्वये देखील संबंध नाही त्या भास्कर वाघ यांच्या मुलांना मात्र या घटनेचा सामाजिक, आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आहे. कर्म केले कुणी, परंतू त्याचे फळ मात्र फिरून पुन्हा आपल्या पर्यंत येते. या घटनांचे समाजात प्रबोधन व्हायला हवे असे आमच्या समाजवादी मित्राला वाटते. लाच मागून, अपहार करून, असवणूक करून, खोटे बोलून, भ्रष्टाचार करून गरजवंतांला व्याजाने पैसा देवून संपत्ती जमा करण्याचे फळ निश्चित स्वरूपात चांगले मिळत नाही.

तुम्हाल जे फळ अपेक्षित आहे ते तसच मिळण्यासाठी तुमचं ‘कर्म’ त्या फळाच्या कसोटीला खरे उतरेल इतकं व्यवस्थित असायला हवं. जस कर्म तस फळ मिळेलच. चांगल्या कर्माचे फळ उत्तमच असते आणि वाईट कर्माचे फळ भोगावेच लागते हा कमर्चा सिद्धांत आहे, यापासून सुटका नाहीच. दैनंदिन जीवनात आपल्या कर्माचे फळ निश्चित. गांधींजींच्या एकदाश व्रतामध्ये अस्तेय (चोरी करणे) एक व्रत आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, दुसर्‍या व्यक्तीच्या एखाद्या वस्तूकडे मोहित होणे सुद्धा ‘अस्तेय’ चोरी करणे समजले जाते. इतका सुक्ष्म अभ्यास गांधींनी सांगितला आहे. त्यामुळे चांगले कर्म करीत रहा, फळ चांगलेच मिळते यात शंका नाही. तुर्तास एव्हढेच.

Leave a Comment