काँग्रेसचा आज स्थापना दिवस राजकीय सत्तेत बदल होतात
दैनिक पोलीस शोध
संपादकीय…
काँग्रेसचा आज स्थापना दिवस
राजकीय सत्तेत बदल होतात !
भारत स्वातंत्र्य आंदोलनात आपल्या सर्वस्वाचा त्याग आणि प्राणाची आहुती देत काँग्रेस पक्षाच्या शिलेदारांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सुभाषचंद्र बोस यांच्या सशस्त्र क्रांती पासून तर महात्मा गांधींच्या अहिंसा आंदोलनापर्यंत ब्रिटीश सरकारला चले जावचा नारा देत या देशाच्या स्वतंत्रता आंदोलनात हजारो क्रांतीविरांनी आपली आहुती देत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
काँग्रेस नेत्यांच्या बलिदानातून देश स्वतंत्र झाला असला तरी पाकिस्थान फाळाणीच्या वेदना सर्वांच्या मनात होत्या. आणि एका डोळ्यात स्वातंत्र्य प्राप्तीचे ‘आनंदाश्रू’ आणि दूसर्या डोळ्यात देशाच्या विभाजनाचे ‘वेदनाश्रू’ अशा स्थितीत घटना समिती स्थापन करून देशाच्या पहिल्या निवडणूका घेण्याच्या दृष्टीने ‘सर्वधर्म समभाव’ या मुख्य सूत्राला केंद्रबिंदू मानून प्रकांड बुद्धीवंत डॉ. बाबासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीने या विविधतापूर्ण देशाची घटना तयार केली. आणि या घटनेला अनुसरून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली देशात लोकसभेच्या पहिल्या निवडणूका पार पडल्या. काँग्रेस पक्षाला जवळपास पाचशे जागा मिळाल्या आणि पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली देशाचा कारभार अधिकृतपणे सुरू झाला.
ज्या देशात पीन बनविण्याचा देखील कारखाना नव्हता, धरणे, विमानतळे, संशोधन संस्था, आरोग्य दवाखाने, शिक्षण संस्था अशा सर्वच बाबतीत प्राथमिक स्तरापासून सुरूवात करणे ही साधारण बाब नव्हती. परंतू प्रथम, द्वितीय, तृतीय, पंचवार्षिकपर्यंत पंडीत नेहरूंनी औद्योगिक धोरणाचा स्विकार करत औद्योगिक वाटचाल सुरू केली. या काळात जे राजकारण होत ते विरोधी पक्षाला संपविण्याचे नव्हते तर देशाची उभारणी नव्याने करण्याचा तो काळ होता. पंडीत नेहरू यांचेनंतर श्रीमती इंदिरा गांधी यांचे कणखर नेतृत्वाखाली देशाचा कारभार सुरू झाला. पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे काळात 1962 च्या चिन युद्धाच्या झळा देशाला बसलेल्या होत्या, आणि 1971 च्या युद्धात पाकिस्थानचा वचपा काढत स्वतंत्र बांगला देशाची निर्मिती करून श्रीमती इंदिरा गांधींनी पाकिस्थानची खवखव संपविली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय जगात इंदिरा गांधी यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. परंतू आणिबाणीच्या घोषणेमुळे देशातील नागरीक इंदिरा गांधींच्या निर्णयावर नाराज झाले आणि देशात बुद्धीजीवी वर्गाची जनता पार्टी सत्तेत आली. अडीच वर्ष मोरारजी देसाई सत्तेवर राहिले आणि सरकार पडले. परंतू पून्हा जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत आला तेव्हा पूर्ण बहुमताने काँग्रेस सत्तेत आली. इंदिराजींच्या 1984 च्या हत्त्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. हा इतिहास मांडण्याची पार्श्वभूमी एव्हढीच की 28 डिसेंबर 1985 रोजी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली.
त्यावेळी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे ब्योमकेश बॅनर्जी अध्यक्ष झाले. तेव्हा पासून दादाभाई नौरोजी, बदरूद्दीन तय्यबजी, सर फिरोजशहा मेहता, सुरेद्रनाथ बॅनर्जी, आदी अनेक मान्यवरांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. परंतू दक्षिण अफ्रिकेतून गांधीजी जेव्हा भारतात आले तेव्हा 1920 ते 1947 या स्वतंत्र चळवळीच्या कालखंडात गांधींच्या मार्गदर्शनाखाली लाला लजपतराय, पंडीत जवाहरलाल नेहरू, यांनी अध्यक्षपद भूषिविले आणि खर्या अर्थाने नेहरू युगाला 1929 पासून सुरूवात झाली. परंतू पुरुषोत्तमदास टंडन, निलम संजीव रेड्डी, के. कामराज, इंदिरा गांधी, बाबु जगजीवनराम, शंकर दयाळ शर्मा, निजलिंगप्पा, देवकांत बरुआ, के बी रेड्डी, पी व्ही नरसिंहराव, सिताराम केसरी यांचेपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची धूरा देशातील मोठ-मोठ्या बुद्धीवंतांनी सांभाळली. या सर्वांनी केवळ तिरंगा झेंडा, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव आणि अखंड भारताचे स्वप्न पाहिले. स्वातंत्र्य लढ्यापासून आधुनिक भारताच्या उभारणीपर्यंंतच्या प्रवासात काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षाच्या कार्यकाळात अडीच वर्षाची जनता पक्षाची राजवट, दोन अडीच वर्षाची आणिबाणी, तेरा महिने तेरा दिवस आणि नंतरची पाच वर्ष अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ सोडला तर जवळपास साठ वर्ष या देशावर काँग्रेस पक्षाची सत्ता होती. यामध्ये पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे सारख्या दूरदृष्टी असलेल्या द्रष्टा पुरूषापासून तर डॉ. मनमोहनसिंग यांचे सारख्या बुद्धीमान अर्थतज्ञापर्यंतच्या सर्व प्रधानमंत्र्यांचे देशसाठी असलेले योगदान विसरता येणार नाही.
म्हणजे, गुलझारीलाल नंदा, लालबहादुर शास्त्री, चौधरी चरणसींह, विश्वनाथ प्रतापसिंग, चंद्रशेखर, पी.व्ही. नरसिंहराव, आय.के.गुजराल, एच.डी.देवेगौडा यांचा कार्यकाळ खूप लहान असला तरी या पंतप्रधानांनी देशाच्या हिताचे निर्णय घेतले. राष्ट्रीय एकात्मता जपली, देशातील जनतेला या सर्वांच्या कार्यकाळात असुरक्षितता वाटली नाही. कुणीही आपले पुरस्कार त्या काळात परत केले नाहीत. ‘असहिष्णू’ सारखा शब्द वापरला गेला नाही. उलट खालीस्थानची निर्मिती न होऊ देता सुवर्ण मंदिरात सुद्धा सैन्य घालण्याचे दुर्दम्य साहस आयर्न लेडी समजल्या जाणार्या इंदिरा गांधींनी केले होते. या देशाच्या एकात्मतेसाठी, अखंड भारतासाठी, काँग्रेसचे योगदान विसरता येणार नाही. देशासाठी नेहरू घराण्याचे दोन नायकांंनी आहुती दिली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची क्रांती देशात राजीव गांधी यांनी केली. अतिशय सोबर पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांचाही कालखंड विसरता येणार नाही. काँग्रेस पक्षाच्या स्वातंत्र्य प्राप्तीचा इतिहास, काँग्रेस पक्षाचा औद्योगिक क्रांतीचा इतिहास, काँग्रेस पक्षाचा सिंचनाच्या क्रांतीचा इतिहास, काँग्रेस पक्षाचा देशात प्राथमिक शिक्षणापासून तर आयआयटी पर्यंतच्या उच्च शिक्षणाचा पाया देशात रचण्याचा इतिहास, आदिवासी, कामगार, आर्थिक दुर्बलांना आर्थिक स्तर उंचावण्यासाठी काँग्रेसच्या ध्येय धोरणांचा इतिहास, आरोग्य संस्था देशभर उभारून शक्तीशाली भारत निर्माण करण्याचा इतिहास, या देशातील विशालकाय धरणांची निर्मिती करून शेतकर्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल करण्याचा काँग्रेस पक्षाच्या इतिहासाला कुणी बनारसला जावून काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करून गंगेत बुडविण्याचा प्रयत्न करत असेल तर हा अहंकार लोकशाहीच्या मतपेटीत नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. सत्ता परिवर्तनशिल आहे, आज आहे उद्या नसेल याचे भान ठेवून देशात निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
आज आपली विश्वासार्हता देशातील एकोणपन्नास टक्के लोकांच्या मनात निर्माण होऊ शकलेली नाही. त्यामुळे एक्कावन्न टक्यातील केवळ एका टक्क्यावर काँग्रेस पक्ष संपल्याचा आव कुणी आणत असेल तर ते ‘विनाशकाले विपरीत बुद्धीचे’ लक्षण म्हणावे लागेल. या देशाची घटना खुप श्रेष्ठ आहे.त्यावर विश्वास ठेवा. सत्तेची हवा बदलते यावर विश्वास ठेवा, ‘जनकी बात’ ऐका. काँग्रेस पक्षाने चारशे पेक्षा जास्त जागा जिंकून या देशात सत्ता भोगलेली आहे. तेव्हा सुद्धा काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षाला संपवून टाकण्याची भाषा वापरलेली नाही. आजही ‘है हम तयार’ या भूमीकेतून काँग्रेस पक्ष आज 138 वर्ष पूर्ण करत आहे, भारत जोडत आहे. म्हणून अहंकार हा विनाशाच्या दिशेने जातो एव्हढेच लक्षात ठेवले तरी या देशाची लोकशाही हुकूमशाहीकडे वाटचाल करते आहे अशी भिती देशातील नागरीकांना वाटणार नाही.
तुर्तास एव्हढेच….