गितामायच्या मायेची गोधडी
दादाभाई पिंपळेच्या लेखणीतून
गितामायच्या मायेची गोधडी…..
“मां बोर्डिंगमा ऊजी थंडी वारगी लागस” हे वाक्य ऐकून माझी माय व्याकूळ झाली व मला म्हनली ‘भाऊ,या दिवाईले जर रेसन दुकानमा लुगडा भेटनात ,ते तुले या जुना लुगडानी गोदडी शी दिसू ! हे वाक्य ऐकूनच मला माझ्या मायच्या पंखाची ऊब भेटल्यासारखे वाटायचे.
खूप पाऊस पडल्यामुऴे गावात अतिशय थंडगार वातावरण झालेलं.माझ्या बोर्डिंगचं बांधकाम ब्रिटीशकालीन असल्यामुळे त्यांनी हवा व ऊजेड जास्त प्रमाणात कसे मिळेल याचे नियोजन केलेले होते. व त्यावेळेला भ्रष्टाचार नसेलच याचा पुरावा देणारी ती ईमारत.मी नेहमी विचार करायचो.एक खिळा सुद्धा ठोकला जायचा नाही तेव्हा संतापात मी म्हनायचो,रम्या,यार !या इंग्रज कितला निच व्हतात,अक खिय्या सुद्दा घुसत नई भितळामा ? रम्या म्हनायचा हाना यार दादाभाई!सालासनी ईतला पक्का भितडा भांदो का ?
त्या दिवशी सर्वपित्रीची सुटी होती म्हणून रम्या अन मी चड्डी,कुडची सुकविण्यासाठी दोरीची वयन बांधण्यासाठी खिळे ठोकण्याचा प्रयत्न करत होतो.त्यादिवशी खूप लोकांकडे पूरण पोळीचे जेवण होते.आम्ही लाल मिलोची भाकर व ऊडदाची दाळ खाऊन ,नदीवरून कपडे धुवून आलो होतो.दुपारी गुरूजी बोर्डिंगमधे आले.तसा मी त्यांना प्रशन केला !गुरूजी खरं सांगा आज काय खादं ?गुरूजी मनले “मटन”मी एकदम अचंबीत झालो.नी मनलो “पुऱ्या नई खाद्यात” काबं आज काय से ?गुरूजीमनले.
आणि आज सर्वपित्री आमावस सेना ?देखतस नई लोके कावळासनी वाट देखी ऱ्हायनांत?गुरूजींना माहित होते हा प्रश्न विचारून मला त्रास देईल म्हणुन ते माझ्याकडून पिछा सोडविण्याच्या तयारीत होते .तरी मी त्यांना विचारतच होतो म्हणून संतापात त्यांनी मला एक कानशिलात लगावली व हाकलून दिले.मी रडत रडत खोलीमधे आलो.
मला रम्या,सुदाम,कुसना सगळे समजाऊ लागले.मात्र मला माझ्या गुरूजींच्या आजच्या वागण्याचा अचंबा वाटला .थोड्यावेळानंतर आम्ही आमचे अंथरूण ऊन्हात वाऴत घातले.सततच्या पावसामुळे आमचे अंथरून अतिशय कुब्बट वास मारत होते.शहाबादी फरशीवर ते अंथरून अतिशय थंड झालेले होते.मी अतिशय मजेने माझ्या अंथरूणाचा वास घेऊन हूंउउ थू अस करीत होतो.माझी लागन सर्व मित्रांना लागली व ते सर्वजण ज्याच्या त्याच्या अंथरूणाचा वास घेऊन थूथू करीत होते.माझे अंथरूण म्हणजे वामन तलवाऱ्याच्या आईच्या किडीवरची शाल आणि नगमायच्या इतिहासकालीन लुगड्याची गोधडी…..
वास घेऊन घेऊन आम्ही ईकडे तिकडे पळत पळत खेळू लागलो तसा गुरजींचाही चेहरा आनंदाने फुललेला आम्हाला दिसून आला.त्या अंथरूणाच्या वासात सुद्धा मी माझे जीवन सुगंधीत करत होतो म्हणूनच माझ्या गुरूजींचा चेहरा फुलत असेल असे आज मला वाटते .चारपाच वाजेपर्यंत आम्ही खेळलो.सायंकाळच्या प्रार्थनेची वेळ झाली.गुरूजीनी “देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा.” ही प्रार्थना म्हनतांना सांगितले”ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप” माझ्याकडे बघून डोळ्यात पाणी आणून गुरूजी म्हणाले…..मी दुपारी पुरणपोळी खाल्ली नी तुम्ही लाल भाकरी व ऊडदाची दाळ खाल्ली म्हणून मला अपराध्यासारखं वाटत होतं.म्हणून मी दादाभाईवर संताप केला असे गुरूजी सांगत होते.मी मनलो गुरूजी खोटं तुम्ही बोलले नी संताप माझ्यावर ? गुरूजी म्हनाले “बेटा,खोटं बोलणारा माणूस हा जोरातच बोलतो.आणि अपराध करणारा माणूस कोणावरही आक्रमण करू शकतो”.ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची. म्हणून आजच्या क्रूतीबद्दल मला माफ करा.
आम्हाला आमच्या गुरूजींचं आमच्यावरील प्रेम बघून ,गूरुजींविषयी अधिक अभिमान वाटू लागला.रात्री गोधड्यांचा कुब्बट वास कमी वाटत होता.मात्र गुरूजींच्या प्रेमाने माझी खोली सुगंधित झालेली होती.रात्री अभ्यास करून पोटात पाय घालून सर्वजण झोपी गेलो.नेहमीप्रमाणे पहाटे गुरूजींचा आवाज….कारेएएएएए.
रविवारी मी माझ्या रियासत मध्ये आलो.माय माझी बकऱ्या चारायला जाण्याच्या तयारीत होती.मी मायला मनलो..मी जास बकऱ्या चाराले…..माय मनली ठीक से जा.
मी बकऱ्या घेऊन नवल पवल चा पाट,धोरण तोरण,भाट्यान शिव,बवराना वावरे,आडासडक एवढ्या ठिकाणी बकऱ्या चारून सायंकाळी घरी आलो.माझी मायने आज आंघोऴ केलेली होती व डोक्याला खोबऱ्याची वाटी चावून चावून थुकमिश्रित तेल डोक्याला लावले होते.व तोंडाला खायचे पामतेल लावलेले होते व तिचा चेहरा अतिशय चमकत होता.माझी माय आज जणू जिजामातेसारखी सुंदर दिसत होती.अशा स्थतीत माझ्या मायला बघून मला अतिशय आनंद झाला.मायने माझ्यासाठी व माझ्या बापासाठी चहा केला.माझ्यासाठी मायने गरम पाणी केले.माझी पाठ घासता घासता मनली “इतला काय मय व्हई गया रे रांडम्या” मां बोर्डिंगमा घसीघुसी आंग धवो ते,खायेल आंगे लागस नई” त्यामा तठे आंगवरना मय निंघस नही.मायने माझ्या पाठीवर एक थाप मारली व ऊठून चालली गेली.
रात्री मी मायला मनलो मां सर्वपित्री आमावस्या आपला वाडावडीलसनी नई ऱ्हास का ? काबरे बा?माय मनली…..नई आपला घर पुऱ्या नई बनतीस त्यामा ईचारीऱ्हायनू ? माय मनली आपला वाडावडील मटन खायेत त्यासले पूऱ्या जर खावाड्यात ते त्या रागे भरी जाईत !मां मानोस मरा नंतर कावळा व्हई जास का ?माय मनली…..भाऊ,ज्यासले पोटभर खावाले ऱ्हास त्या कावडा व्हतसं.आपलासारखासले मानोसना जनममाच खावाले भेटत नही म्हणीसन आपला वाडीवडील परत जनमाले येवाना झंझटमा पडतसं नही.त्यामा सर्वपित्री आमावस करतत नही.बसं आते काही ईचीरू नको नहीते तूना वाडावडील खवयीजाईत असं सांगून मला माझ्या मायने चुप केले .
मग मी मायला बोर्डिंग मध्ये थंडी वाजते म्हणून सांगितलेआणि मनलो” मां माले नविन गोधडी सी दिस,बोर्डिंगमा थंडी वाजस !
मायने माझ्या बापाकडे बघितले त्यांच्या डोळ्यात काहीतरी बोलणे झाले…..मला माय मनली ..भाऊ,मनं एकच लुगडं से,रेसनमा लुगडा ऊनात का तुले या लुगडानी नवि गोधडी सी दिसू…..मंग त्यानामा पूरण कोणतं टाकशी मां ?त्यानी तू चिंता करू नको…..तूना दादानं जूनं धोतर शे,तूनं नगमायनं लुगडं शे,मना जूना घागरा शे,आणि आपली आई धोबीन जिजीनी काई जूना कपडा देल शेत त्यानावरी तुले एकदम भारी गोदडी सी दिसू तूले थंडी वाजाव नही.मी मायला मनलो मां,दोरा कोणता वापरशी ?एकदम पक्का दोरा वापरीस मां,माले खूप शिकानं से.मी शिकस तव माले आई गोदडी टिकाले पाहिजे ?माय मनली,भाऊ तूनी चड्डीले ठिगयं लायेल सेना तो दोरा वापरसू.तू चिंता करू नको देखं,लायेल ठिगय आखो फाटी गयं मातर दोरा तूटना नही.आसा दोरा वापरसू ?
माझ्या मायने माझ्यासाठी तिच्या फाटलेल्या लुगड्याच्या गोदडीत माझ्या बापाचं जुनं धोतर,माझी आजी नगमायचं लुगडं,माझ्या मायचा सैनचा कापडाचा घागरा,माझ्या बापाची फाटकी चादर,माझ्या बापाचा जूना पांढरा रूमाल,बेबाआक्काच्या लुगड्याचे फडके,धोबीन जिजीचे जुने कपडे,दुकले बाईनी मला दिलेले तिच्या मुलाचे माझ्यासाठी नविन पण मी वापरून वापरून झालेले जूने कपडे ,चमारी दोरा आणि माझ्या मायची न मोजता येणाऱ्या प्रेमाची ऊब या सर्व गोष्टीनी माझी गोदडी माझ्या मायने माझ्यासाठी तयार केली.
मी शिक्षण पूर्ण होईपर्यंत हीच गोदडी वापरली व आजही मी हीच गोधडी वापरीत आहे. या गोधडीत आजही मला माझ्या मायची मायेची ऊब मिळते ,मी जेव्हा ही गोधडी पांघरतो तेव्हा मी माझ्या मायच्या कुशीतच झोपलो आहे असे मला वाटते.आज तोरणमाऴसारख्या थंड हवेच्या ठिकाणी सुद्धा माझ्या मायची हातची शिवलेली ही गोधडी मला ऊब देत आहे.म्हणून ती माझ्या बरोबर आठवणीतून सुदधा बरोबर असते व माझ्या नसानसातून माझ्या गितामायची मायेची गोधडी ……
विचारांची ऊब देऊन प्रेरणा देत राहते.