जिंदगी भाकरीच्या दबावात आहे
•जिंदगी भाकरीच्या दबावात आहे• [किरणकुमार मडावी]
[गज़लसंग्रह] [वाचून मला काय जाणवले]
ही स्व संदर्भाच्या प्रदेशातील प्रयोगशिल कविता (गज़ल) आहे, वाचताना अगदी काही क्षणातच मनाच्या विद्यापीठात लागाव्यात – रूजाव्यात अशाच आहेत ह्या संग्रहातील कविता (गज़ल). भाकर हूल देते बिल्लासभर पोटाला वर्तमान जगताना. ही भाकरीची प्रतिमा विश्व गुरू होऊ पाहणाऱ्या कृषीप्रधान देशाला अस्सल वास्तवाची जाणीव करून देणारी आहे. बागाईतदार मनात कोरडवाहू स्वप्ने अधिक काळ टिकत नाहीत! कारण पोटात भाकर राहिल तरच राष्ट्र निर्मितीचे स्वप्न पाहता येईल.? नाही तर कृषीप्रधान देश कोरडवाहू वर्तमानाच्या श्वासात गुदमरत राहिल. म्हणून कवी (गझलकार) पहिल्याच गज़लेत म्हणतात, –
‘हासणे हे जरी या स्वभावात आहे
जिंदगी भाकरीच्या दबावात आहे’ (पृष्ठ : ०९)
‘जिंदगी भाकरीच्या दबावात आहे’.? सदर गज़ल जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक कळवं वाचताना अंगावर शहारे वाढत राहिले आणि प्रश्न पडला की, जिंदगी भाकरीच्या दबावात कशी काय असू शकते.? या प्रश्नाचा जेव्हा खोलवर विचार सुरू झाला तेव्हा या प्रश्नामागे पिढ्यानपिढ्या जगू पाहणाऱ्या व्यक्तीत्वाची त्यांच्यातल्या अस्तित्वाची जबाबदारी जाणवली. आणि हीच जबाबदारी गझलकाराला विसर पडू देत नाही म्हणून गझलकाराला ‘जिंदगी भाकरीच्या दबावात आहे’ असे म्हणावेसे वाटते. ‘हासणे हे जरी या स्वभावात आहे’ असे जरी गझलकार म्हणत असले तरी त्या हसण्यामागे गझलकाराला विसरायची नाहीये त्यांनी स्विकारलेली जबाबदारी.! नात्यांचा जात्यात अस्तित्वाचं दळण करणारा घरचा कर्ता पुरुष जेव्हा घरच्या मूळ चेहऱ्यांसाठी राबतो तेव्हा घरातील परिस्थिती जाणताना त्याला घराबाहेर पडताना चेहऱ्यावर हास्य ठेवूनच जावं लागतं. गझलकार हे शेतकरी आहेत आणि त्यांच्या शब्दातील घर – घराचा मूळ चेहरा हा देश – देशाची जनता आहे.! मग वर्तमानाची कळ जेव्हा काळजाला लाभते तेव्हा ‘मी’ हसणार नाही तर काय.? ही गज़ल जितकी कृतीशील, मन हादरवणारी आहे तितकीच ती माणसातील वर्तमानाला लाचार, अस्वस्थ, अबोल करणारी आहे. एकाएकीच पापण्यांच्या गर्दीतून आसवांनी दाटावाटी करावी अशीच अगदी अशीच समकालीन साहित्य प्रवाहात आली आहे शब्दकळातली ही गज़ल. म्हणूनच ही गज़ल वाचक मनाच्या विद्यापीठात लागल्या बिगर राहणार नाही, असे मला वाटते. गझलकार त्याच गझलेत पुढे म्हणतात – ‘या सुखांनी मला जिंकुनी दाखवावे / रोज मी वेदनांच्या सरावात आहे’ सुख कितीही आशादायक असलं तरी ते क्षणिक असतं, असं गझलकार म्हणतात. सुखे खरंच जिंकत नाहीत मानवी मनाला आयुष्यभरासाठी. ज्याला जे सुख भेटते त्याचाच तो खऱ्या अर्थाने आस्वाद घेतो आणि तेच सुख दुसऱ्याला सांगाताना त्या सुखाचा त्या सारख्याला तसला आस्वाद घेताच येत नाही.! मग रोज वेदनांच्या सरावात असणाऱ्या व्यक्तीला सुख म्हणजे काय? तर तपत्या उन्हात काही सेकंदाचा स्पर्शून जाणारा गारवाच आहे. सुखाला ना प्रतिमा आहे ना व्याख्या, आहे फक्त उमलून विसावलेला क्षण.
‘येऊच देत नाही, नजरेत वासना
माझ्यामध्ये मुलीचा, जो बाप राहतो’ (पृष्ठ : १०)
वरील गझलेच्या ओळी आजच्या वर्तमानाला बऱ्यापैकी विवाहित पुरूषी मनाला लागू होणाऱ्या आहे. ही वासना जेव्हा नजरेतून मेंदूत पोहचते, मनातच कल्पनेने समोरील तरनीपोर अथवा आकर्षक स्रीला खाऊ की गिळूच करणारी असते. वासना नजरेतून मनात भरते तेव्हा किंचितच पुरूष त्यावेळी आपली मुलगी, आई आठवतात आणि तो क्षण मनातून झटकून काढतात. कवी मन फारच नाजूक, हळवं व नातं जपणारं असतं आणि कवी मनाला असल्या प्रसंगातून जाताना त्यांना लाभलेली प्रतिभा सद्बुद्धी देत असावी, असे मला वाटते. नाही तर कवयित्रींच्या कवितेतलं शब्द सौंदर्य वाचून तुरळक कवी कवयित्रीच्या पर्सनली वासनेचे आभाळ घेऊन जातात, हे आजच्या सोशल मीडियावरील बोंबलणारं वर्तमान आहेच.
बारोमास तिन्ही ऋतू सहत अस्तित्वाचा पालापाचोळा झालेल्या झाडाची जिद्द अफाट असते जगण्यासाठी. आणि याचंच उदाहरण म्हणून खालील प्रमाणे गझलेच्या ओळी अस्तित्व विषयक विस्तारताना दिसतात. –
‘मी पुन्हा बहरेन येथे पूर्ण माझ्या ताकदीने
छाटल्या फांद्या जरीही, छाटले हे खोड नाही’ (पृष्ठ :१७)
जिद्दीने पेटलेलं अस्तित्व लाखपटीने स्वतःसाठी स्वतःच प्रेरणा निर्माण करत असते. वरील गझलेच्या ओळीत जरी आशय एखाद्या झाडाचं वर्णन वाचक मनात निर्माण करत असला तरी झाड ही एक प्रतिमा आहे. गझलेतली खरंतर ही प्रतिमा त्या सर्व घटकांना लागू होते ज्यांना श्वास आहे, अस्तित्व आहे, मरणापेक्षा जगण्याची जिद्द आहे. आणि अशी प्रतिमाशील अस्तित्वांना वादळात उध्वस्त झालं तरी चालतं पण वादळापूर्वी हरत नाही आपला मार्ग ते जिद्दीनेच निवडतात कुणावर अवलंबून रहात नाही. क्षणाची गोष्ट असते गोष्टीमागे काळ असतो काळामागे अस्तित्व असतं. माणसाला जेव्हा क्षण आणि काळाचा विसर पडतो तेव्हा त्यामागे एकट्या पडत जाणाऱ्या अस्तिवाचाही विसर पडतोच.
आपण कोण.? आपल्यात नेमकं काय आहे.? हा प्रश्न स्वतःला विचारायला बऱ्यापैकी वेळ लागून जातो पण जाणिव तेच करून देतात ज्यांनी आपल्यात काही विशेषपण शोधलेलं असतं. आणि याचंच उदाहरण खालील प्रमाणे वाचता येईल –
‘काल हे बोलली ती जरा लाजुनी
चारचौघाहुनी मी बरा वाटतो’ (पृष्ठ :१८)
सदर गझलेच्या ओळी जरी मैत्रीच्या पलिकडे अन् प्रेमाच्या अलिकडे वाटत असली ह्रदयात नवी स्पंदने निर्माण करत असली तरी ते हवं असतं प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी अनुभवायला. जगण्याची सर्वीच उत्तरे आपल्याला आरश्यासमोर उभे राहिल्यावर मिळत नाही. आपलं देखणं रूप, आपला स्वभाव, आपली कला, आपली राहणीमान, मनातलं असमान्यपणाची जाणीव जेव्हा कुणी प्रति प्रिय शब्दांनी करून देतं तेव्हा आयुष्याचं एक पान टवटवीत झाल्यासारखं वाटतं. कारण आपल्यातल्या ‘मी’ची जाणीव आपल्यापेक्षा आपल्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्यांना आधी कळते.
‘नगदीत काम ज्यांनी केले कधीच नाही
अब्जावधीत केली देशावरी उधारी'(पृष्ठ :१९)
पिढ्यानपिढ्या देशाची दैना वर्तमानाच्या पापणीला चिपकून बसली आहे. विकास कुपोषित होतोय आणि योजना खाऊन फुगली आहे.! कुणीच कसे बोलत नाही? की हा आवाज आतला गर्जून त्यांच्या पर्यंत पोहचत नाही? देशावरी उधारी.! देश जागतिक पातळीवर पुढे जातोय की मागे.? कुपोषित आहे देशाचा विकास तो पोषित पिढ्यानपिढ्या होणार नाही आणि इनो घेऊनही सहा सेकंदात कुठली योजना जिरवता येणार नाही! नगदीत काम ज्यांनी केले कधीच नाही ते देशावर उधारी करणारच आहेत ना.? हा प्रश्न देशाचा वर्तमानही नाकारू शकत नाही.
‘आभाळही अवेळी, डोळ्यांत दाटते का?
ठेवा तपासण्याला, गाऱ्यावरी समीती’ (पृष्ठ : २२)
वरील गज़लेच्या ओळी म्हणजे गझलकाराने समीती विषयीची चांगलीच नोंद करून घेतलेली दिसते. देशात घटनापरात समीत्या नेमल्या जातात आणि अशा कशा विसावल्या जातात त्या समीतींचा पत्ता सामान्य माणसाला सुध्दा लागत नाही. समीतीत सदस्य नेमले जातात, अहवाल लिहिले जातात पण सादर करत नाही. चाऱ्यावरी समीती, वाऱ्यावरी समीती, फाऱ्यावरी समीती, थाऱ्यावरी समीती, ताऱ्यावरी समीती कवी अशा समीतींचा जेव्हा उल्लेख करतात तेव्हा भावनांच्या तळ्यात कल्पनेचा चिखल उडवून पाय बुडवताना दिसतात ह्या समीत्या.! आभाळ अवेळी डोळ्यांत दाटते का.? या प्रश्नामागचा जगून घेतलेला प्रसंग ह्या समीत्या समजून तरी घेतात का.? का खोटे आश्वासन देऊन समीत्या नेमल्या जातात.? इतकं सहज दाटून येत नाही अवेळी डोळ्यांत आभाळ! दुखावला जातो माणूस प्रसंगाशी लढताना. हेच गझलकार ह्या समग्र गझलेत सांगताना, समीतींची नोंद घेताना दिसतात.
काही माणसं प्रामाणिक असतात हयात (आयुष्य) जगताना. ते प्रामाणिक असतात स्वतःसाठी, स्वतःच्या कलेसाठी, स्वतःने निर्माण केलेले विश्व व विश्वातील नात्यांसाठी. वाटेला आलेली गरिबी – नदारी माणूस म्हणून माणसाचे सत्व कशी पाहते ते कवी खालील गझलेच्या ओळींमध्ये म्हणतात –
‘नाही खिशात दमडी, नाही घरात खाया
चांगुलपणात गेली, माझी हयात वाया’ (पृष्ठ:३४)
काळ जरी हरिश्चंद्राचा नसला तरी जीवनाचे सतीयुग जगणारी माणसं याही युगात आहेत. त्यांचा वर्तमान विश्वामित्र होऊन जणू परीक्षाच घेतात की काय.? प्रश्नच पडतो. ही खऱ्या मनाची माणसं असंख्य संकटांना तोंड देतात, नदारीत भुक्यापोटी निजतात, गरिबी जगून घेतात पण; जगणं ते विसरत नाही. अगदीच स्वाभिमानी आयुष्य जगणाऱ्या एखाद्या माणसाचं वृत्त गझलकाराने ह्या काव्य ओळीत मांडल्या आहेत, कदाचित ह्या वृत्तात मला गझलकार स्वतः जाणवतात. असं वाचताना मला जाणवलं. या गज़लेच्या ओळीत सौंदर्य नाही, ना कल्पना आहे फक्त माणूस म्हणून जगणाऱ्याचं हे वास्तव आहे, इतका तरी शोध माझं वाचक मन घेत असतं.
‘केवढी तिव्रता ही भुकेची म्हणावी
एक मासा पुन्हा गळ नव्याने गिळाला’ (पृष्ठ : ४२)
‘भुक’ हा एक शब्द क्षणभरातच सजीव मन मुरझावून सोडणारा आहे. ही भुकेची तिव्रता भयान असते. वरील गज़लेच्या ओळी वाचायला जितक्या सोप्या जातात तितक्याच त्या आकलन करताना विस्तारणाऱ्या आशयाला समजून घेताना कठीण जातात. वाचक शाकाहारी असेल तर त्याचं मन क्षणात अस्वस्थ होईल पण; मांसाहारी वाचक असेल तर संपूर्ण गज़ल वाचून पण वाचक नजर पुढच्या पानावरील गज़लेकडे सहज भाव झटकून नेईल. भुकेच्या आशेनं मरण नक्की कुठे येईल? हे कुणालाही सांगता येणार नाही. बिल्लासभर (इतभर) पोटासाठी माणसाला नको तो संघर्ष, नको ते गुन्हे करावे लागतात. वासनांच्या वस्तीत वेश्येला पोटाची भुक भागवण्यासाठी देहाची भट्टी पेटवावी लागते, सत्तेची भुक लागलेल्या राज्यकर्त्याला खुर्चीसाठी रक्ताचा चिखल सुध्दा करावा लागतो, आणि जंगलात राहून प्राण्यांना सुध्दा भुकेसाठी एकमेकांवर अवलंबून रहावे लागते. भुकेला व्याख्या नाही, भुकेला पातळी नाही, भुकेला मापता येत नाही कारण भुक एकाच दिवसासाठी भागून थांबत नाही. रोजच भुकेसाठी मरमर धावपळ आहेच कारण भुकेची तिव्रता बोलण्यापेक्षा अनुभण्यासारखी आहे. मग भुक्यापोटी झोपलो तर झोप सुध्दा लागत नाही. इथे एक प्रतिमा जरी माश्याची भुकेसाठी असली तरी ह्या सृष्टीतील समग्र सजीवांची तिव्रता भुकेसाठी वाढलेली दिसते तसेच अंगाची लाही लाही होणाऱ्या भुईलाही पावसाची भुक असतेच! मग नक्षत्र बेईमान झाली तर? नेमका हाच प्रश्न पुढच्या कवितेत निर्माण होतांना दिसतो. गझलकार म्हणतात –
‘दिसतो तसाच साधा, नाही प्रकार मित्रा
आहे खरा जिवाचा, शेती जुगार मित्रा’ (पृष्ठ : ४८)
मित्रा शेतीच्या बांधावरून सेल्फी घेणाऱ्यांना शेतीसाठीचा लळा आणि लढा फारसा कळणार नाही. माॅलमधल्या वस्तूना दुकानदार आधीच भाव लावून ठेवतात पण इथल्या मातीत राबणाऱ्या शेतमालाला दुसरेच भाव लावतात. आधी बि बियाणं पेरावं लागतं. मग पाऊस येईल की नाही.? आला तर मनासारखं पिकून येईल का नाही.? पिकून आलंच तर मालाला योग्य भाव मिळेल की नाही? बि बिवाऱ्याचे पैसे निघतील की नाही.? मग शेती जुगार नाही तर काय.? जरका माझ्या ह्या कृषीप्रधान देशातील शेतकऱ्याला एवढे प्रश्न दरवखत दर हंगामात पडत असतील तर मला नाही वाटत की आपण महासत्ता होऊ शकत.! मातीचेच पाय घेऊन कवीचं जगणं आणि जगवणं अबोल करते वाचक मनाला. ही शब्दकळा शेतात राबताना अस्वस्थत करते आणि शब्दात कळकळून येतेच. म्हणून त्याच गज़लेत पुढे गझलकार म्हणतात –
‘मातीत घाम आणिक, हे रक्तही मिसळते
हिरवे असेच कोठे, पडते शिवार मित्रा’
रक्ताचा घाम जेव्हा शेत फुलवण्यासाठी होतो तेव्हा तिन्ही ऋतूत खपताना माणूस दिसतो. भुईला बिवाऱ्याची, गुऱ्हांना चाऱ्याची, तनाला खुरपीची नी मजुरांना सदीपरात रोजंदारीची गरज भासतेच! माणसाची ही कायपात ही गत माणूस म्हणून जगतांना भयान वाटते. तेव्हा कळतं भुईलेक – लेकराला मातीतलं जीणं… मातीत राबता राबता माती होऊन जाणं. कायपातीचा कष्टकरी घाम बऱ्यापैकी माणूस पोटासाठीच गाळत असतो कारण माणूस ऋतूंप्रमाणे बहरून करपतो सुद्धा परिस्थितीसाठी. त्याचं काळीज त्याचं इंजिन असतं आणि ह्या इंजिनात हयातभर त्याच रक्तच जळत असतं! आणि याचाच प्रत्यय पुढिल गझलेच्या ओळींमध्ये जाणवतो. गझलकार म्हणतो –
‘घाम जेव्हा बांधलेल्या मोळीत आला
एक आणा फाटक्या या झोळीत आला’
लाकडं तोडतांना घामानं भिजलेली बाई काव्यात जाणवते. वरील काव्याच्या प्रासंगिक दृष्टीने विचार केला तर हे चित्रच आहे आदिवासी पाड्यावरील स्वावलंबीपणात जगू पाहणाऱ्या बाईचं. जित्त्या जंगलात सरपणाला जाणाऱ्या आदिवासी बाया मरणाला भित नाही कारण त्यांना जगणं महत्वाचं वाटतं. घामासोबत जुळलेली मोळीची प्रतिमा ही कृतीशील वाटते. अस्वस्थ करणाऱ्या भारताचं हे आदिम चित्र आहे! हा काही काल्पनिकतेचा शब्दसराव नाही? सरपणाला जाणाऱ्या आदिवासी बायांचं हे रोजचं वर्तमान म्हणता येईल. खंत इतकीच कवी मनाला वाटते की जेव्हा मोळी विकली जाते तेव्हा मोळीपेक्षाही कमी पैसे तिला दिले जातात. म्हणून त्याच गज़लेत पुढे ते म्हणतात –
‘काळजाला लागली झळ तेव्हा कुठे मग
पापण्याचा एक अश्रू ओळीत आला’ (पृष्ठ: ७६)
हा प्रसंग जेव्हा कवी अनुभवतो तेव्हा खरंच सुचत नाही लिहायला! कवीचं आवसान गळून पडतं. आणि असला प्रसंगानुभव शब्दात मांडायचा कवीचा क्षण येतो तेव्हा कागदावर अश्रु येऊ लागतात अशावेळी प्रतिभाही नतमस्तक होते त्या आसवांचा संदर्भ भेटल्यावर. इतकी सहज काळजाला झळ लागत नाही, वर्ष – तपांचा संदर्भ असतो सूर्य मावळून चुल पेटवण्यासाठी. आदिवासी बाईचं रोजचंच असं जगणं म्हणजे आवाहनच वाटते कवीत्वाच्या ‘मी’पणाला शब्दात आणण्यासाठी.
‘शब्दात शेत येते, शाईत घाम येतो
दरसाल काढतो मी, हिरवीच चित्रकारी’ (पृष्ठ:१०१)
एखादा चित्रकार आपल्या कल्पकतेने हजारो शब्दांचा बोलका आशय एखाद्या चित्रात आणण्याचा प्रयत्न करतो पण; वरील गज़लेच्या ओळीतूनच गझलकार चित्रकाराला हजारो शब्दांचा बोलका आशय नवकल्पकतेतून सहज सुचवत आहे. कुठलीही चित्रकल्पना चित्रकाराच्या मनातून अगोदर स्वर स्वरादींच्या विशेष आशयपूर्ण शब्दात येते! आणि ती कल्पना मनातून अदृश्य होऊ नये म्हणून बऱ्यापैकी चित्रकार त्या कल्पनेला शब्दरूप देतात मग चित्रस्वरूपात येऊ देतात. इथे तर गझलकारच दोन्ही भाव शब्दात टिपून घेतोय. कल्पना वाटते ‘शाईत घाम येतो’ वाचताना, पण ती ओळ जर प्रयोगशिल असेल तर.? आपण ही शब्द कल्पना नाकारू शकत नाही. कारण ते विशेष शब्द सौंदर्य आहे जे गझलकाराला गज़लेच्या प्रतिभेने बहाल केलंय. कुठलीही कल्पना वाचकांचा विचार करून किंवा वाचक मनाला विचारुन काव्यात येत नाही.! शाईत घाम येतो ही कल्पना अवघ्या कवितेच्या वर्तमानाला टवटवीत करते. आणि हीच कल्पना त्यांच्या कवितेला (गज़लेला) समृद्ध करणारी आहे.
‘जिंदगी भाकरीच्या दबावात आहे’ ह्या संग्रहाला कुठलीही प्रस्तावना नाही, ना मनोगत आहे. जे आहे ते वृत्त आहे, विविध गज़लांमध्ये जाणवणारं आहे. ह्या संग्रहातील गज़ल विविध प्रवाहाच्या तळ गाठणाऱ्या आहेत. जसे की ग्रामीण प्रवाह, आदिवासी प्रवाह, वास्तव प्रवाह, स्त्रीवादी प्रवाह, जागतिक प्रवाह, बाल प्रवाह, कामगार प्रवाह, अस्तित्व प्रवाह, सौंदर्य प्रवाह, आणि विशेष म्हणजे माणूस प्रवाहाच्या गज़ली या संग्रहात आहे
‘जन्म अस्ताव्यस्त झाला, सावराया भान दे
कोरड्या डोळ्यास माझ्या, आसवांचे दान दे’
किती वैचारिक ताकदीच्या गज़ला या संग्रहात आहेत.! नवीनता, नवंसौंदर्य, नव्या उपमा, नवे प्रतिके ह्या गज़लांचा दीर्घ श्वासच आहे. गज़ल तंत्रात लिहिली जाते म्हणून मी व्याकरणा विषयी बोलणार नाही. गज़लेचा एक शेर म्हणजे एक कविताच मानली जाते गजलप्रवाहात आणि ही काही कल्पना वाटत नाही हा संग्रह वाचल्यावर. मी गज़लेचा अलिकडचाच वाचक. गज़लेचा विचार कविता म्हणूनच करतो. गज़लेचं तंत्र मला माहित नाही. अनेक गझलकारांचे एक मतला दोन शेर व पूर्ण गज़ल वाचून, व्यासपीठावरच्या गज़ला ऐकून घेतल्यानंतर हा समग्र पहिला गज़ल संग्रह वाचण्यात आला. या संग्रहातील बऱ्यापैकी गज़ला आवडीच्याच आहेत कारण माझी आवड वैचारिक आहे. ‘काटे जरी फुलांचे सारे कुरप होते’ ही गज़ल इतकी आवडली की मी त्या गज़लेला चाल लावली आणि गझलकारांना फोन केला, तेव्हा मराठी साहित्य प्रवाहातल्या एका वेगळ्याच माणसाचा मला परिचय झाला. हा गझलकार ज्यांना मी कधी भेटलो नाही पण दोन तपाचा संघर्ष दोन तासात ऐकताना मी अस्वस्थ झालो आणि भेटायची इच्छा निर्माण झाली. त्यांचं कौतुक करावे तितके कमीच आहे, इतके भावस्पर्शी विचार त्यांच्या लिखाणाबरोबरच त्यांच्या जगण्यात आहे. गज़लसंग्रहाला तीस हजार खर्च करण्या ऐवजी त्या तीस हजारांचं शेतीसाठी लागणाऱ्या बि बियाणांचं विचार करतो हा माणूस.! ‘मी जीवंत राहिल तरच माझी कविता जीवंत राहिल’ असा विचार करणारा हा भारतीय शेतकरी भरभरून आयुष्य जगावा इतकीच प्रार्थना निर्सगाला मनोमनी करत फोन ठेवला….
ज्यांनी पण किरणकुमार मडावी ह्यांच्या गज़लांचं संकलन करून या गझलकाराला गज़लसंग्रहारूपी आणण्याचा प्रयत्न केलाय त्यांना खरंच आशादायक शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि वाचकांना ह्या संग्रहाविषयी गझलकारांचाच एक शेर विशेष संदर्भ घेऊन सांगायचं झालं तर –
‘काळजाच्या या नदीचा, नेमका अंदाज समजू
आसवांचा दोर टाकू, आतला आवाज समजू’
•प्रविण पवार•
धुळे
अक्षरसंवाद : ९६८९६ १०६८४
•पुस्तकाचे नाव :- जिंदगी भाकरीच्या दबावात आहे
•साहित्य प्रकार :- कविता (गज़लसंग्रह)
•गझलकारांचे नाव :- किरणकुमार मडावी
•पुस्तकाचे प्रकाशन :- अष्टगंध प्रकाशन, ठाणे
•पुस्तक मुल्य : २००
•पुस्तक वितरक• :-
संजय शिंदे : ९८९२२७६८३१
वृषाली मरतोडे : ९३५९४५९३००
विनय पाटील : ९८५०९२३८२६
दुसरी आवृत्ती विशेष
