नवी तूरही चांगलाच भाव खाणार

नवी तूरही चांगलाच भाव खाणार

बाजार भाव

सौजन्य : अग्रोवन
दिनांक : 02-Dec-23
नुकत्याच झालेल्या पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता आहे. या कारणाने नव्या हंगामातही तुरीचा भाव चांगला मिळू शकतो. तूर आवकेच्या हंगामात सरासरी ८ हजारांच्या दरम्यान भाव राहू शकतो. आवक कमी झाल्यानंतर भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.पावसाने तुरीचे नुकसान झाल्याने बाजाराचे समीकरण बदलण्याची दाट शक्यता आहे. कारण उत्पादनात मोठी घट येऊ शकते. आधीच देशात तुरीची लागवड गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. दुष्काळी स्थितीचाही फटका पिकाला बसत होता. यामुळे उत्पादनही कमी राहण्याचा अंदाज होता.आता पावसाने फटका दिल्यामुळे उत्पादनातील घट जास्त राहू शकते. रविवारपासून (ता. २६) मराठवाडा आणि विदर्भ या महत्त्वाच्या तूर उत्पादक भागांत पावासाने धुमाकूळ घातला. इतर पिकांसह तुरीचेही नुकसान झाले. तूर पीक फुले आणि शेंगा भरण्याच्या स्थितीत असल्याने नुकसानीची पातळी जास्त आहे.आधी दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने नुकसान झाल्यामुळे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा किमान २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी राहण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात देशात ३३ लाख टन उत्पादन झाले होते.

यंदा उत्पादन कमी

यंदा उत्पादन ३० लाख टनांपेक्षाही कमी राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. कारण महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये तूर पिकाला फटका बसला. त्यामुळे उत्पादन कमी होणार आहे.
कसा राहील बाजार?नवी तूर महिनाभरानंतर बाजारात दाखल होण्यास सुरुवात होईल. जानेवारीनंतर बाजारातील आवक वाढेल. सध्या बाजारात तुरीला सरासरी १० हजारांचा भाव मिळत आहे. देशातील उत्पादन, आयात आणि मागणीची स्थिती लक्षात घेता ऐन आवकेच्या हंगामातही तुरीला किमान ८ हजारांचा भाव मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
तर आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता आहे. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर भावपातळी पुन्हा १० हजारांचा टप्पा पार करेल, असेही अभ्यासकांनी सांगितले.
आयातीचा काय परिणाम होईल?

आवकेच्या हंगामात भावावर दबाव राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे आयातीचे. आफ्रिका आणि इतर देशांमधून तूर आयात होईल. आयातीचे करार ६ ते ७ हजारांनी झाले आहेत. आपला नवा माल आणि आयात यामुळे काही दिवस बाजार ८ हजारांच्या दरम्यान राहू शकतो.
पण आयात मालही आपली गरज पूर्ण करू शकणार नाही. कारण तुरीचा पुरवठा आणि मागणी यात मोठी तफावत असेल. आतही तफावत जास्त असल्यानेच तूर १० हजारांना विकली जात आहे. पुढील हंगामातही हीच स्थिती राहू शकते. त्यामुळे तुरीला चांगला भाव मिळू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Leave a Comment