नाती वांझ होताना कविता संग्रह

नाती वांझ होताना कविता संग्रह

मनिषा पाटील-हरोलीकर
[कविता संग्रह]

वाचून मला काय वाटते
घराचा मुळ चेहरा लक्षात घेताना व्यक्ती विविध नात्यांमध्ये विभागली जाते आणि ही नाती जगावी लागतात, जपावी लागतात, स्थळ काळाने विस्तारावीही लागतात. तसेच मनामनाने आपल्या गरजाप्रमाणे घराबाहेरील विश्वातही नवी नाती निर्माण होऊ लागतात जे घराबाहेरपुरता का मर्यादित असेना पण हवीहवीशी वाटतात. नाती भावनांचा ठाक घेतात, सुख – दुःखात सहभागी होतात कधी कधी तेढ निर्माण झाला तर सुख – दुःखाचे क्षणही नात्यांसाठी व्यर्थ ठरतात. पण कधी कधी टाळता येत नाही नात्यांना, जोवर श्वासात श्वास असतो. आनंद व्यक्त करायला शेजारचे, मित्र मैत्रिणींना बोलवता येईल, कुणी घरातील मरण पावलंच तर रोजंदारीने माणसंही लावता येईल पण; जिथे रक्ताच्याच नात्यांची गरज पडत असेल तिथे काय? म्हणून कवयित्री ‘नाही टाळू शकत आपण’ ह्या कवितेतून पुढिलप्रमाणे म्हणतात –

‘उसन्या सावलीत
फुलत नाही संसार उन्हाचे
आणि केसांच्या गुंतावळीसारखे
सुटता सुटत नाहीत
गुंते नात्यांचे.’ [पृष्ठ क्र. २२]

शब्द सौंदर्यातलीच निसर्ग प्रतिमांच्या वरील कवितेच्या ओळी मानवी जीवनाच्या नात्यांमधील वृत्तीत तितक्याच अनुसरून आहेत. गरीबीमुळे नात्यांमध्ये एकंदर जगता येत नाही पण श्रीमंतीनेही दुरावलेली नाती विकत घेता येत नाही. म्हणूनच ‘आपल्याला/ अंकित करता येत नाही/ आपल्याच तळहातावरच्या रेषा/ आणि नाही टाळू शकत आपण/ आपल्याच परिघाचे/ बदलेले संदर्भ.’ असेही कवियित्रीला काव्यरूपाने सांगावेसे वाटते.

‘नाकारलेपण वाईट असते
मग चौकटींनीच नाकारले तर
कसे शिकतील हे तांडे
चौकटी धरून जगायला? [पृष्ठ क्र.२३]

प्रस्तुत वरील ओळीत ‘ज्याच्या त्याच्या’ कवितेतील आहेत. ह्यात भटक्यांचं जगणं दिसू लागते जे रोज एक नवा प्रश्न घेऊन शिवारं ओलांडताना दिसतात. नात्यांबरोबर नाकारली जातात काही कुटूंब जगण्याची धडपड करताना, मग स्थायिकपण होत नाही कित्येकांचे अस्तित्व एकाच ठिकाणी रूजत नाही. जिथे जगली जाते जिंदगी भाकरीच्या शोधात तिथली चौकटच उदासलेली असते. जेव्हा कुणी नाकारते अस्तित्वाचं जीणं तेव्हा त्यांच्या उगवत्या पिढीलाही ह्या नाकारलेपणाची धग बसतेच.
भुईच्या पाठीवर कळ सोसणाऱ्या भुईलेकी पण असतात. ज्यांची कळ नात्यांपेक्षा भुईला अधिक कळू लागते. ही कळ कधी भुईशी निजताना भुईलाही तीव्र वाटते. तर कधी वेदना शब्दांपेक्षा डोळ्यात अधिक दाटून येते. म्हणून विहिरीच्या तळाशी बुडालेला एक काव्य संदर्भ देताना कवयित्री ‘शापित आईपण’ कवितेतनं म्हणतात –

‘खरंच जड जात असेल ना
या विहिरींना
लेकीबाळीच्या मरणयातना
संपविण्यासाठी
पदरात घेतलेले हे
शापित आईपण…’ [पृष्ठ क्र.२८]

वरील कवितेच्या ओळीत सासूरवाशिणीच्या आत्महत्येचा घटनात्मक प्रसंग ठळकपणे उमटताना दिसतो. कवितेतील शापित आईपण असंख्य सासूरवाशिणींचे प्रतिनिधित्व करते जे आत्महत्यास प्रवृत्त होतात. ह्या कवितेत विहिरीला मरणयातना संपविण्यासाठीची गरज दाखवली गेलेली आहे. म्हणून कवयित्री कवितेच्या सुरूवातीलाच म्हणतात ,’कधी घेतलीय का कुणी / एखाद्या विहिरीची मुलाखत..’ विहिरी जरका बोलू लागल्या असत्या तर अनेक नवविवाहित, दोनदिशी, मुलीच जन्माला घालणाऱ्या सासुरवाशीणींच्या आत्महत्येचं कारण उघडकीस झाले असते. ही अमूर्त कल्पना खरी ठरत नाही म्हणून कवयित्रीला अशा घटनात्मक प्रसंगाला ‘शापीत आईपण’ म्हणावेसे वाटते. पिढीपरात आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या बाईला आणि भुईगर्भातल्या विहिरींना असला काळ स्पर्शून जाणारा आहे.
एखादा पुरुष नोकरीत असताना वारला तर अनुकंपाखाली त्या मृत पावलेल्या पुरूषाच्या पत्नीला त्या नोकरीवर घेतात. [अनुकंपाचे आरक्षण आजही आहे]. हा अर्ज सादर करताना करतातही चौकशी आपुसक काही बाया. मग विधवा रकान्यात कुणी केलीच टिकमार्क तर… कुजबुजतात बायका. मग चौकशी करताना बायका का जाणून घेत नाही, समजून घेत नाही –

‘तिची ऐन चैत्रातली पानगळ
वसंतातलं मुकेपण
तिचा उध्वस्त श्रावण!
वादळाने लुटलेल्या चिमणीला
पुन्हा मिळूच नये
कापूसकाडी…. निवाऱ्यासाठी
असले – तसले
चिंततात या बायका’ [पृष्ठ क्र.४३-४४]

ऐन चैत्रात पानगळ होत नाही, होतो तो नव्या पालवीचा आरंभ. पण जगण्यातही ऋतू बेईमान ठरतातच. सुखद आनंदाची नवपालवी अनुभवण्याआधीच एखादी घटनाच अशी चटका लावून जाते की वसंतातही मुकेपण प्रसंग जगणाऱ्याच्या वाटेला येतात. ऐन तारुण्यात आलेली ती लग्नानंतर तिचा वैवाहिक श्रावण टवटवीत होण्याआधीच उध्वस्त झाला असेल तर तिने पुढिल कसं जगावं.? वादळाने लुटलेल्या चिमणीला पुन्हा मिळूच नये कापूसकाडी…. निवाऱ्यासाठी? दुहेरी सुखाचा क्षण एकांत जगताना कुणी विचारू नये का आपलुकीने ती जगत चाललेली जिंदगी.? अशा अवेळी परिस्थितीतून जातांनाही चिंततात बाया स्वार्थापोटी तिचा हक्काचा घास हिसकवताना.
बाया बायांनाचा समजून घेत नाही. मग हे न समजून घेण्याचंपण अनेक बाबतीत विस्तारलेलं आहे. सून सासूला समजून घेणार नाही, (आजचं वर्तमान) भावजाईला नणंद माहेरी आलेली चालणार नाही, एखादी विवाहितेला दुसऱ्या विवाहितेचं वैवाहिक जीवन बघवणार नाही. तर बाईचं देखणंपणच दुसऱ्या बाईला आवडणार नाही. क्षेत्र कुठलंही असो बाईला बाईची गती – प्रगती सहन होत नाही. कधी कधी समोर येऊनही बाया खोटं हसून जातात, बोलावं म्हणून बोलून जातात पण; कधी कधी कारण नसताना बाया बायांना टाळून जातात, का.?

‘बाया टाळतात बायकांना’
त्यांना लागत नाही कारण बिरण
कित्येकदा विनाकारही
त्या टाळत राहतात
एकमेकींना…
समारंभाच्या झगमगाटात,
कधी बाजाराच्या गर्दीत
कधी भगभगीत रस्त्यांवर
तर कधी फेसबुक, व्हाॅट्सॲप वर’ [पृष्ठ क्र.५१]

वरील कवितेच्या ओळी कृतीशील आहेत. कारण ह्या साध्या सोप्या शब्दातून कुठलंही वर्तमान शब्दांच्या आड लपणारं नाही. ह्या कवितेच्या ओळीतली शेवटची विशेष विस्तारणारी आहे. फेसबुक – व्हाॅट्सॲप ह्या ॲपवरील आभासी जगाचा क्षणिक विचार ऑनलाईन असतांना केला तर ऑफलाईन येतांना थोडेसे विचार मनालाही गोचिडागत चिपकून येतात. लाईक, कमेंट्स मुळे अनेक बाया एकमेकींवर जळतात. आणि साहित्य क्षेत्राचा ऑनलाईन विचार केला तर लेखनापेक्षा लेखिकांच्या फोटोंवरच अधिक कमेंट केली जाते. म्हणून हे देखील दुसऱ्या लेखिकांना सहन होत नाही. जगण्यातली सुंदरता बायांनी बघतांना जळण्यातच अधिक घालवली असल्यामुळे बाया बायांना टाळतात. असे मला वाटते. हेच मत स्त्री वाचकाला पटेल, असेही नाही. पण बाया स्त्री प्रतिमांना मनातल्या मनात ठेवून वेळ मिळेल तेव्हा तुलनात्मक विचार करत असाव्यात, म्हणून कारण नसताना एकमेकांना टाळत असतील, असे मूर्त अमूर्त भावनेने सांगावेसे वाटते.
‘विसरभोळा झालाय गाव’ ह्या कवितेत गावाकडं येणाऱ्या माणसांचा विसरच पडत चाललाय. कोण.? कोणाची कोण तू.? असं आपलुकीने विचारणारं गाव अनोळख, संशयी बदलत चाललेल्या वृत्तीने मुळ स्वभाव हरवत चाललाय. म्हणून ही गत पाहताना कवयित्री खालीलप्रमाणे म्हणतात –

‘मातीची चाड असावी वाटते
गावातल्या म्हाताऱ्या बोरी बाभळींना
पण माणसांच्या गावात आता
होत नाही रूजवा माणसांचा’

ही खंत आहे मनाने मनातून संपत चालेल्या पिढीची. भावनांचं दाटून येणारं आभाळ गिळत चाललाय समकाळ. जगण्याच्या धांदलीत हिश्याची नाती अलिप्त होऊन पण नव नात्यांच्या उत्साहात नाही. गावात ज्या अस्तिवांना ओढ होती नाती जपत चालायची आज त्यांचंच वर्तमान दुर्मिळ होतांना ती आव राहिली नाती जपायची. गाव आहे म्हणून माणसं गावाकडे येतात पण गावात आपुलकीची माणसं आहेत, माणसातील नाती आहेत, हे गाव सोडून जाणाऱ्यांना गरजेचं वाटलं नाही. म्हणून ‘विसरभोळा झालाय गाव’ असं कवयित्रीला म्हणावेसे वाटते. ह्याच कवितेच्या पुढिल ओळीतून त्या म्हणतात –

‘वांझोट्या रस्त्यांवर दिसत नाहीत
माणसांचे वारसदार
सुरकुतलेले डोळे
शोधत राहतात
अंकुरांचा पत्ता…’ [पृष्ठ क्र.५३]

ज्यांनी जपलंय गाव त्यांनाच जपलं नाही नात्यांनी म्हणून; सणासुदीला माहेरी येणाऱ्या लेकीबाळींचा पण विसर पडत चाललाय. गाव का विसरभोळा झालाय.? कदाचित रक्ताचेच नाते प्रवाहा पलिकडे जाताना आपलाच विचार करत तर असावी! आणि हे संपूर्ण कविता वाचून जाणवते.
‘बाई पाऊस वंशाची’ ही संपूर्ण कविताच विविध कळव्यांनी स्वतंत्र अनुभवावर बोलणारी आहे. ह्या कवितेला संग्रहातील सर्वोत्तम कवितापण लाभलंय, असं देखिल म्हणता येईल. ह्या कवितेतील नैसर्गिक प्रतिमाशैली बघता बघता अनुभवण्यासारखी आहे. आठ कळव्यांची ही कविता दीर्घ विचारशैलीस विस्ताराला लावणारी आहे.

‘बाई पावसाची काया
ओलावते घरदार,
बाई पावसाची माया
होते हिरवे शिवार’

बाई जेव्हा वावर करते तेव्हा तणाला खुरपीची, गाय म्हशीला चाऱ्याची, डोरलं गहाण ठेवून बि बिवाऱ्याची गरज पडतेच. शेतकरीबरोबर राबणाऱ्या बाया कधी कधी गनल्या गेल्या नाहीत ग्रामीण साहित्याच्या मानाने. घरासाठी तिची कायपात नी वावर वावरासाठी होते धगधगती वात. आणि ही काही काल्पनिक प्रतिमा नाही. बाईच्या असंख्य प्रतिमा भुईशी जुळून आहेत म्हणून कवयित्री ह्याच कवितेत पुढिल प्रमाणे म्हणतात –

‘साऱ्या घरादारासाठी
बाई वादळ पेलते
जन्मभर संसाराचा
बाई पाऊस झेलते’ [पृष्ठ क्र.५६]

प्रवाह जितका निरागस असतो तितकं निरागस नसतं वाचकमन. निश्चल पाण्यागत असतात काही कविता, कवितेच्या ओळी ज्या वाचक मनाला आपल्याशा वाटतात. किंवा आपल्यापुरता तर्क लावून भवतालातील, नात्यांमधील बाई शोधण्याचा प्रयत्न करतात. वरील कवितेच्या ओळी शहरात राहणाऱ्या संघर्षमय जीवन जगणाऱ्या बाईला देखिल लागू होतात. ह्याच ओळी ग्रामीण बाईला देखिल लागू होतात आणि तसेच ह्या ओळी आदिवासी पाड्यावरील बाईला देखिल लागू होतात. इथे शहरी, ग्रामीण, आदिवासी प्रवाह वाचताना सहज जाणवतो वरील कवितेलाच अनुसरून इतर प्रवाहाचा विस्तारता विचार केला तर स्त्रीवाद, अस्तित्व, माणूस, वास्तव, कामगार प्रवाह देखील येतात.

‘कोजागिरी
तू असशील
देखणी, शीतल, लोभस
पण कधी
कधी आई होशील का गं.?’ [पृष्ठ क्र. ६१]

सदर कवितेच्या ओळी एका व्याकुळलेल्या माय मनाने भाष्य करणारी आहे. एकीकडे दुधाळ चांदणं आहे तर दुसरीकडे दुधासाठी रडणाऱ्या बाळाचं प्रतिनिधित्व करणारी आई आहे जि भरून आलेल्या डोळ्यात दाटून आलेला प्रसंग अनुभवत आहे आणि कोजागिरीला प्रश्न देखील विचारत आहे की, ‘कधी आई होशील का गं.?’ भुईशी घट्ट राहून आकाशातल्या चांदणंला विशेष कोजागिरीच्या चंद्राला विचारला गेलेला प्रश्न वस्तुस्थिती निर्माण करणारा आहे. हा प्रश्न एक व्याकळलेली आईच विचारू शकते. कारण युगानुयुगे आईपेक्षा मोठं या आकाशगंगेत कुणीच वाटत नाही.

‘मैत्रीणी, बहिणी
घेऊन जातात
मोगऱ्यांचे ऋतू
आणि जुईसारख्या भावजाया
येत राहतात घराघरात
तेव्हा अवघड असते
एखाद्या लेकीचे
त्या गावात जन्मभर राहणं…'[पृष्ठ क्र.७३]

एका अर्थाने स्व दुःख व्यक्त होणारी आपल्या मुलीला तोच अनुभव जेव्हा पिढीपरात स्पर्शून जातो तेव्हा वेगळं काही जगण्यासारखं नसतंच. मोगरा आणि जुई ह्या प्रतिमा ऋतूंच्या अनुषंगाने आकाराने, सुगंधाने व दिसण्यात स्वतंत्रशैलीचे आहेत. पण कवितेच्या आशयाने मोगरा माहेरपणाचा वाटतो आणि जुई सासरपणाची. पण सासरपण जगणाऱ्या ‘लेक’ चा विचार केला तर माहेरात हक्काने मनसोक्त तिला राहता येत नाही कारण माय बापानंतर तिची गोडी भावजायीला वाटत नाही. भाऊ कितीही प्रेमळ असला, ‘दोन दिवस आनंदाने राहून जा’ सांगत असला तरी भावजायांचे टोमणे, धुतकारलेपण माय बाप नसलेल्या घरात तिला जाणवतंच. तसेच ह्याच ओळींमध्ये विस्तारत्या आशयाच्या अनुषंगाने वैधव्य आलेल्या स्त्रीचं पण वर्तमान, प्रसंग, घटनात्मक वृत्त आहेच. म्हणून ‘उभी हयात/ पोपडत राहतात/ या चेहरा हरवलेल्या लेकी’ म्हणताना कवयित्री कवितेच्या शेवटी प्रश्न निर्माण करतात आणि हाच प्रश्न अस्वस्थ करतो कवितेच्या संपूर्ण आशय समजून घेताना.

‘पेरेन भांगात
अत्तरी फुलं
मृत्यूची
आणि करेन सुगंधी
माझ्या प्रत्येक जन्माचा
हरेक ऋतू’ [पृष्ठ क्र.८२]

‘हरेक ऋतू’ सदर कवितेत ह्या जन्माबरोबरच एकेरी जीवनाचा संघर्षमय वर्तमान आहे जो प्रति जन्मासाठी पण दिसून येतो. पण पुन्हा पुन्हा मानवी जन्म लाभेल किंवा पुनर्जन्म मिळेलच हे ही नक्की सांगता येणार नाही. सदर कवितेचा आशय स्रीमनाचा आहे जी संसारातील अनेक प्रश्न पिडा बारोमास सहताना दिसतेय. तिला घराबरोबरच घराबाहेरील विश्व देखील हयात जगताना आव्हानात्मक वाटते. ही स्त्री अनुभवांच्या भट्टीत तपणारी, प्रसंगाला थरथरणारी, परिस्थितीत मेनागत वितळणारी जरी वाटत असली अथवा नसली तरी तिची अस्तित्वाची प्रतिमा हरेक ऋतूना भिडणारी वाटते.

‘एखाद्या बेसावध क्षणी
मुलामय धाग्यांचाही
फास बनतो
बारूद भरलेली ही माणसं
जाळत राहतात
आयुष्याचे पदर ‘ [पृष्ठ क्र.८८]

वरील कवितेच्या ओळी नात्यातील भवताल आणि भवतालातील नाते स्पष्ट करणारी आहे. नाती वांझ होताना, खरंतर ह्या नाती काळाला अनुसरून गरजेनुसार प्रसंग अनुभवताना वांझ होतात. हे वांझपण माणसाच्या मनातून – काळजातून येतं, जे बघण्या – ऐकण्यापेक्षा अनुभवच विशेष असतं. भुईला पडीकपण आणि बाईला वांझोटंपण माणसाच्या कृतीतून येते. मग हे वांझपण भुई आणि बाईलाच येतं असे नाही, तर नात्यातील गरज, परिस्थिती समजून घेताना येतं. हे नातं मानवीच नाही तर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सर्वांबाबतीत गरज संपताना येतं. वरवर मन धरून काळिज कोरणारे, जिव्हाळा, लळा निर्माण करून एकांत बहाल करणारे, अलिप्त होणारे क्षण मनाने जाळतात. धुतकारतात. टाळतात. आणि हाच विचार करताना माणसाला माणूस म्हणून खुप त्रास होतो.
‘नाती वांझ होताना’ ह्या संग्रहातील बऱ्याच कविता आत्मसंवाद साधतात, भूतकाळ झालेल्या क्षणांच्या प्रसंगाला अनुसरून जाणीव करून देत स्व इतिहासाला बोलकं करतात, इतिहास सांगायला भाग पाडतात. म्हणून इथं आधी जगून घेतलेली अस्वस्थता, उदासिनता, व्यथा आहे मग शब्दात आलेली कविता आहे. ह्यातील निवडक दोन तीन कविता तशा कविता वाटत नाही! कमीत कमी शब्दात भावना मांडण्याचा प्रयत्न लेखनात दिसून येतो जे कवयित्रींना त्यांच्याशैलीने लिहून घ्यावेसे वाटले असावे, असे मला वाटते. ग्रामीण, शहरी, स्त्रीवाद, वास्तव, निसर्ग, अस्तित्व व नात्यावर भर दिला गेलाय माणूस प्रवाहाच्या कविता संग्रहात आहेत. कवितासंग्रहाच्या शिर्षकावर भर देऊन आजचा वर्तमान दर्शवायला गेलं तर नाती जातीमुळेही वांझ होताना दिसताहेत मनातून. म्हणून माणूस अलिप्त होत चाललाय नाते न उमगताना.
काळजाचा बारकोड स्कॅन करण्यापूर्वी नात्यांनी अपडेट व्हायला हवे माणूस म्हणून, तेव्हाच अनुभवता येईल नातं – नात्यातील आपलेपण…

•प्रविण पवार•
धुळे

•पुस्तकाचे नाव : नाती वांझ होताना
•साहित्य प्रकार : कविता [संग्रह]
•पुस्तकाच्या कवयित्री : मनिषा पाटील
•पुस्तक प्रकाशन : संस्कृती
•पुस्तक मुल्य :१५०/
•वितरक नंबर :९८२३०६८२९२

नाती वांझ होताना कविता संग्रह 3
नाती वांझ होताना कविता संग्रह 5

Leave a Comment