निर्यातबंदीनंतर कांदा दोन ते अडीच हजारांवर! शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदरा कोण?
दिनांक : 13 -Dec-23
सौजन्य : सकाळ
निर्यातबंदीनंतर कांद्याचे दर सरासरी हजार रुपयांनी घसरले आहेत. निर्यातबंदीपूर्वी सरासरी ३३०० ते ३९०० रुपये क्विंटलने विक्री होणाऱ्या कांद्याची आता दोन ते अडीच हजारांवर घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत चालला आहे. (export ban onion price decreasing central government responsible for loss of farmers nashik)केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यात तीव्र असंतोष पसरला आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले आणि व्यापाऱ्यांनी बाजार समित्या दोन दिवस बंद ठेवल्या.
सोमवारी (ता. ११) चांदवड वगळता इतर बाजार समित्या बंद राहिल्या. निर्यातबंदीपूर्वी म्हणजेच ७ डिसेंबरपर्यंत लाल कांद्याला सरासरी ३३०० ते ३९०० रुपये क्विंटल दर मिळत होता. निर्यातबंदी लागू होताच व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी दर घसरवले.
सद्यःस्थितीत सरासरी दोन ते अडीच हजार रुपये क्विंटलने कांद्याची बाजार समित्यांमध्ये विक्री होत आहे. मुळात लाल कांदा जास्त दिवस टिकत नाही. चार ते पाच दिवसांत त्याला कोंब फुटतात व त्याचे पापुद्रेही निघायला लागतात.
यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा विकण्याशिवाय पर्याय नसतो. याचाच फायदा आता व्यापारी घेत आहेत. निर्यातबंदीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हे दर घसरवल्याची टीकाही प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
पण निर्यातबंदी झाली तरी स्थानिक बाजारात कांद्याची आवक वाढतच राहणार असल्याने दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल हे दर टिकून राहतील. किंबहुना त्यात वाढ होण्याचीही शक्यता आहे.
“निर्यातबंदी अचानक लागू केल्याने कांदा व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ते काही दिवस कमी दरानेच कांदा खरेदी करतील. लाल कांदा टिकाऊ नसल्याने विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना हा तोटा सहन करण्याशिवाय पर्याय नाही.”