मोर ओडिशा डायरी
महत्वपुर्ण पुस्तकावरील प्रभावी भाष्य…जरुर वाचावे..
मोर ओडिशा डायरी….
माझं महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच मी UPSC/MPSC परीक्षांचा विचार करत होते. त्यामुळे UPSC/MPSC म्हणजे बेस्ट करीअर या गर्दीतल्या प्रवाहात मी सामील झाले आणि साहजिकच संघ लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS/IPS झालेल्या आणि ते स्वप्न असलेल्या तरुणाईचे हिरो ठरलेल्या मराठी अधिकाऱ्यांची पुस्तके मिळवून वाचू लागले.
तेव्हा काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची काही पुस्तके आली होती. ती साधारण यशाचा मंत्र, परिक्षेसाठी मार्गदर्शन या प्रकारची होती.पण सात आठ वर्षांपूर्वी आलेले श्री. राजेश पाटील सर I.A.S. यांचे ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे पुस्तक वाचून मात्र मी फारच प्रभावित झाले. कुठले जळगाव जिल्ह्यातील लहानसे ताडे गाव, तेथील एक गरीब कुटुंबातील साधा हुशार युवक. गरिबीमुळे मजुरी करतो काय, कमवा आणि शिका पद्धतीने शिक्षण पूर्ण करतो काय, इंजिनिअरिंगला प्रवेश घेणे शक्य झाले नाही तरी statistics मधे पदवी घेऊन त्या विभागात क्लास वन अधिकारी बनतो काय आणि CDS मार्फत भारतीय हवाई दलासाठी पात्र ठरतो. एवढेच नव्हे तर पुढे I.A.S. अधिकारी बनतो काय. हे सगळंच प्रचंड नाट्यमय आणि समाजातील तळागाळ्यातल्या मुलामुलींसाठी प्रचंड प्रेरणादायी होतं. प्रचंड संघर्षातून बुद्धिमत्ता आणि स्वतःवरचा अदम्य विश्वास असला तर सगळी अवधानं सांभाळून आणि सगळी व्यवधानं पार पाडून I.A.S. सारखं ध्येय गाठता येतं ह्याचा ते पुस्तक म्हणजे आदर्श धडा होता.
मी ह्या पुस्तकाची पारायणं केली तेव्हा श्री. राजेश पाटील सर ओडीशामधे posted होते. तोपर्यंत आम्ही मैत्रिणींनी आमची मदत ट्रस्ट संस्था नोंदणी करून अनाथ मुलांसाठी जोशात काम सुरू केले होते. आमच्यासाठीदेखील सदर पुस्तक खुप प्रेरणादायी होते. दरम्यान सरांची पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि त्याच वेळी त्यांचं ‘मोर ओडिशा डायरी’ हे त्यांच्या ओडिशा येथील प्रशासकीय अनुभवांचं पुस्तक प्रकाशित झालं होतं. तेंव्हाच या पुस्तकाबद्दल लिहायचं म्हणून ठरवलं होतं. दरम्यानच्या काळात काही अडचणींमुळे उशीर झाला पण एकदाचं मी मोर ओडिशा डायरी वर माझं मनोगत लिहून पूर्ण केलंच.
तर ओडिशा डायरी सुरू होतं ते लेखक IAS झाल्यानंतर मसूरी इथे प्रशिक्षण पूर्ण करून ओडिशा इथे रुजू होण्यासाठी निघतात तिथपासून आणि संपते ते ओडिशा इथे पंधरा वर्षांचा उल्लेखनीय प्रशासकीय ठसा उमटवून मुं बी पढीबी म्हणजेच अगदी तळागाळ्यातल्या मुलामुलींसाठी शिक्षणाची दारं उघडणाऱ्या पॅटर्नने.
ओडिशाला पोहोचल्यानंतर पुस्तकात सगळ्यात चांगली गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे आयएएस अधिका-याचा सुरूवातीचा प्रशिक्षणार्थी प्रशासकीय प्रवास. सहसा IAS अधिकारी म्हणजे मसुरी येथील प्रशिक्षणानंतर थेट कलेक्टरच बनतो असा गैरसमज लोकांचा असतो. ब-याचशा आयएएस अधिका-यांच्या पुस्तकामधे देखील थेट मोठ्या पोस्टिंग्ज आणि मोठे अनुभव याबद्दलच लिहिलेले असते. मात्र या पुस्तकात श्री.पाटील सरांनी प्रशिक्षणार्थी हा प्रवास गोपबंधू अॕकॕडमी, छत्रपूरचे गट विकास अधिकारी, सोरडाचे तहसिलदार, ओडिशा दर्शन, त्यानंतर आठगडचे प्रांताधिकारी, कोरापुतचे प्रांताधिकारी ते पुढील विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी असा अगदी बारकाव्यांसह आणि तेव्हढ्याच रंजकपणे सांगितला आहे.
त्यामुळे जवळजवळ समग्र ओडीशाच्या विविध सामाजिक, भौगोलिक प्रश्नांची तर ओळख होतेच पण प्रशासनातील गावपातळीपासून असणा-या समस्यांवर चौकटीबाहेरचे धाडस दाखवून मातही करता येते हे वाचकांना समजते. शिवाय वाचकांनी अनुभवलेल्या ब-याचशा आव्हानांची उत्तरे सदर प्रशासकीय प्रवासामधे सापडत असल्यामुळे हा प्रवास रटाळ न वाटता उलट रंजक वाटतो. पुढे काय ते समजून घेण्याची उत्सुकता वाटते. त्यामुळे या प्रवासातील टाकलेल्या धाडी, रॉकेलमिश्रित पेट्रोल डिझेलवर कारवाई, लॕटराईट दगडाचा काळाबाजार बंद करणे, अंमली पदार्थाच्या व्यवसायाविरूद्ध जोरदार मोहिम हे सगळं वाचतांना स्वतः जणू लेखकासोबत त्या त्या धाडसी मोहिमेचे साक्षीदार असल्याचा भास होतो. एव्हढेच नव्हे तर प्रशासकीय स्तरावर अगदी सिनेमात बघावं असं हिरोसारखं इंटरेस्टिंग मिशन असतं हे फार छान वाटतं.
आठगडला आलेला महापूर हे प्रकरण या पुस्तकातलं अतिशय आव्हानात्मक आहे. सहसा अशा महापुराच्या घटनेवेळी सामान्य लोकांना पुरानंतर नेमकी कशी मदत केली जाते तसेच पुनर्वसन कसं केलं जातं अणि मदत कशी पोहोचवली जाते तसेच प्रशासनाला अशा आपत्तीनंतर अगदी लोकांचे प्राण वाचवण्यापासून ते जीवनाश्यक गोष्टी पुरवणे तसेच पीक, मालमत्ता आणि निवास ह्या गोष्टींची पुनर्बांधणी करणे हे प्रशासनासाठी किती आव्हानात्मक असतं हे माहिती नसतं. केवळ शासनाला नावं ठेवायची आणि यामधे होणा-या गैरप्रकारांबद्दल आरोप करायचे एव्हढंच माहिती लोकांना असते.
पण श्री. पाटील सरांनी महापुरानंतरचं प्रशासकीय मदतकार्य, त्यातली तत्परता, गैरप्रकाराचे धोके ओळखून उपाययोजना आणि सगळ्या गोष्टींचं पुनर्वसन हे अगदी प्रामाणिकपणे सांगितलं आहे. अशा आपत्तीच्या वेळी प्रशासन एव्हढ्या विविध पातळ्यांवर मदतीचं काम करत असतं ह्या गोष्टीची या पुस्तकामुळे वाचकांना बहुधा पहिल्यांदाच माहिती मिळते. प्रशासनामधे एव्हढ्या वरीष्ठ स्तरावर अशी आव्हाने यशस्वीपणे झेलण्याची संधी मिळणे आणि ती पार पाडण्याचा वस्तुपाठच या आठगड महापुराच्या प्रकरणातून वाचकांना मिळतो. तसेच राम परिडा ह्या ताकदवान राजकीय व्यक्तीचा विधानसभा उमेदवारी अर्ज बाद करण्याचे दाखवलेले धाडस, त्यामुळे आलेला प्रचंड दबाव आणि कुटुंबाला पुरवावी लागलेली सुरक्षा हे सगळं श्री. पाटील सरांच्या ह्या पुस्तकातील त्यांच्या धाडसाचा दाखला देणारे दाखले आहेत. प्रशासनातील आवश्यक असलेला कणखरपणा आणि निर्भीडपणा हा या गोष्टीमुळे वाचकांना दाद देण्यास भाग पाडतो.
कोरापुत जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतरचे लेखकाचे अनुभवकथन वाचकांना एक प्रशासकीय अधिकारी स्थानिक गोरगरीब लोकांचा चौकटीबाहेर जाऊन किती आस्थेने विचार करू शकतो ह्याचा उत्तम अनुभव देते. रोजगार हमी योजनेतून तेथील शेतकऱ्यांना तिथे पिकणारी फळे पिकवून मो जमी मो बगीचा (माझी जमीन माझा बगीचा) अशा स्वयंपूर्णतेकडे नेणारे तसेच हजारो शेयकऱ्यांना त्याच्या जमिनी परत मिळवून देणारे श्री. राजेश पाटील सरांचे काम वाचून अभिमानाने उर भरून येतो. लालफीतशाहीच्या देशात अशा शेतीबद्दलच्या नावीन्यपूर्ण कल्पना एक. मराठी सरकारी अधिकारी राबवतो हेच अप्रूप वाटते.
या पुस्तकातील ‘नक्षलवादाशी सामना’ हे प्रकरण छातीत धडकी भरवणारं आहे. लेखकाचे ओडिशामधले सहकारी मित्र विनील कृष्णा ह्यांचे माओवाद्यांनी केलेले अपहरण हे अविश्वसनीय अनुभवकथन वाचतांना अंगावर काटा येतो. आपल्या घरापासून, राज्यापासून हजारो किलोमीटर दूर परराज्यात आपले कर्तव्य बजावत असतांना माओवाद्याकडून अपहरण होणे किती भीतीदायक असू शकते हे सदर प्रकरण वाचतांना जाणवते. तो अपहरणाचा थरार, ती घालमेल, विनील सरांच्या पत्नीची अवस्था आणि लेखकाला आलेला सिनेस्टाईल अनुभव सगळेच आपल्याला सुन्न करते. IAS म्हणजे केवळ सुखसीन सुरक्षित जीवन नसून अशा राज्यांमधे कर्तव्य पार पाडतांना प्रसंगी प्राणाशी गाठ असते हे समजते. एकूणच लेखकाने तो प्रसंग रंगवताना तेथील माओवादाची कारणे, त्याचे परिणाम आणि माओवादाचा न थांबणारा प्रसार याबद्दल सविस्तर विश्लेषण केले आहे.
ओडिशा मधे लोकांचा बहुसंख्य व्यवसाय शेती असल्यामुळे पुस्तकातील बराचसा भाग जिल्ह्याचा प्रमुख म्हणून शेतीमधे विविध सुधारणा आणि शेतकरी लोकांना स्वयंपूर्ण बनवण्याचा ध्यास हे वर्णन करणारा आहे. त्याचा प्रत्यय कंधमाळ येथे हळद उत्पादनाचे प्रश्न सोडवणे ह्या माहितीतून येतोच पण आपल्या आधी कार्यरत असलेल्या जिल्हाधिकाऱ्याचं(श्री. किशनकुमार) ह्यांचं कौतुक करतांना आणि त्यांनी राबवलेल्या योजनांचं मोठेपण सांगतांना लेखकाचा उदारपणा ठायी ठायी दिसतो. मग ते जंगल अधिकार कायद्यान्वये आदिवासींच्या जमिनीचे ५२००० दावे निकालात काढणे असो वा तरुणाई साठी अंतरंग महोत्सव अथवा कुरई महोत्सव असो श्री पाटील सर किशनकुमार सरांचे भरभरून कौतुक करतात.
मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पुस्तकात सहसा न दिसणारा हा चांगला गुण आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न ओडिशा डायरी मधे ठिकठिकाणी दिसतो. मयुरभंजचे जिल्हाधिकारी म्हणून अनुभव लिहितांना तर तेथील शेतीव्यवस्थेमधे जणू क्रांती वाटावी असे केलेले वेगवेगळे यशस्वी प्रयोग लेखकाने विषद केले आहेत. बास्कीतळा येथील सर्वोत्कृष्ट दशहरी आंब्यांची माहिती ते विविध गोष्टींचे विक्रमी उत्पादन, स्थानिकांना दलालांच्या कचाट्यातून सोडवून स्वयंपूर्ण करणे, बाजारपेठ मिळवून देणे तसेच सदर प्रयोगांचा पॅटर्न बनणे सगळेच फार मनोरंजक आहे. तसेच तरुणांना कौशल्यधारित अभ्यासक्रमांना पाठवून नोकरीं मिळवून देणे आणि अनाथ मुलांसाठी समन्वय संस्था सुरू करणे हे सगळं अविश्वसनीय आहे.
समन्वयच्या कल्पनेतून शिकलेली आणि घडलेली मुले कलेक्टर राजेश पाटील सरांची मुले अशी ओळख मिळवतात आणि मिरवतात तेंव्हा सरांनी वर्णन केलेल्या निरोपसमारंभातील हृद्य प्रसंग वाचून डोळे पाणावतात.
फायलीन चक्रीवाळाचा सामना आणि फारशी पूवसूचना नसतांना झालेल्या भयंकर हानीतून पुन्हा उभे केलेले लोकांचे आयुष्य हे प्रकरण फारच नाट्यमय आहे. येथे जिल्हाधिकारी म्हणून निर्णयक्षमता, दूरदृष्टी, प्रचंड नियोजन किती गरजेचे असते आणि वेळप्रसंगी टीका सोसून आपल्या योग्य निर्णयावर ठाम राहणे किती आवश्यक असते याचा वास्तुपाठच आहे. शिवाय फायलीन चक्रीवादळाचे आव्हान यशस्वीपणे परतवून लावल्यावर देखील ‘माझं तेंव्हा काही चुकलं का?’ असा प्रश्न देखील ते स्वतःला सतत विद्यार्थी समजून विचारतात.
या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की सहसा आत्मचरित्र असो वा अनुभवकथन, आपण कसे संपूर्ण सर्वगुणसंपन्न आणि आदर्श आहोत असे दाखवण्याची लेखकांची धडपड असते. मात्र इथे श्री. पाटील सरांनी त्यांच्यावर तिथे झालेली टीका,आरोप वगैरे मनमोकळेपणाने मांडले आहेत. त्याची कारणे सांगून वस्तुस्तिथी वाचकांपुढे ठेवली आहे. अशा प्रामाणिकपणातून प्रशासनाची पारदर्शी आणि पुरावाजन्य बाजू समोर येते आणि आपला प्रशासनाबद्दलचा गैरसमज दूर होण्यासाठी मदत होते. ही अजून एक दुर्मिळ गोष्ट पुस्तकात आढळते. श्री. राजेश पाटील सरांनी या पुस्तकात त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या आणि ओडिया भाषेसह ओडीशाला आपलेसे करणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्मिताजी यांच्यादेखील कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे.
मोर ओडिशा डायरी या पुस्तकाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लेखकाची अतिशय प्रवाही आणि खिळवून ठेवणारी सुरेख भाषाशैली. सरकारी अधिका-यांच्या रटाळ आणि शासन निर्णय टाईप जड भाषेचा मागमूसही इथे नाही. एखाद्या कसलेल्या लेखकाने जणू ओडिशा राज्याचे प्रवासवर्ण करावे आणि तेथील सामाजिक प्रश्नांची दर्जेदार भाषेत त्याला जोड द्यावी एव्हढ्या भरीव शैलीमधे श्री. पाटील सरांनी बोजड आणि रूक्ष वाटणारे प्रशासकीय अनुभवकथन अतिशय सुगभ करून सांगितले आहे. अगदी पहिल्या पानापासून आपण लेखकासोबत कनेक्ट होतो आणि पुस्तकभर त्यांच्यासोबत ठिकठिकाणी प्रत्येक घटनास्थळी वावरतो.
शिवाय प्रत्येक प्रकरणाची सुरूवात एखाद्या घटनेने करून वाचकांची उत्सुकता वाढवत नेणे आणि नंतर त्या घटनेतून विविध प्रशासकीय प्रश्न आणि त्याचे उत्तर उलगडत नेणे हे लेखकाचे कसब फारच बहारीचे आहे. त्यामुळे जणू एखादी नाट्यमय कादंबरी वाचावी तसे वाटते. पुढे काय होईल ही उत्कंठा दर प्रकरणागणिक वाटत राहते. हे पुस्तक लेखकाने प्रशासकीय अनुभवकथन न लिहिता निव्वळ ओडिशा दर्शन म्हणून लिहिले असते तरीदेखील खुप मनोरंजक झाले असते एव्हढी ताकद श्री. राजेश पाटील सरांच्या लेखणीमधे आहे.
श्रीमती किरण बेदी ह्यांच्या ‘आय डेअर’ ह्या पुस्तकापासून सामान्य लोकांना प्रशासकीय अधिका-यांचे आत्मकथन अथवा अनुभवकथन कमालीचे आवडू लागले.ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या या पोलादी प्रशासकीय चौकटीआड नेमके काय घडते आणि ह्या अजस्त्र बळकट यंत्रणेविरूद्ध अथवा चौकटीबाहेर जाऊन अधिकारी कसे काम करतात ही प्रचंड उत्सुकता लोकांमधे निर्माण झाली.
नंतरही ब-याच IAS/IPS अधिका-यांनी आपली पुस्तके लोकांसमोर आणली पण ती बव्हतांशी IAS/IPS यशाचा मंत्र आणि वैयक्तिक यशाची गाथा अशाच प्रकारची होती. प्रत्यक्ष व्यवस्थेमधल्या माहिती नसलेल्या गोष्टी, त्याचा लोकांच्या आयुष्याशी असलेला संबंध, राजकीय नाट्य आणि प्रभाव तसेच दबाव आणि प्रशासनातून लोकांपर्यंत पोहोचणारा थेट विकासाचा लाभदायी प्रवास अशा प्रकारचे लेखन मात्र फार कुणी केले नाही. कदाचित प्रशासकीय व्यवधानांमुळे असेल.
मात्र मोर ओडिशा डायरी हे पुस्तक वरील परिमाणांवर खरे उतरते. सगळी पारदर्शकता ठेवून काहीही न लपवता पंधरा वर्षांच्या आव्हानात्मक प्रशासकीय प्रवासाचा हे पुस्तक म्हणजे आयएएस अधिका-याच्या यशाआड असलेल्या सहृदयी आणि प्रामाणिक मराठी माणसाच्या लोकहिताच्या नवोन्मेषी प्रयत्नांचा उत्कृष्ट वस्तुपाठ आहे.
या पुस्तकानंतर अशीच पुस्तके महाराष्ट्राचे सुपुत्र श्री. तुकाराम मुंडे I.A.S. श्री. महेश भागवत I.P.S. श्री. शिवदीप लांडे IPS मेरी फर्नांडिस I.P.S. तसेच श्री. उमेशचंद्र सारंगी I.A.S. ह्यांनीही आपल्या नाट्यमय अनुभवकथनासाठी लिहावी असे मोर ओडिशा डायरी वाचल्यानंतर प्रत्येक वाचकाला वाटेल. तशी उत्सुकता निर्माण होईल.
एकूणच मोर ओडिशा डायरी हे पुस्तक म्हणजे श्री. राजेश पाटील सरांनी निवेदकाच्या भूमिकेतून ओडिशावर लिहिलेला व अनुभवलेला सर्वकष विद्वत्ताप्रचुर लघु प्रबंध आहे.
थोडक्यात हे पुस्तक म्हणजे श्री. राजेश पाटील सरांना कणाकणाने समजलेला ओडिशा त्यांना तनामनाने ओडिशाच्या कणाकणासाठी झोकून देण्याइतपत आपलासा वाटणे आणि त्यासाठी त्यांनी अहोरात्र केलेल्या कर्तव्याची मधुर फळे वाचकांना ओडिशाभर दृग्गोचर होणे असा हदयस्थ दस्तऐवज आहे.
– दीपाली वारुळे
Well Written , Thanks Deepali Warule !