संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह देशातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह देशातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

दैनिक पोलीस शोध
संपादकीय

देशाची सर्वोच्च संस्था म्हणजे संसदेवर बेरोजगार तरूणांनी केलेल्या अयशस्वी हल्ल्याने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर देशातील बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न आणि तरूणांच्या संतप्त भावना या संसदेपर्यंत हल्ल्याच्या स्वरूपात पोहचल्याने यावर केंद्र सरकारने गांभिर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तर ज्याठिकाणी देशाचे प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, गृहमंत्री बसतात त्याठिकाणी अशा प्रकारचा हल्ला होणे म्हणजे सुरक्षा यंत्रणेचे पूर्णपणे अपयश आहे. या हल्ल्यावर राजकारण न होता चिंतन करण्याची आवश्यकता आहे.*

नव्या संसद भवन बांधणीचा आणि त्या संसद भवनात प्रवेशाचा उद्घाटन सोहळा ज्या दिमाखात पार पडला तो या नव्या संसदेवरील हल्ल्याने पूर्णपणे अयशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही. कारण नव्या संसद भवनाची निर्मिती ही एखाद्या व्यक्तीचा अलिशान बंगला नव्हे किंवा एखादी शासकीय भव्य इमारत सुद्धा नाही तर ती देशाने निवडून दिलेल्या खासदारांची, मंत्री महोदयांची इतकेच नव्हे तर प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री आणि देशाचे गृहमंत्री यांच्यासारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तींना बसण्याची ही इमारत आहे. या इमारतीच्या भव्यतेचा-दिव्यतेचा जो प्रपोगंडा करण्यात आला तो साध्या चार फाटक्या बेरोजगार पोरांनी अक्षरशाः उधळून लावला आहे. या संसदेची सुरक्षा व्यवस्था किती तकलादू आणि तीनपाट आहे हे या फाटक्या पोरांनी सिद्ध करून दाखविले आहे. या घटनेत कोणत्याही जहाल दशतवादी संघटनेचे प्रतिनिधी नव्हते हे विशेष. परंतू देशातील बेरोजगार तरूणांचे प्रतिनिधी म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात एका तरूणीसह या चार तरूणांनीज्या पद्धतीने संसदेवर हल्लाबोल केला तो सत्ताधारी राज्यकर्त्यांसाठी चिंतनाचा विषय आहे. तर संसदेच्य सुरक्षेसाठी चिंतेचा विषय आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी म्हणजे बरोबर 22 वर्षापूर्वी देशाच्या संसदेवर एके-47 रायफल घेवून दहशतवादी संघटनेेने हल्ला चढविला होता. या घटनेत पाचही दहशतवादी ठार मारण्यात आले होते. परंतू त्याचवेळी संसदेतील अनेक सुरक्षा रक्षकांचा सुद्धा मृत्यू झाला होता हे विसरून चालणार नाही. अर्थात मृत्यू पडलेल्या या सुरक्षा कर्मचार्‍यांना श्रद्धांजली अर्पण करत संसद सदस्यांनी संसदेत प्रवेश केला होता हे विशेष. परंतू सत्ताधार्‍यांना व सुरक्षा रक्षकानां या तारखेला घडलेल्या घटनाक्रमाची पुनर्रावृत्ती होवू शकते याचा विसर का पडावा ? या हल्ल्याची 13 डिसेंबर ही तारीख देशाच्या इंटेलिजन्स ब्युरोला म्हणजे आयबीला नसावी याचे आश्चर्य वाटते. या देशातील अशा महत्वाच्या घटनांच्या तारखा विसरता येणार नाहीत, असे असतांना देशाचा गृह विभाग नेमके काय करतो आहे यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बेरोजगार तीन युवक एक युवती संसद परिसरात प्रवेश करतात त्यातील दोघे तरूण संसदेत प्रवेश मिळवितात, संसदेच्या आत स्मोक कॅ्रकर लवपून घेवून जातात, संसदेच्या गॅलरीतून खाली उड्या मारतात, स्मोक कॅ्रकर फोडतात, संसदेत सर्वत्र पिवळसर धूर परसतो तो पर्यंत देशाची गुप्तचर यंत्रणा झोपलेली होती का ? देशाची संसद ही सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च असतांना अशा प्रकारची घटना घडणे ही भारताच्या गूप्तचर विभागासाठी, आयबीसाठी, गृह विभागासाठी लाजिरवाणी बाब आहे. या घटनेत काहीही अघटीत घडले नाही ही सर्वांत महत्वाची बाब म्हटली पाहिजे. परंतू या घटनेत काही अघटीत घडले असते तर काय ? संसद भवन परिसरातही बाहेर उभ्या असलेल्या दोघांनी धूराच्या नळकांड्या फोडल्या. ‘इतकी गाफीलश’ सुरक्षा व्यवस्था एव्हढ्या मोठ्या देशाच्या संसदेची कशी काय असू शकते यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. संसदेत प्रवेश करणारे दोन्ही युवक सागर शर्मा आणि मनोरंजन डी. तसेच संसद परिसरात उभा असलेला अमोल शिंदे आणि निलम ही चौघे मंडळी वेगवेगळ्या चार राज्यातील आहेत. ज्यामध्ये अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा आहे आणि चौघेही सामान्य घरातील असून त्यांची आर्थिक परिस्थिती सामान्य असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. म्हणजे खुपिया एजन्सीच्या माध्यमातून हे तरूण आलेले नव्हते, ते कोणत्याही दहशतवादी संघटनेशी जुळलेले नव्हते तर देशातील बेरोजगारीच्या प्रश्नातून त्यांनी सदरचे कृत्य केले असल्याची बाब समोर येते आहे. प्रश्न असा आहे की, तीन टप्प्यातील सुरक्षा कचव भेदत या तरूणांनी आत प्रवेश घेतलाच कसा ? हा प्रश्न शिल्लक राहतोच संसदेत हा प्रकार घडला ही घटना संसदेबाहेर सुरक्षा रुममध्ये दिसत नसल्याने आतमध्ये काय सुरू आहे हे बाहेर कुणालाही कळत नाही. सुमारे 1200 कोटी रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या या नव्या संसदेत सुरक्षा उपकरणे जुन असणे, पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसणे, सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचार्‍यांची भरती बाकी असणे, मेटर डिक्टेटरमधून सर्वांना आत प्रवेश देणे बंधनकारक असतांना या गोष्टींकडे सुरक्षा यंत्रणेचे लक्ष का गेले नाही. किंवा सुरक्षा यंत्रणेतील या त्रुटी अद्यापही का बाकी आहेत हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. वरील गोष्टी सर्वोच्च संस्थेत पाळल्या जात नसतील तर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे काय ? संसद सुरक्षित नसेल तर पुलवामा सारख्या घटना, 23/11 चा मुंबईवरील हल्ला यासारख्या घटना घडत राहतील. चार बेरोजगार तरूण संसदेत सहज प्रवेश करतात, एखाद्या खासदाराचा पास मिळवितात आणि संसदेत प्रवेश करून नळकांड्या फोडतात तरी सुद्धा आम्ही भारताला जगातील तिसरी शक्ती म्हणून मिरवायचे हा ‘अहंकार’ बाजूला ठेवला पाहिजे. देशाच्या संसदेचे कॅमेरे महत्वाचे असून संसदेच्या आत बसलेले लोकप्रतिनिधींची सुरक्षा व्यवस्था महत्वपूर्ण मानली जावी एखादा पक्षी सुद्धा संसदेच्या परिसरात घुसला तरी सुरक्षा यंत्रणेला त्याची सुचना झाली पाहिजे, एखादा उंदीर जरी संसदेत प्रवेश झाला तरी आलार्म वाजला पाहिजे. इतकी संवेदनशिल आणि अलर्ट सुरक्षा यंत्रणा संसदेत आणि संसद परिसरात असायला हवी देशाचे सर्वोच्च मंत्री, लोकप्रतिनिधी याठिकाणी बसलेले असतात. संसदेवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला असा त्याचा अर्थ निघतो. कारगिलच्या मोठ्या भूप्रदेशात पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राचे सैनिक आपल्या देशाच्या हद्दीत घुसून येतात त्यावेळी सुद्धा आमची गुप्तचर यंत्रणा गाफील होती. यापुढील काळात असा घटनाक्रम संसदेवर होणार नाही याची काळजी घेणारी सुरक्षा यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा अमेरिकेसारख्या देशातील वर्ल्ड ट्रेर्ड सेंटरवरील दहशतवादी हल्ला हा जगासाठी एक जीवंत उदाहरण आहे. त्यामुळे भारतीय संसद सुरक्षा व्यवस्थेची या निमित्ताने पुन्हा एकदा समिक्षा व्हावी, परीक्षण व्हावे आणि ते अधिक शक्तीशाली कशी होईल यासंदर्भात तात्काळ कार्यवाही व्हावी. बेरोजगारीचा प्रश्न हा हाताळण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

तुर्तास एव्हढेच…

Leave a Comment