सोयाबीन आणि कापसाकडून अपेक्षाभंग पण शेतकऱ्यांसाठी तूर ठरली गेमचेंजर उच्चांकी दर कुठे मिळाला?

सोयाबीन आणि कापसाकडून अपेक्षाभंग पण शेतकऱ्यांसाठी तूर ठरली गेमचेंजर उच्चांकी दर कुठे मिळाला?

सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स दिनांक : 05 -Dec-23

तुरीचे दर वाढले

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता असतानाच बाजारात तुरीचे दर वाढले आहेत. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला १० हजार ६२५ रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. खुल्या बाजारात तूर डाळीची दरवाढ कायम असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडत आहे. हंगामात एवढा दर प्रथमच मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा तुरीने नूर वाढवला असल्याचे दिसून आले.आधी दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने नुकसान झाल्यामुळे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा किमान २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी राहण्याचा अंदाज आहे.

गेल्या हंगामात देशात ३३ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा उत्पादन ३० लाख टनांपेक्षाही कमी राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करीत आहेत. नवीन तूर महिनाभरानंतर बाजारात दाखल होण्यास सुरुवात होईल. जानेवारीनंतर बाजारातील आवक वाढेल.सध्या बाजारात तुरीला सरासरी १० हजारांचा भाव मिळत आहे.

आफ्रिका आणि इतर देशांमधून तूर आयात केली जात असून त्यासंदर्भात करार झाले आहेत. बाजारात नवीन तुरीची आवक आणि आयात यामुळे काही दिवस दर दबावात राहतील. पण, आयात मालही आपली गरज पूर्ण करू शकणार नाही. तुरीचा पुरवठा आणि मागणी यात मोठी तफावत असल्याने बाजारात दर पुन्हा वाढतील. आताही तफावत जास्त असल्यानेच तूर १० हजारांना विकली जात आहे. पुढील हंगामातही हीच स्थिती राहू शकते. त्यामुळे तुरीला चांगला भाव मिळू शकतो, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी ३५ क्विंटल तुरीची आवक झाली. तुरीला किमान १० हजार आणि कमाल १० हजार ६२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.शुक्रवारी अमरावती बाजार समितीत सरासरी ९ हजार ७५० रुपये दर मिळाला होता. दिवाळीच्या आधी बाजार सुरू असताना तूर किमान १० हजार आणि कमाल ११ हजार ८१५ रुपये दराने विक्री झाली. त्या काळातही सरासरी १० हजार ५०० रुपयांचा दर होता. नंतर दिवाळीच्या सुट्यांमुळे बाजार बंद होता. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी तूर सरासरी १० हजार रुपयांनी विक्री झाली. आता दरवाढ दिसून आली आहे.गेल्या वर्षी किरकोळ बाजारात १२० रुपये किलो दराने मिळणारी तूर डाळ हंगामाच्या सुरुवातीला १६० रुपये किलोवर पोहोचली आहे. सध्या डाळीच्या दर्जानुसार किंमत ही १५० ते १७० रुपये किलोपर्यंत आहे. तूरडाळीच्या किमतीत सणासुदीच्या काळात वाढ होतच असते.

 फुल शेती  तूर शेती

Leave a Comment