कुठवर असंच फसत रहायचं?
मित्रांनो वर्षानुवर्ष आपण आणि आपल्यासारखे अनेक जण फसवले जातोय आणि आपल्याला याचा थांगपत्ताही लागू दिला जात नाही! आता शिकून सवरुन आपण मोठे झाल्यावर तरी याचा धांडोळा घेणार आहोत की नाही? हा खरा प्रश्न आहे! जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला काही ‘प्रस्थापित’ निदर्शनास येतात. तेव्हा हा प्रस्थापित आला कुठून? आणि त्याला प्रस्थापित बनविले कुणी? असे प्रश्न उभे राहतात. आमच्यासारखेच दिसणारे हे लोक प्रस्थापित कसे बनले हे समजून घेण्याची तीव्र इच्छा आमच्या मनात का निर्माण होत नाही? हा आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे!
मानवी इतिहासाचा मानवी जीवनाच्या कोणत्याही पातळीवर मागोवा घेतला असता एक गोष्ट निश्चितपणे अधोरेखित करता येते ती म्हणजे: “सत्ता आणि अस्तित्वाची लढाई मानव सतत लढत आला आहे, आजही लढतो आहे आणि पुढेही तो हीच लढाई लढतच राहणार आहे.” या लढाईत जो जिंकला तो ‘सत्ताधारी’ अर्थात ‘प्रस्थापित’ बनला. या सत्ताधाऱ्यांनी सत्ता राबविण्यासाठी वेळोवेळी ‘नियम’ तयार केले. सांप्रतकाळी आपण त्याला ‘कायदे’ असे म्हणतो. आता हे तर सूर्यप्रकाशाइतके ढळढळीत सत्य आहे की नियम बनवणारा कुणीही असला तरी तो नियम बनवताना ते आपल्या फायदयाचेच बनविणार!
अगदी अलिकडची काही उदाहरणे तपासून पहा.
अ) आमदार -खासदारांच्या पगार व भत्यांचे नियम
ब) त्यांच्या शैक्षणिक पात्रतेसंबंधीचे नियम
याच धर्तीवर सामाजिक पातळीवरच्या प्रस्थापितांनी देखील आपापल्या फायद्याचेच नियम बनवले आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवे.
जातीधर्मात भेदभाव निर्माण करीत आपलाच वरचष्मा कायम राहील या हेतूने निर्माण केलेले हे काही नियम नमुन्या दाखल तपासून पहा..
अ) शुद्रांना शिक्षणाचा अधिकार नसणे
ब) शुद्रांनी फक्त सेवा क्षेत्रातच काम करणे
इतकेच नाही तर कौटूंबिक पातळीवर ‘पुरुष’ सत्ताधारी असल्यामूळे त्यांनी केलेले काही नियम तपासून पहायला हरकत नाही..
अ) स्त्रियांनी घरकाम करावे. अर्थार्जन हा त्यांचा प्रांत नाही.
ब) पती हाच परमेश्वर मानावा. तिने पतिव्रता असावे.
ही व्यवस्था कायम अबाधित राहावी म्हणून या सत्ताधारी वर्गाने खालच्या वर्गाचे बौद्धिक कशा प्रकारे घेतले आहे हे पाहाणे देखील रंजक ठरेल.
काही उदाहरणे आपल्या माहितीसाठी पुढे देत आहे.
अ) हाताची पाच बोटेसारखी नसतात!
समाजातील वेगवेगळ्या पातळीवर होऊ घातलेल्या भेदभावाचे समर्थन करण्यासाठी हे मिथक सर्रास वापरले गेले आहे.
ब) जाता जात नाही ती जात!
जाती अंताची लढाई लढू पाहाणाऱ्यांचा हिरमोड करण्यासाठी वापरले जाणारे हे एक अस्त्र !
क) बळी तो कान पिळी!
सत्ताधाऱ्यांचा शोषणाचा अधिकार कसा योग्य आहे हे अधोरेखित करणारा हा खरे तर दुर्विचार; पण त्याला सुविचाराचा दर्जा दिला आहे !
ड) तळे राखील तो पाणी चाखील!
सत्तेचा उपभोग घेताना केलेल्या भ्रष्ट आचरणाचे समर्थन अतिशय समर्थपणे करण्यासाठी हे ऐकवले जाते.
इ) सत्यमेव जयते!
सत्याचाच विजय होतो असं सांगून ज्यांचा विजय झाला तेच सत्य आहेत! हे समाजाच्या गळी उतरवलं जातंय. गेल्या हजारो वर्षात झालेली कोणतीही लढाई घ्या, कोणतंही युद्ध घ्या. तुमच्या असं लक्षात येईल की, त्यात विजयी होणाऱ्या प्रत्येकानं असत्याचा आधार घेतला आहे. हे असत्य कधी युद्ध चातुर्य म्हणून वाखाणलं गेलं तर कधी त्याला मुत्सद्दीपणाचा सदगुणी वर्ख लावला गेला, कधी त्यालाच गनिमी कावा म्हणून गौरवण्यात आलं. हा इतिहास आहे. अलिकडे त्याला चाणक्यनीती म्हटलं जातं. कदाचित त्यामुळेच सारे चाणक्य केवळ सत्ताधीशांच्याच बाजूला जन्माला येताना दिसतं.
फ) पाचामुखी परमेश्वर!
संख्याबळाचा गैरफायदा सहजपणे मिळवता यावा यासाठी वापरली जाणारी ही आणखी एक युक्ती आहे. अल्पसंख्य समाजाला तारणारा परमेश्वर बहुसंख्यांच्या मुखी कसा जन्म घेईल? हा प्रश्न आपल्याला का पडत नाही?
“देव देवळात रहात नाही.” असं निर्भिडपणे सांगणाऱ्या संतजनांना देवत्व देऊन त्यांचीच देवळं बांधण्यात आली. कुणी बांधलीत ही देवळं? त्या- त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनीच ही देवळं बांधली.
वैदिक काळात कोणतीही मंदिरं, देवळं किंवा प्रार्थनास्थळं अस्तित्वात नव्हती. गौतम बुद्ध, महावीर यांच्याही काळात ती नव्हती. त्यांनी देवळं, मंदिरं किंवा प्रार्थनास्थळांत बसून उपदेश केला नाही. ते भ्रमण करीत राहीले. लोकांशी बोलत राहीले. पुढे सम्राट अशोकाने स्तूप बांधले. त्यानंही देवळं, मंदिरं किंवा प्रार्थनास्थळं बांधली नाहीत. त्यापुढच्या काळातल्या हिंदू राजांनी मात्र अनेक देवळं आणि मंदिरं बांधली. या
देवळांभोवती एक अर्थव्यवस्था उभी राहिली. त्यातून पूजारी आणि व्यापाऱ्यांचं भलं झालं, सामान्य माणसांचं नाही! थोडक्यात काय तर, राजकीय सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून धार्मिक सत्ताधाऱ्यांनी आपल्या अनेक पिढयांच्या उदरनिर्वाहाची सोय त्यातून करून ठेवली.
मुसलमान आक्रमकांनी अनेक देवळं आणि मंदिरं फोडली, ती तिथली संपत्ती लुटण्यासाठी! इतकी मंदीरं लुटली गेली तरीही आमचं मंदिरांचं वेड तसुभरही कमी झालं नाही. प्रस्थापितांनी तसं होऊ दिलं नाही!
भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वाचल्यावर काही गोष्टी आपल्या नीट लक्षात येतात. जसे की, डॉक्टर बाबासाहेब नेहमी ‘जातीअंताचा’ ध्यास घेऊन जगले! आणि प्रस्थापितांनी ‘अनंत जाती’ जीवंत ठेवण्याचा अहोरात्र प्रयत्न केला! ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाचे आपण कसे अगदी मातेरे करुन ठेवलेत! हा एवढा मोठा विचारवंत एकटा पडला, की प्रस्थापितांनी त्यांना प्रयत्नपूर्वक एकटे पाडले?
अगदी अलिकडचीच गोष्ट सांगायची म्हटलं तर, साध्या महाविदयालयीन प्रवेशाच्या अर्जात आता नुसती जात लिहून भागत नाही, तिथे उपजात किंवा पोटजात देखील लिहावी लागते. तेव्हा कुठे तो ऑनलाईन अर्ज सबमिट होतो! जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या भारतातली प्रत्येक निवडणूक आजही जातीभोवती पिंगा घालतेय! अगदी राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही त्याला अपवाद राहीलेली नाही.
“आमचा राम! तुमचा हराम!” असं म्हणत, सत्ता आणि अस्तित्वासाठीचा हा संघर्ष माणसातल्या माणसाचा दरवेळी गळा घोटतो आहे. हतबल होऊन आम्ही तथाकथित सामान्य माणसे निमूटपणे हे सगळे उघड्या डोळयांनी बघतो आहे. अर्थात ज्याला ‘सारं काही मान्य’ असतं तो ‘सामान्य’ या न्यायाने पाहीलं असता, हे असं घडलं नाही तरच ते ‘नवल’ म्हणावं लागेल! हे सगळं समजल्यावर आपण असंच फसत रहायचं का? हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. अर्थात, आपली भूमिका काय असावी? हे ज्यानं त्यानं स्वतंत्रपणे विचार करून ठरविण्याची बाब आहे. हे वादातीत असलं तरी आम्ही स्वतंत्रपणे नीटनेटका विचार करु शकू का? हा खरा मुद्दा आहे.
लेखक
© अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहमदनगर, संपर्क: ९७६६६६८२९५