कोण आहेत जननायक ‘भारतरत्न’ कर्पूरी ठाकुर…..?

मुख्यमंत्री असतानाही मुलीचं लग्न साधेपणानं केलं, नोकरी मागायला आलेल्या मेव्हण्याला 50 रुपये देऊन पाठवलं; कोण आहेत जननायक ‘भारतरत्न’ कर्पूरी ठाकुर…..?

भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, राजकारणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) जाहीर करण्यात आला आहे. दलित आणि मागास वर्गासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना जननायक (Jananayak Karpoori Thakur) असंही म्हटलं जातं. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत त्यांना सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

बिहारच्या राजकारणात सलग 36 वर्षे आमदार, एकदा उपमुख्यमंत्री आणि दोन वेळा मुख्यमंत्री भूषवलेले कर्पूरी ठाकुर यांची राहणीमान मात्र अत्यंत साधी होती. एवढी वर्षे राजकारणात असूनही त्यांच्याकडे स्वतःची गाडी नव्हती. आमदारकीच्या भत्त्याशिवाय कधीही एकही रुपया ज्यादा न घेतलेल्या कर्पूरी ठाकुर हे राजकारणातील एक आश्चर्यच म्हणावं लागेल.

राजकारणातले ते सर्वात गरीब नेते म्हणून ओळखले जातात. 17 फेब्रुवारी 1988 रोजी पाटण्यामध्ये त्यांचं निधन झालं.

छोडो भारत आंदोलनात तुरुंगवास.
मुख्यमंत्रीपदी असतानाही त्यांनी कधीही आपली तत्वे सोडली नाहीत. कर्पूरी ठाकूर यांनी भारत छोडो आंदोलनात उडी घेतली. त्यावेळी त्यांना 26 महिने तुरुंगात राहावे लागले. 22 डिसेंबर 1970 ते 2 जून 1971 आणि 24 जून 1977 ते 21 एप्रिल 1979 पर्यंत त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. कर्पूरी ठाकुर यांनी अखेरपर्यंत समाजवादी विचारसरणीवर विश्वास ठेऊन राजकारण केलं.
कर्पूरी ठाकूर यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात पितौंझिया या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. कर्पूरी ठाकूर यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्यांनी पाटणा विद्यापीठातून पदवी घेतली. कर्पूरी ठाकूर हे विद्यार्थी दशेपासूनच राष्ट्रीय चळवळीत सक्रिय होते.

1952 मध्ये पहिल्यांदा आमदार.
1942 च्या भारत छोडो आंदोलनात झालेल्या तुरुंगवारीतून सुटल्यानंतर कर्पूरी ठाकुर यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. 1952 मध्ये, कर्पूरी ठाकूर पहिल्यांदाच बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी ताजपुरी विधानसभा मतदारसंघातून सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर ते सलग चार वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1967 मध्ये त्यांना बिहारचे उपमुख्यमंत्री करण्यात आले.
सन 1970 मध्ये कर्पूरी ठाकूर बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी गरीब आणि दलितांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. कर्पूरी ठाकूर इतके दिवस आमदार आणि मुख्यमंत्री राहिले पण त्यांना गाडीही घेता आली नाही.

मुलीचं लग्न साधेपणानं केलं.
कर्पूरी ठाकुर हे त्यांच्या स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जायचे. मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुलीचं लग्न अगदी साध्या पद्धतीने त्यांनी केलं. मुलीसाठी मुलगा शोधण्यासाठी त्यांनी कधीही सरकारी वाहन वापरलं नाही. मुलीचं लग्न हे देवघरात करायची त्यांची इच्छा होती, पण पत्नीच्या हट्टापायी त्यांना पितौंझिया या गावी मुलीचं लग्न केलं. पण त्यामध्ये कुणाही मित्राला, राजकारणी वा सरकारी अधिकाऱ्याला निमंत्रण दिलं नाही. तसेच त्यांनी त्यांच्या सुरक्षा कर्मचारी आणि जिल्हा प्रशासनातील कुणालाही त्या लग्नासाठी बोलावलं नाही.

नोकरी मागायला आलेल्या मेव्हण्याला 50 रुपये दिले…
कर्पूरी ठाकुर मुख्यमंत्री असताना त्यांचा मेहुणा त्यांच्याकडे नोकरी मागण्यासाठी आला. मुख्यमंत्र्यांनी शिफारस केली तर त्यांना नोकरी मिळेल असं त्यांने सांगत नोकरी लावून देण्याची मागणी केली. त्यावेळी कर्पुरी ठाकुर यांनी त्यांच्या खिशातून 50 रुपये काढून त्याला दिले. गावी जाऊन वडिलोपार्जित व्यवसाय कर, केस कापण्याचे साहित्य खरेदी कर असं त्याला सांगितलं.

बिहारमध्ये प्रथमच कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री असताना ना-नफा जमिनीवरील महसूल कर रद्द करण्यात आला. कर्पूरी ठाकुर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी तळागाळातील समाजाला शिक्षण मिळावं यासाठी पुढाकार घेतला. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन सुधारणांना हात घातला. त्यामुळे बड्या जमीनदारांकडून भूमीहिन दलितांकडे जमिनीचं हस्तांतर झालं.

सौजन्य, माहिती सेवा ग्रुप.
डॉ. सुनील इनामदार, संग्रहक, ९८२३०३४४३४.

Leave a Comment