तीन राज्यातील काँग्रेस पक्षाच्या पराभवाची कारण मिमांसा

तीन राज्यातील काँग्रेस पक्षाच्या पराभवाची कारण मिमांसा

सौजन्य:दैनिक पोलीस शोध संपादकीय
दि.05/12/2023

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या दोन राज्यांवर भाजपाने ताबा मिळविला. तर मध्यप्रदेशात काँग्रेस पक्षाला आपला करिष्मा दाखविता आला नाही. परंतू तेलंगाणात बीआरएस पक्षाला बाजूला सारत काँग्रेस पक्षाने तेलंगाणाची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. भाजपा तीन राज्यात मिळविलेल्या यशाचा जल्लोष साजरा करत असतांना काँग्रेस पक्षाने आपल्या पराभवाची कारण मिमांसा करावी.
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील विजयाने उत्तर भारतात भाजपाने आपली पकड घट्ट केली आहे. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, हिमाचल प्रदेश या उत्तरेकडील राज्यांमध्ये लोसभेच्या जवळपास 200 जागा आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधील तीन राज्यांच्या विजयामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत उत्तर भारतात भाजपला त्याचा मोठा फायदा मिळू शकेल. हिंदी भाषिक राज्यातील राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये गमावणे काँग्रेससाठी मोठी हानी आहे. उत्तरेत हिमाचल या लहानशा राज्याची सत्ता काँग्रेसकडे आहे. परंंतू मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यातील विजयामुळे भाजपा आता बारा राज्यांमध्ये स्वःबळावर सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, सिक्कीम, मेघालय आणि नागालँड या चार राज्यात आघाडी समवेत भाजपा सत्तेत आहे. तर कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगाणा येथे  काँग्रेस स्वःबळावर तर बिहार, तामिळनाडू, झारखंड या राज्यात काँग्रेस मित्र पक्षांसोबत सत्तेत आहे. या निवडणूकीत तेलंगाना सोबत किमान छत्तीसगडची सत्ता काँग्रेसला मिळायला हवी होती. त्या पद्धतीने रणनिती देखील आखली जायला हवी होती. कारण प्रचार मोहिमेत सत्ताधारी पक्षासोबत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अप्रत्यक्षपणे सोबत असते. त्याचा फायदा देखील सत्ताधारी पक्षाला होत असतो हे नाकारून चालणार नाही. विरोधी पक्षाला मात्र आपली संपूर्ण प्रचार यंत्रणा स्वःबळावर आणि पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बळावरच राबवावी लागते. त्यामुळे विरोधी पक्ष प्रचार मोहिमेत कमी पडतांना दिसतो. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेष बघेल यांच्या विरोधातील महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणावरून भाजपाने काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराच्या आरोपांचा केलेला भडीमार हा मतदारांसाठी प्रभावी ठरला. या अ‍ॅपच्या मालकांनी 500 कोटी रूपये मुख्यमंत्र्यांना दिल्याचा आरोप भाजपाने ज्या ताकदीने केला त्याचा परिणाम देखील छत्तीसगडीच सत्ता गमावण्यात झाला. तर मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी शेतकर्‍यांसाठी राबविलेल्या विविध योजनांमध्ये सिंचनासाठी केलेला मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दिड कोटी महिलांच्या खात्यावर ‘लाडली बहना’ योजनेअंतर्गत जमा होणारे साडेबाराशे रूपये भाजपाच्या विजयासाठी प्रभावी ठरले.  याच वेळी काँग्रेस पक्षाचे नेते कमलनाथ, दिग्वीजय सिंह यांचे तेच तेच चेहरे पाहून जनता कंटाळली आहे. हा बदल करण्यात काँग्रेस आजही अपयशी ठरते आहे. काँग्रेस पक्ष प्रत्येक राज्यात नवे नेतृत्व उभे करण्यास अद्यापही तयार नाही. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे सारखा युवा नेता भाजपात दाखल झाला. तर सचिन पायलट सारखा नेता प्रचंड नाराज आहे हे पक्ष नेतृत्वाच्या का लक्षात येत नाही हे न सुटणारे कोडे आहे. राजस्थानमध्ये देखील अशोक गेहलोत यांच्या सोबत सचिन पायलट यांचे असलेले मतभेद सत्ता गमावण्यास कारणीभूत ठरले. दिल्ली सारख्या राज्यात स्व. शिला दिक्षीत यांच्याशिवाय दुसरे नेतृत्व मागील वीस वर्षात काँग्रेस उभे करू शकले नाही. त्याचा परिणाम आज ते पूर्ण राज्य आम आदमी पक्षाच्या ताब्यात गेले आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वांना संधी देवून पराभव स्विकारलेला काँग्रेसला परवडेल परंतू सत्तरीच्या पुढे गेलेल्या देशातील सर्व काँग्रेस नेत्यांना रिटायर्ड करण्याची आवश्यकता आहे, परंतू काँग्रेसकडे हे साहस नाही. हे साहस केवळ भाजपात आहे. परंतू संघटन क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर नेतृत्व बदल केल्याशिवाय काँग्रेसला देशाचे नेतृत्व मिळणे शक्यच नाही. भारतीय जनता पक्षात पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख, विभाग प्रमुख, ओबीसी प्रमुख, महिला प्रमुख, अध्यात्मिक आघडी प्रमुख, सोशल मीडिया प्रमुख अशा प्रकारच्या 27 आघाड्या आणि या आघाड्यांचे प्रमुख म्हणजे पदे घेवून घरात बसलेला काँग्रेसचा पदाधिकारी नव्हे तर घरा-घरात पोहचणारे भारतीय जनता पक्षाचे खंदे स्वयंसेवक आहेत. अशा प्रकारचे संघटन देशात कोणत्याही पक्षाजवळ नाही काँग्रेस सारख्या सव्वाशे वर्षाची परंपरा असलेल्या आणि स्वतंत्रा आंदोलनाचा इतिहास असलेल्या पक्षात अजूनही संघटनात्मक अभाव गाव पातळीपासून तर केंद्रीय पातळीपर्यंत आहे हे नाकरता येणार नाही. एव्हढ्या मोठ्या पक्षाची देशात केवळ कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यात सत्ता आहे. तर तीन राज्यात मित्र पक्षांबरोबर काँग्रेस सत्तेत आहे. महत्वाची बाब म्हणजे भाजपामध्ये संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी केवळ एकाच नावाचा मंत्र जपतात ते नाव म्हणजे नरेंद्र मोदी देशाच्या संरक्षण मंत्री, गृहमंत्री असो, अर्थमंत्री असो तो केवळ मोदी यांच्या नावानेच आपल्या भाषणाला सुरूवात करतो, हा विश्वास काँग्रेस पक्षात निर्माण झालेला नाही. आत्मविश्वास गमावलेला कार्यकर्ता, कुठेही संवाद नसलेले पदाधिकारी, नेत्यांमधील अहंकाराचा चढता आलेख, मी मोठा की तु मोठा हा अहंभाव, पक्षाची ध्येय धोरण समाजापर्यंत नेवू शकणार्‍या कार्यकर्त्यांचा अभाव, महिला व युवकांचे संघटन नसलेला पक्ष अशी काँग्रेस पक्षाची आजची स्थिती आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत किंवा विधानसभेच्या निवडणूकीत ‘इंडिया’ या घटकपक्षांचे नेतृत्व करतांना आता काँग्रेस पक्षाला नमते घ्यावे लागेल, रूबाब करता येणार नाही कारण आप सारख्या लहानशा पक्षाकडे देशातील दोन राज्ये आहेत. त्यामुळे लोकसभेच्या जागा वाटपात आता काँग्रेसला माघार घ्यावी लागेल यात शंका नाही. म्हणून काँग्रेस पक्ष जो देशातला मुळ पक्ष आहे त्याने प्रादेशिक पक्षांशी कोणत्या स्तरापर्यंत तडजोड करावी यावर देखील पक्षश्रेष्ठींना चिंतन करण्याची आवश्यकता आहे. पराभव झाला तरी चालेल परंतू काँग्रेसने स्वःबळावर निवडणूका का लढू नयेत यावर देखील विचार करण्याची गरज आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव हा संघटनात्मक संचनेत परावर्तीत करण्यात पक्षाचे नेते, पदाधिकारी कमी पडलेत हे देखील नाकारून चालणार नाही. महिला आणि युवकांना आकर्षित करण्यासाठी कोणती योजना काँग्रेस पक्षाकडे आहे ? यावर विचार करावा लागेल. प्रियंका गांधी या देशपातळीवर संघटनात्मक वाढीच्या दृष्टीने फिरतांना दिसत नाहीत तर प्रधानमंत्री परावर असतांना देखील नरेंद्र मोदी देशाच्या कोणत्याही कोपर्‍यात जावून पक्षाला नवसंजीवनी देत असतात याकडे देखील दिल्लीचे काँग्रेस पदाधिकार्‍यांनी लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. पक्षाचे ध्येय धोरणांना ज्यामध्ये महागाई, बेरोजगारी यासारखे प्रश्न राहुल गांधी यांनी प्रमुख मुद्दे म्हणून प्रचारात वापरले परंतू त्यांचा प्रपोगंडा करण्याची शक्ती काँग्रेस पक्षाकडे नाही, यावर देखील विचार करावा लागेल. एक पक्ष, एक कॅमेरा, एक व्यक्ती फोकस करणे ही साधी गोष्ट नाही परंतू भाजपात लहानशा खेड्यातल्या पदाधिकार्‍यापासून तर राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांपर्यंत, केंद्रातील सर्व मंत्री मंडळापासून तर 16 राज्यातील सर्व भाजपा मुख्यमंत्र्यांपर्यंत एकच नाव बोलले जाते ही बाब सुद्धा अनुकरणीय अशीच आहे. तसे काँग्रेस पक्षात का बोलले जात नाही हा मोठा प्रश्न आहे. काँगे्रस पक्षात जिल्हा निहाय, राज्य निहाय, स्वयंभू नेते आहेत ते स्वतःला राहुल गांधींपेक्षा मोठे समजतात इथेच काँग्रेसचा पराभव होतो. या शिवाय काँग्रेस पक्षात प्रचंड नैराश्य आलेले असून गटबाजी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास गमावलेला असून संघटनेत मोठ्या प्रमाणावर शिथीलता आलेली आहे. त्यामुळे पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी देशपातळीवर युवकांची शिबीरे सेवा दलाची शिबीरे घेतली जावून त्यात पक्षाचा इतिहास, राष्ट्रीय एकात्मतेसाठी देशप्रेमाची नवी व्याख्या, सर्वधर्म समभाव सांगूण तरूणांना आकर्षित करण्याची गरज आहे.

तुर्तास एव्हढेच….

Leave a Comment