उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर एकत्रित जल परिषद

उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर एकत्रित जल परिषद

उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर काम करणारे सर्व जल समीत्या व संघर्ष समितीना विनम्र  आवाहन आपण सर्वांनी पुढील विषयांवर  विचार करून एकत्रित जल परिषद घेऊ या. आणि लवकरात लवकर पुढील कार्यक्रम व उद्दिष्ट साठी तत्पर होऊया

उत्तर महाराष्ट्रात ५० हून अधिक लहान मोठ्या नद्या आहेत.तापी,आनेर,बोरी,नर्मदा,उंबरी सुसरी,गोमाई,नार,पार,अंबिका,औरंगा, दमणगंगा इत्यादि पश्चिम वाहिनी तर मोसम,पांझरा,गिरणा व गोदावरी इत्यादि पूर्वावहिनी नद्या आहेत.

तापी नदी खोऱ्यातील आपल्या हिश्याचं व हक्काचं 190 टीएमसी पाणी आणि नार-पार खोऱ्यातील सुमारे 250 टीएमसी पाण्यापैकी किमान 50 टीएमसी पाणी तुटीच्या गिरणा खोऱ्यात वळवणं,अडवणं,साठवणं व जिरवणं आणि वापरणं महत्वाचं आहे.तर आणि तरच उत्तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल अन्यथा येत्या काही वर्षात उत्तर महाराराष्ट्रात जलसंकट उभं राहील आणि उत्तर महाराराष्ट्राचं वाळवंट होईल.

भविष्यातील जल संकटावर मात करण्यासाठी विविध सामाजिक व  स्वयंसेवी संघटनांनी आपआपल्या परीने व क्षमतेने जलदूत व जलप्रेमी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेस जलसाक्षर करणे,जनजागृती करणे, जलाचं महत्त्व व गरज यासंबंधी प्रचार व प्रसार करणे,जनलढा उभारणे, रास्तारोको करणे,मोर्चे व रॅलीसाठी रस्त्यावर उतरणे,आंदोलन करणे, उपोषण,धरणे व जलसमाधी आंदोलन करणे इत्यादि.

संसदीय आयुधांचा वापर करुन शासनाला व सरकारला धारेवर धरणे व अनुकूल निर्णयास भाग पाडणे साठी कंबर कसली आहे जल,जमीन व जंगल या राष्ट्रीय संपत्तीचं संरक्षण,संवर्धन व संक्रमण करणं ही काळाची गरज आहे म्हणून सामाजिक चळवळ उभी राहिली आहे.

उत्तर महाराष्ट्र जलसंपन्न,जलसमृद्ध व  दुष्काळमुक्त व्हावा.पिण्यासाठी,शेतीसाठी व  उद्योगासाठी पुरेसे व अत्यावश्यक पाणी उपलब्ध व्हावं आणि उत्तर महाराष्ट्रात जलक्रांतीतून हरीतक्रांती, हरीतक्रांतीतून कृषीक्रांती,कृषीक्रांतीतून श्वेतक्रांती आणि श्वेत क्रांतीतून औद्योगिक क्रांती  वाटचाल करणे हेच सर्व संघर्ष समितीचं अंतिम उद्दिष्ट व ध्येय आहे. त्यासाठी  विविध विभागातील स्थानिक पातळी वरील सामाजिक व स्वयंसेवी संघटना कार्यरत आहेत.

भूगर्भातील भुजल पातळी वाढविण्यासाठी नदी नांगरणी करणे,नदी नाल्यांचं खोलीकरण व रुंदीकरण करणे,विहीर व बोअर पुनर्भरण करणे,जल शिवार योजना राबविणे इत्यादि उपक्रम गावागावात खेडोपाडी राबविले जात आहेत. त्यामुळे  जनता,सजग,सतर्क व सुजाण होत आहे.पाण्याचं महत्त्व,महिमा व  महती घरोघरी पोहचली आहे.हेच लोक चळवळीचं सुंदर फलित आहे.

१.उत्तर महाराष्ट्र जल परिषद.
२.नर्मदा सरोवर संघर्ष समिती,
३.पाडळसरे धरण जनआंदोलन समिती,अमळनेर.
४.नार-पार-गिरणा नदीजोड संघर्ष समिती.
५.वांजुळ प्रकल्प समिती,मालेगाव.
६.अक्कलपाडा धरण संघर्ष समिती,धुळे
७.मांजरपाडा-२ संघर्ष समिती, बागलाण
८.रहाट्यावड धरण संघर्ष समिती,मंदाणे
९.तापी जल उपसासिंचन योजना संघर्ष समिती,नंदुरबार.
१०.खान्देश हितसंग्राम संघर्ष समिती.
११. तापी बुराई संघर्ष समिती
१२. डावा कालवा जल समिती
१३.पांझरा काठ बचाव समिती.
१४.भूजल वारकरी चळवळ
१५ मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा
१६. गिरणा डावा उजवा  कालवा कृती समिती
१७.भात नदी बचाव समिती                                       १८.पांझण डावा कालवा लाभधारक शेतकरी समिती

श्री.एन.एम.भामरे
कार्याध्यक्ष
उत्तर महाराष्ट्र जल परीषद

उत्तर महाराष्ट्र नको कोकान्हदेश विभाग तयार करा

1 thought on “उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर एकत्रित जल परिषद”

Leave a Comment