पाण्याची लढाई

पाण्याची लढाई

सत्तर वर्ष उलटून गेलेत
तरी तुला कुठे भान आहे
लुटून नेलय पाणी सगळं
खांदेश कोरडाठाण आहे..!

दऱ्या तुझ्या,डोंगर तुझे
पाणी दुसराच लाटत आहे
भूमीपुत्र असूनही तू मात्र
बाहेर जीवन काढत आहे
राजरोस तुला बरबाद केले
तरी तुझं कुठे ध्यान आहे
लुटून नेलय पाणी सगळं
खांदेश कोरडाठाण आहे..!

किती घेशील सोंग झोपेचं
एक दिवस उठावेच लागेल
कुणीही मदत करणार नाही
लढाईत तुला लढावेच लागेल
पाणीचोर तू ओळखत नाही
वैरींना मोकळच रान आहे
लुटून नेलय पाणी सगळं
खांदेश कोरडाठाण आहे..!

रिकामी धरणे,शुष्क विहिरी
पाट पूर्ण आटले आहेत
सुनसान गावांच्या पारांवर
म्हातारे फक्त बसले आहेत
गांव शिवाराच्या मातीनं पोसलं
उपकाराची कुठे तुला जाण आहे
लुटून नेलय पाणी सगळं
खांदेश कोरडाठाण आहे..!

नार-पार अनं दमन गंगेला
जो नाही तो ओढत आहे
झोपलेला खांदेशी गोधडीत
स्वप्नच तेवढं मढत आहे
विचार करा भाऊ-बहिनींनो
तुमच्या हक्काचं कुठे पान आहे
लुटून नेलय पाणी सगळं
खांदेश कोरडाठाण आहे..!

तापी,मोसम,कान,गिरणेचं
सुकलेल्या पोटाचं पात्र आहे
पांझरा,आरम,बुराई,बोरीची
अवस्थाही फार विचित्र आहे
फुकटे नेते बोलतच नाहीत
मंत्रालयी कुठे त्यांना मान आहे
लुटून नेलय पाणी सगळं
खांदेश कोरडाठाण आहे..!

वाद विसरा एकमेकांशी जुळा
तुमच्या हातीच जलक्रांती आहे
प्रगती त्यांच्याच द्वारी नांदते
जिथे संघटन ज्योत तेवती आहे
आयतं काहीच मिळत नाही जगात
‘देवा पाटलाचं’ हे विधान आहे
लुटून नेलय पाणी सगळं
खांदेश कोरडा ठाण आहे..!

जलदूत कवी-देवदत्त बोरसे
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५

Leave a Comment