अहिराणी भाषेला अभिजात दर्जा द्या
खान्देशच्या ‘जनाधुनं’ मित्रमंडळाने व्यक्त केली अपेक्षा
छत्रपती संभाजीनगर, ता. २१ : ‘खान्देशातील भाषा म्हणून परिचित असलेली अहिराणी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या दोन कोटी आहे. या भाषेचे संवर्धन व्हावे आणि ही खान्देशी संस्कृती टिकून राहावी, यासाठी अहिराणी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि सांस्कृतिक भवन शासनाने द्यावे’, अशी एकमुखी मागणी खान्देशी नागरिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार (जनाधुनं) मित्र मंडळाने ‘सकाळ संवाद’ या उपक्रमात केली.
त्यांच्या चर्चेचा सूर असा ‘जळगाव, नाशिक, धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांना एकत्रितपणे कान्हदेश असे संबोधले जाते ची जाते. निसर्गाची कृपा असूनही, खान्देशचा हवा तसा विकास झाला नाही. यातच येथील मूळ रहिवासी असलेले अनेक लोक व्यापार, व्यवसाय, नोकरी, उद्योग यानिमित्त विविध ठिकाणी, स्थलांतरित झाले. छत्रपती संभाजीनगरमध्येही खान्देशी या नागरिकांची संख्या जवळपास लाखाच्या घरात आहे. या नागरिकांना सुख, दुःखात काही मदत लागली तर गाव जवळपास अडीचशे किलोमीटर दूर आहे. मग तत्काळ मदत उपलब्ध व्हावी, या हेतूने ‘जनाधुनं’ मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली. या मित्र मंडळात शिक्षक, डॉक्टर, वकील,उद्योजक, व्यापारी अशा सर्वच क्षेत्रातील लोक आहेत.
या मित्र मंडळाच्या माध्यमातून नोकरी, व्यवसायानिमित्त छत्रपती संभाजीनगरात आलेल्या नागरिकांना अडीअडचणीत मदत केली जाते. आर्थिक, रुग्णालयाशी संबंधित मदतीचा यात समावेश आहे. कोरोना काळात तर धीर, आधार वैद्यकीय सेवेची मदत दिली. यावेळी लोकांना मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मानसोपचार समुपदेशक संदीप शिसोदे आणि रवींद्र शिंदे या तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. कोरोना आजारात आपल्या घरचा कमावता माणूस गमावलेल्यांना देखील आर्थिक मदत मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली.
कन्नड घाटाचा विषय मार्गी लागावा
गावाकडे जाताना कन्नड घाट मार्गे जावे लागते. परंतु, या घाटात नेहमी वाहतूक कोंडी होते. सध्या या मार्गावरून जाणारी जड वाहने बंद करण्यात आल्याने, परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आहे. परंतु, एकदा का या घाटात वाहन अडकले, की चार-पाच तास हलता येत नाही. उर्वरित ठिकाणी सोलापूर-धुळे महामार्ग जवळपास पूर्ण होत आला आहे. त्यामुळे अडचण नाही. या घाटातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्यायी मार्ग असावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
कानबाई, भालदेव सणाला महत्त्व
खान्देशी लोक उत्सवप्रिय असतात.
खान्देशात प्रचलित असणारा कानबाई हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी कुटुंबातील किंवा परिवारातील सदस्य कुठल्याही गावी असो या सणासाठी ते घरी वेतात. अगदी महालक्ष्मीप्रमाणे या सणाचे व्रतवैकल्य असते. यासह
भालदेव आणि डोंगर देव हे सण मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातात. भालदेव म्हणजे स्वच्छतेला असलेले महत्त्व, यात उकिड्याचीही पूजा केली जाते. डोंगरदेव उत्सवात दहा दिवस उपवास करून, पाऊरी, सनई वाजवून उत्सव साजरा करतात.
खान्देश वधू-वर सूचक मंडळ
• जनाधूनं’ मित्र मंडळात सर्वच जाती
धर्माचे लोक आहेत. अगदी याच प्रमाणे लग्न जुळवण्यासाठी सर्व जाती धर्मातील व्यक्तींसाठी खान्देश वधू-वर सूचक मंडळ या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून अनेकांचे विवाह देखील जुळले आहेत.
वाळूजमध्ये सप्तशृंगी मंदिर
• खान्देश प्रांताची कुलदैवत म्हणून सप्तशृंगी मातेला ओळखले जाते. यामुळे
वाळूज परिसरातील बजाजनगरमध्ये सर्वाना एकत्रित आणण्यासाठी सप्तशृंगी मंदिराची स्थापना करण्यात आली, यासह गरजूंना दान करण्यासाठी आपत्कालीन निधीचीही तरतूद केली जाते.
जनाधुनं मित्र मंडळ खान्देशी संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करते. याबरोबरच अहिराणी भाषेचा जास्तीत जास्त वापर करून ती टिकावी यासाठीही प्रयत्न करते. यासह खान्देशी सणांची माहिती असलेली दिनदर्शिकासुद्धा दरवर्षी प्रकाशित केली जाते’, अशी माहीत त्यांनी दिली. या संवादात मित्र मंडळाचे विनायक पवार, डॉ. जितेंद्र देसले, कैलास पाटील, दौलतराव सोनवणे, कांतीलाल महाजन, रवींद्र पाटील, चंद्रकांत पवार, मनोहर सनेर, किशोर पाटील, नितीन पाटील, बन्सीलाल शिल्लक यांनी सहभाग नोंदविला