पोलीस दलाच्या धडाकेबाज कामगिरीने धुळे जिल्ह्यातील जनतेत समाधान
दैनिक पोलीस शोध
संपादकीय
दि.23/12/2023
पोलीस दलाच्या धडाकेबाज कामगिरीने
धुळे जिल्ह्यातील जनतेत समाधान !
धुळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे दत्तात्रय शिंदे यांच्या नव्या दमाच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत ज्या धडाकेबाज पद्धतीने अवैध व्यवसायांवर ‘संक्रात’ आली आहे ती धुळे जिल्ह्यातील जनतेसाठी समाधानकारक असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
या जिल्ह्याच्या इतिहासात मागील 38 वर्षात आम्ही सामाजिक-राजकीय-शैक्षणिक क्षेत्रात काम करत असतांना जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रासनात अनेक जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक पोलीस अपर अधिक्षक, एलसीबी विभाग पोलीस निरीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, शिक्षणाधिकारी यांची कारकीर्द जवळून पाहिली आहे. यातील अधिकांश अधिकारी हे अतिशय उत्तम प्रशासक म्हणून काम करताना आम्ही पाहिले आहेत. मोहल्ला कमिट्यांची स्थापना करून राष्ट्रीय एकात्मता स्थापन करण्याच्या हेतूने व दोन समाजातील तेढ कमी करण्यासाठी धुळ्यापासून ज्यांनी सुरूवात केली ते पोलीस अधिक्षक सुरेश खोपडे यांचे पासून तर पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांचे पर्यंतच्या कालखंडात अनेक पोलीस अधिक्षकांनी आपल्या पद्धतीने कर्तव्य बजावत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची कामगिरी हाताळली आहे.
एकेकाळी धुळे जिल्हा हा रॉकेल पिणारा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. तेव्हा पासून तर धुळे जिल्हा परिषदेतील धर्म भास्कर प्रकरणापर्यंत आणि लांब पल्ल्याच्या वाहतूक करणार्या ट्रकांमधून माल चोरी करण्यापासून तर राजेंद्र बंब यांच्या सावकारी प्रकरणापर्यंत, अनेक खूनांच्या प्रकरणांपासून तर दरोड्यांपर्यंतच्या गुन्ह्यांमध्ये वेळोवेळी पोलीस अधिक्षकांनी आपल्या उत्तम कामगिरीने या जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे. परंतू यातील काही मंडळी खूपच वादात सापडल्याने पोलीस प्रशासनाची प्रतिमा देखील मोठ्या प्रमाणावर डागाळली गेली. धुळे जिल्ह्याने तीन जातीय दंगलीच्या अंगावर रोमांच उभे करणारा इतिहास पाहिला आहे. गुंडांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या या शहरात गुड्ड्या चोर खून प्रकरण देश पातळीवर गाजले. त्यामुळे एक संवेदनशील जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्याकडे पाहिले जाते.
धुळे हा शहरासह चार तालुक्यांचा लहानसा जिल्हा असला तरी या जिल्ह्याला लागून मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांच्या सिमा असल्याने धुळे हे अवैध व्यवसायाचे मध्यवर्ती ठिकाण ठरलेले आहे. म्हणजे गुराजतहून येणारा अवैध माल हा मध्यप्रदेशात जात असले तर तो धुळे किंवा नंदुरबार मार्गानेच जावा लागतो. मध्यप्रदेशातून येणारा अवैध मद्यसाठा किंवा कत्तलीसाठी जाणारी गुरे, मुंबईकडे जाणारा गांजा हा सुद्धा धुळे मार्गानेच जातो. त्यामुळे बनावट विदेशी मद्य, गुटखा, गांजा, अफू ही नशेची सर्व सामुग्री मोठ्या प्रमाणावर कोणत्याही राज्यात किंवा मुंबईकडे पाठवायची असेल तर धुळ्यातून किंवा मालेगावहून अथवा नंदुरबार मार्गे या शिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रात गुटखा बंदी, गुजरात राज्यात दारू बंदी, मध्यप्रदेशात गांजा खुला त्यामुळे या तीन राज्यात होणारी हेरफेरी ही अवैध व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना देणारी आहे.
इंदौरचा गांजा धुळे मार्गे थेट मुंबईपर्यंत पोहचतो तर गुजरातचा गुटखा महाराष्ट्रभर अवैध मार्गाने पोहचविला जातो. त्यामुळे वाहन चोरी असेल, वाळू माफिया असतील, कत्तलीसाठी भिवंडीपर्यंत जाणारी गुरे असतील किंवा गुजरात राज्यात रेडीमेड गोवंशाचे मांस असेल, चोरीचा ट्रक, टाटा सुमो सारख्या गाड्या असतील यासर्व अवैध व्यवसायांसाठी बेरोजगार तरूणांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धुळे जिल्ह्यात चोरटा व्यापार चालतो. त्यासाठी वेगवेगळ्या क्लूप्त्या वापरल्या जातात नव्या मोटार गाड्यांचा वापर करण्यात येतो, कांद्याच्या ट्रकमध्ये गांजा लपवून नेला जातो. किंवा बोंबीलच्या ट्रकमध्ये गांजा, गुटखा यासाख्या नशेच्या वस्तूंची तस्करी मोठ्या प्रमाणावर बारा महिने सुरू असते.
गांजा शेतीसाठी व नकली कट्टे बनविण्यासाठी आता शिरपूर तालुक्यातील पहाड पट्ट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होवू लागला आहे. बनावट मद्य, गावठी दारू, गांजा, अफू, स्मॅक, नशेच्या गोळ्या, नशेच्या औषधी बाटल्या यातून मोठ्या प्रमाणावर तरूण-तरूणींमध्ये नशा केली जाते. राज्यात नशेचे प्रमाण वाढत असल्याची खंत कोणालाही नाही, उडता पंजाब प्रमाणे उडता महाराष्ट्र येणार्या काळात झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नसावे. अशा या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा जितकी अर्लट असेल तेव्हढी पोलीसांची दहशत अवैध व्यवसास करणार्यांवर बसते. किंवा पोलीस प्रशासन जेव्हढे भ्रष्ट असेल तेव्हढा नोटा छापण्याचा कारखाना तयार होवू शकतो असेच समिकरण धुळे जिल्ह्यात तयार झाले आहे. मात्र नूतन पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे आणि गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मागील एक महिन्यात ज्या पद्धतीने सर्व अवैध व्यवसायांवर धडाकेबाज कारवाई करून अवैध व्यवसाय करणार्या गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण केली आहे ती कौतुकास्पद आहे.
दररोज कोणत्यातरी तालुक्यात त्यातही शिरपूर व धुळे शहर तालुक्यात ज्या पद्धतीने अवैध व्यवसायांवर संक्रात आली आहे. त्याचे धुळे जिल्ह्यातील जनतेतून अभिनंदन होत असून श्रीकांत धिवरे, अशोक काळे, दत्तात्रय शिंदे यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. या महिन्यात ट्रक तोडीच्या 20 शेड मध्ये कारवाई करत 77 लाखांचे स्पेअरपार्ट जप्त करण्यापासून तर शहरातील विविध ठिकाणी चालणार्या पत्त्यांच्या क्लबवरील कारवाई, क्रिकेटच्या सामन्यांवर बेटींग, वाहतूक करून दुसर्या राज्यातून आलेले लाखो रूपयांचे विदेशी मद्य, लाखो रूपयांचा अवैध गुटखा, अवैध पद्धतीने होणारी गोवंशाची वाहतूक, शुभम साळुंखे खून प्रकरणातील मारेकर्यांना अटक यासह धुळे शहरातील काही ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींसाठी सुरू असलेले अश्लिल कॅफेंवरील कारवाई, मोटर सायकल चोरांना अटक, रोकड पळवून नेणारे आरोपींना अटक करण्यासाह खून व तरूणीचे अपहरण व दरोडा हे साक्री येथील प्रकरणात छडा लावण्यात पोलीसांनी दाखविलेले कौशल्य, अवघ्या पाच तासात चोरीचा तपास अशा अनेक गुन्ह्यांमध्ये धुळे जिल्हा पोलीसांनी गेल्या महिन्याभरात केलेली कारवाई ही खर्या अर्थाने समाधानाची बाब आहे.
पोलीस प्रशासन जेव्हा जनतेच्या सुरक्षेसाठी, कायदा व सुव्यवस्थेसाठी डोळ्यात तेल घालून काम करायला लागते तेव्हा त्यांची कामगिरी ही जनतेसमोर आल्याशिवाय राहत नाही. धुळे शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न देखील पोलीसांच्या सहकार्याने शांततेत पार पडतो आहे त्यामुळे नागरीकांचाही पोलीस प्रशासनावरचा विश्वास वाढतो आहे. महिला व विद्यार्थीनींमध्ये भितीचे वातावरण कमी होत असून पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे एसपी श्रीकांत धिवरे आणि एलसीबी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांचीही कामगिरी अशीच सुरू राहील यांत शंका नाही. येणार्या आठ दिवसात अजून लाखो रूपयांचे अवैध विदेशी मद्य, क्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पकडले जाईल यात शंका नाही. अवैध व्यवसाय करणार्या माफीयांचे आर्थिक कंबरडे मोडल्याशिवाय गुन्हेगारी कमी होत नसते. परंतू व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून स्वतःला मिरवायचे आणि कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करायचे हे खाकी वर्दीचे काम नाही. म्हणून पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे आणि त्यांच्या सर्व टिमचे आम्ही या निमित्ताने कौतुक करतो आहोत.
तुर्तास एव्हढेच…..