मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी पू.साने गुरुजी
पू.साने गुरुजी
मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी
(जयंती / प्रा.बी.एन.चौधरी / ९४२३४९२५९३)
पू. साने गुरुजी व्यक्ती म्हणून एक असले, तरी त्यांच्या अंगी विविध प्रतिभांचा संगम झालेला होता. या कारणाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पदर होते. ते एकाच वेळी सामाजिक कार्यकर्ता, आदर्श शिक्षक, झुंजार पत्रकार, प्रखर राष्ट्रभक्त आणि मातृहृदयी कवी अश्या विविध भूमिका वठवित होते. गुरुजींच्या अलवार, संवेदनशील मनाला झालेल्या संवेदनाच, त्यांच्या काव्यातून प्रकट होतात. त्यांच्या पत्री काव्यसंग्रहात त्याचे एकत्रित मनोहरी दर्शन होते. पत्रिनामाभिधानाबद्दल गुरुजींनीच म्हटल्याप्रमाणे, त्यांनी आपल्या आवडत्या वाॅर्ल्ट विटमन या कवीच्या लिव्हस ऑफ ग्रास या नावाने स्वदेशी भाषांतर करून तृणपत्रीचे रूपांतर पत्रीत केले आहे. पत्रीतील कवितांचा कालखंड १९२५ ते १९३५ चा आहे. यातील बहुतांशी कविता या धुळे, नाशिक, त्रिचिनापल्ली च्या तुरुंगातल्या लिहिलेल्या असल्याचे नमूद केले आहे. गुरुजींसारख्या कर्तव्य परायण व कामपिपासू कार्यकर्त्याला निवांत मिळणे कठीणच होते. तो एकांत त्यांना तुरुंगात लाभायचा आणि गुरुजी त्याचे सोने करत.
गुरुजींच्या काव्याचे प्रामुख्याने चार भाग करता येतील
१) परमेश्वराचे गुणगान करणारे भक्तिमय श्रद्धामय काव्य.
२) जनसामान्यांच्या सामान्य जीवनाचे यथार्थ चित्रण करणारे वास्तववादी काव्य.
३) देशभक्तीने भारावलेले आणि स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन केलेले देशभक्तीपर काव्य.
४) सत्याग्रहींच्या जीवनाचे खरे चित्र प्रकट करणारे सत्याग्रही खंड काव्य.
गुरुजींनी कवितेसोबत कथा, कादंबऱ्या, चरित्रही अमाप लिहिली. मात्र, या ठिकाणी त्यांच्यातील कवी मनाच्या व त्यांच्या काव्य प्रतिभेचा परामर्श घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.
महाराष्ट्रातील संत परंपरा महान आहे संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास यांनी भक्ती परंपरेत काव्य आणले. विरंगुळा व प्रेरणा देणे हे संत काव्याचे मुख्य उद्देश होते. तेच नेमके साने गुरुजींच्या काव्याचे प्राण आहेत. म्हणून, पूज्य साने गुरुजींना आधुनिक संतही म्हणण्यात येते. अहकार जळून सत्संग घडावा म्हणून ते म्हणतात, मम जीवन हरिमय होऊ दे. परमेश्वराला संतांनी आई, माय, माऊली समजले आहे. तद्वद गुरुजी हे म्हणतात, एक आई मज माहेराला नेई. परमेश्वराची नितांत श्रद्धा व्यक्त करताना ते म्हणतात,
असो तुला देवा माझा, सदा नमस्कार,
तुझ्या दया दातृत्वाला, अंत नाही पार.
त्या दात्याच्या दातृत्वाची गुरुजींना कल्पना आहे. म्हणूनच, ते भक्तीने परमेश्वराचे महत्त्व पटवून देताना म्हणतात,
तुझ्या कृपेने रे होतील, फुले पत्थराची,
तुझ्या कृपेने रे होतील, मोती मर्तिकेची.
स्वार्थाचा त्याग, सेवा, परायणता व साधू वृत्ती त्यांच्या काव्यातून दिसून येते. ते म्हणतात,
भरू विश्वात आनंद शांती, नांदु चराचरी,
म्हणूनच जळती संत, महाले भास्करापरी.
विश्वात शांती, आनंद नांदावा यासाठी संत, महात्मे सूर्याप्रमाणे ताप सहन करून जगाला आनंद देतात. हे सांगणारे गुरुजीही स्वतःचे सर्वस्व विसरून, दुसऱ्यांना शांती, आनंद देण्याचेच कार्य करीत होते. हे सारे करीत असताना प्रभूचरणी स्वतःसाठी त्यांनी काय मागावे ? आपल्या एका कवितेत ते म्हणतात,
एक मागणी तुजला मागे,
दे निर्मळ हृदयास.
माणसाचे हृदय निर्मळ व्हावे असे त्यांना वाटे. बाहेरची स्वच्छता जशी आवश्यक आहे, तशी मनाची स्वच्छताही आवश्यक असते, हा मंत्र त्यांना त्यांच्या आईने लहानपणीच दिला होता. तो गुरुजींनी आयुष्यभर जपला. आनंदून गुरुजी म्हणतात,
अति आनंद हृदयी भरला,
प्रियकर प्रभू मज हृदयी आला.
हृदयी आनंद निर्माण करा. म्हणजे, प्रभु चे दर्शन दूर नाही. असंच गुरुजी आपल्या कवितेतून सांगत असावेत. ते फक्त सांगून थांबले नाहीत. तर, त्यांनी दिलेले संदेश ते स्वतः प्रथम जगले. त्यांनी दुसऱ्यांची हृदय फुलवली आणि स्वतःच्या हृदयात आनंद भरला. तोच त्यांना साक्षात परमेश्वर भासला. गुरुजींनी स्वतःचे सुख, दुःख, स्वतःचा फायदा, स्वतःसाठी जगणं सोडून ते दुसऱ्यासाठी जगले. स्वतःच्या श्रेणी स्वतःची दुःख जाणून घेतली. ते म्हणतात,
प्रबोधिनी दाता तुझ्या तार आणि माझ्या दुःखाने श्रमाने माझे दुःख जळून जातील.
गुरुजींचा स्वतःचा असा संसारच नव्हता. शिक्षक म्हणून काम करतानाही, आपला पगार ते दुसऱ्यासाठी खर्ची घालत. सारे विश्वच त्यांच्या संसार होता. निसर्ग, झरे, तळे, प्राणी, पक्षी, स्त्री- पुरुष तसेच मुलं आणि फुलं गुरुजींना विशेष आवडत. म्हणूनच त्यांना मुला-फुलांचे कवी म्हणत. मुलांना हसवण हा त्यांचा जीवनाचा मुख्य उद्देश होता. ते म्हणतात,
वारा वदे कानामध्ये, गीत गाईन तुला,
ताप हरिन शांती देईन, हसरे माझ्या मुला.
मुलं, तारे, वारे नसते, तर या जगात काहीच राम राहिला नसता. हे गुरुजी किती सहज पटवून देतात.
नसती जगी या जरी मुले,
नसती जगी या जरी फुले.
नसती अंबरीया जरी तारे,
नसते गाण्याचे वारे.
कसे तरी मग जग दिसते,
हे मज मतिला ना कळते.
लहानपणी घरातील छतावरून चिमणीचे पिल्लू खाली पडले. आणि, क्षणात गतप्राण झाले. गुरुजींच्या हृदयाला त्या लहान जीवाचे जाणे फारच लागून राहिले होते. ते त्यांनी काव्यात मांडले,
मृदुल ती मान टाकून पडले,
हृदय रडले माझे किती ?
मुलांना विकासाचा मंत्र देताना ते म्हणतात, विकासासाठी त्रास कष्ट सोसावेच लागतात. फुलं नाही का ऊन, वारा, ताप सहन करीत.
फुले तरुण येऊन उष्ण शीत,
जगी असे हीच विकास रीत.
धुळीच्या कणात पानात, फुलात गुरुजींना परमेश्वराचा साक्षात्कार व्हायचा. त्यांचे पवित्र लावण्य टिपताना ते नम्रतेने म्हणतात,
फुल खडा वा असो तरुचे पान,
तुझेच अनुपम दाखवितो मज.
पवित्र तरुवर, ताऱ्याची निर्मळता त्यांना नेहमी खुणावी. त्यांच्यासारखे पावित्र्य अंगी यावे म्हणून गुरुजींची अंतरीचे तळमळ होती. त्यासाठीच त्यांचा ध्यास होता. निर्मळतेत पावित्र्य आहे, हे सांगताना मनीची इच्छा गुरुजी किती सहजपणे व्यक्त करतात,
केव्हा होईल जीवन माझे,
पवित्र ताऱ्यांपरी.
हुरहुर एक हीच अंतरी.
गुरुजींच्या जीवन जगण्याचा मंत्र हा सहज, सोपा होता. ते म्हणत, संसाराच्या स्वार्थीपणाला का दोश द्यावा ? संसार काही खोटा नाही. त्यासाठी संसाराकडे बघण्याची आपली दृष्टी सरळ व निर्मळ व्हायला हवी. मग जसे अपेक्षित असेल, तसेच जग दिसेल.
सुखास नाही मुळी तोटा,
संसार नसे हा खोटा.
दृष्टी करावी निज पूल
निराळेच मग जग दिसते.
हे सांगताना जगात जे दिसतं, ते सारं वास्तव नसतं. असा आपला सल्ला द्यायलाही ते विसरत नाही. जग हे मयसभाच आहे. हे किती समर्पकपणे गुरुजी पटवून देतात,
जे दिसत असते रूप वस्तूचे वरून,
ते आत न येते दिसून.
जीवनात काव्य आहे, दिव्यता आहे. म्हणूनच, जीवन जगण्यात मौज आहे. माणसाने आपले जीवन सत्य व मंगल गोष्टींसाठी जगले पाहिजे. जीवनात वाईट गोष्टीही होतात. मात्र, त्यासाठी पश्चाताप व्हायला हवा. अश्या पश्चातापाच्या अश्रूंनी, जीवनाला मोक्ष प्राप्त होतो. हा संतांचा जीवन मंत्र गुरुजी आपल्या काव्यातून देतात.
इवलासा अश्रू पर्वत बुडवी,
जीवास चढवी मोक्षपदी.
जीवन जगण्यासाठी कला हाच जीवनाचा महामंत्र आहे असं सांगत गुरुजी प्रखर राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा आपल्या काव्यात उभी करतात. गुरुजींनी सर्व स्त्री जातीत माता बघितली. त्यांच्या जीवनात जन्मदात्री, भूमाता आणि राष्ट्रमाता यांना सर्वोच्च स्थान होते. म्हणून, पारतंत्र्यात असलेल्या भारत मातेसाठी स्वार्थाची होळी करून, छातीवर गोळी झेलण्यासही ते मागे राहिले नाहीत. त्यासाठी अहोरात्र मृत्यूची झुंज देत ते लढत राहिले. ते म्हणतात,
स्वार्थाची करुनी होळी,
छातीवर झेलू गोळी.
करू मृत्यूशी खेळीमेळी.
मातृभूमीच्या मारे करू सारे बलिदान शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आहारापेक्षा बघून सारे रानच पेटविण्याचा क्रांतिकारी विचार त्यांच्या काव्यात स्त्रवतो.
आता उठवू सारे रान ,आता पेटवू सारे रान,
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण.
यासाठी साऱ्यांचे ऐक्य हवे हे त्यांनी जनतेला पटवून दिले. ऐक्याचा मंत्र देताना गुरुजी म्हणतात,
हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून,
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्यक्रमाला हो.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.
आजही त्यांच्या बलसागर भारताच्या प्रतिमेला ऐक्याचीच खरी गरज आहे. फुटीरता, अशांतता आपसातील वैर, हेवेदावे आज चरमसीमेवर आहेत. म्हणूनच, गुरुजींचा ऐक्याचा मंत्र आजही तेवढ्याच लोलामोलाचा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना स्वातंत्र्य सैनिकांना जणू स्वातंत्र्याची नशाच चढली होती. अशा दिव्य नशेत भारावून ते देशासाठी प्राणांची आहुती देत होते. हा स्वातंत्र्याचा शिपाई त्यांच्या कवितेतून समोर येतो.
स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई,
सुखवू प्रियतम भारत आई.
देशभक्तीच्या सुधीर सोम,
पिऊन करू प्राणाचा होम.
देशभक्तीचा सुधीर सोम ग्रहण करत कष्ट, हाल सोसत देशासाठी लढणाऱ्यांना, गुरुजींनी अमर हुतात्मे म्हटले आहे. घरदार, सुखी संसार सोडून लढणाऱ्यांना गुरुजी म्हणतात,
जे देशासाठी लढले,
ते अमर हुतात्मे झाले.
सोडिले सर्व घरदार,
सोडीला सुखी संसार.
लढणाऱ्यांबरोबरच कष्टू करणाऱ्यांनाही ते देवाचे मजूर म्हणतात,
आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर,
आम्ही कष्ट करू. आम्ही कष्ट करू भरपूर.
जगाला धर्माधर्माच्या नावावर लढताना पाहून, गुरुजींना मनस्वी दुःख होतं. गुरुजी म्हणत, अरे लढायला लावतो तो कसला धर्म ? खरा धर्म तोच आहे, जो जगाला प्रेम देतो.
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे,
जगी जे दिन अतिपतित, जगी जे दिन पददलीत,
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे.
जे दिनदलीत, पददलीत आहेत, त्यांना उठवून हृदयाशी लावणारा खरा धर्म गुरुजींना अपेक्षित होता. भारत भूमीवर जन्माला आल्याबद्दल गुरुजींना मोठा अभिमान होता. ते म्हणत,
बहुभाग्याने बहु पुण्याने झालो तव संतान,
तव सेवा मजहाती होता हरपो माझा प्राण.
देश सेवा करतच माझा प्राण जावा, अशी गुरुजींची इच्छा होती. गुरुजींच्या हातून अजून फार मोठं कार्य व्हायचं होतं. मात्र, समाजाने, राजकारणाने त्यांना हतबल केले. ते निराश, उदास झाले, हताश झाले.
ओसाड जीवनाचे, पाहून वाळवंट,
करपून जीव जाई, येई भरून कंठ.
अश्या निराशाजनक वातावरणात गुरुजींसारखा तरल मनाचा, हळवा संवेदनशील कवी कसा जगू शकणार ? शेवटी, त्यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले. आणि, आपले जीवन कार्य संपवून घेतले. गुरुजींसारख्या कृष, जेमतेम प्रकृतीच्या व्यक्तीने, उत्युच्च असे महान कार्य करून ठेवले आहे. त्यांच्या मृत्यूने आचार्य अत्रे गहिवरले होते. ते म्हणतात, गुरुजींचे न बोलणेच बोलणे होते. त्यांच्या वाणी पेक्षा त्यांची लेखणी जास्त बोलकी होती. गुरुजी मातृदयी कवी होते. त्यांच्या कणाकणात काव्य वसलेले होते. आईच्या दृष्टीने ते जगाकडे पाहत. त्यांना पाहून मुलांना, आपली आई भेटल्याचा आनंद होई. त्यांच्या वाङ्मयातली सहानुभूती शुद्ध, प्रेमळ आणि पवित्र स्वरूपाची होती. समाजात घडणाऱ्या सर्व घटना गुरुजींच्या हृदयावर आघात करत. त्या वेदनेतूनच करुण काव्य जन्माला येई. अशा या महाकवीला त्यांनी, मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी, अशी उपमा दिली होती.
पूज्य साने गुरुजींच्या काव्यात सर्वव्यापकता आहे. म्हणूनच, त्यांच्या कविता सर्वस्पर्शी ठरल्या आहेत. त्यांनी केलेली काव्य निर्मिती, ही सहेतुक ध्येयवादातून झालेली आहे. जीवनात अनुभवले तेच साहित्यात येत गेल्याने, त्यांच्या लेखनाला वास्तवाची झळाळी प्राप्त झाली. त्यांची कविता मानवतेच्या पायावर आधारलेली व राष्ट्रभक्तीला वाहिलेली होती. म्हणून, ती त्या काळातील तरुणांच्या हृदयात विराजमान झाली होती. अशा राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या कवितेची, आजही देशाला गरज आहे. कारण, दुर्दैवाने आज देशातील जाती-धर्मातील भेदाभेद, हिंसा, अराजकता आणि धर्मांधता आपल्या सर्वोच्च स्थानावर आहे.
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव. जि. जळगाव.
४२५१०५.
(९४२३४९२५९३)
