३३ वर्षांची तपश्चर्या फळाला आली बालकवी स्मारकाला चालना मिळाली

३३ वर्षांची तपश्चर्या फळाला आली बालकवी स्मारकाला चालना मिळाली

३३ वर्षांची तपश्चर्या फळाला आली
बालकवी स्मारकाला चालना मिळाली


मित्रांनो, धरणगाव हे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे जन्मगाव. धरणगावात त्यांचे स्मारक व्हावे म्हणून आम्ही साहित्य कला मंचच्या माध्यमातून ३३ वर्षांपासून प्रयत्नरत आहोत. अनेक अडचणी, अडथडे पार करत तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकरांनी स्मारक मंजूर केले. पायाभरणी केली. मात्र, कोरोना काळात ते रखडले. आता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भरीव ५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. ३३ वर्षांची तपश्चर्या फळाला आली. आणि, बालकवी स्मारकाला चालना मिळाली अशी आनंदमय स्थिती निर्माण झाली आहे. आता स्मारक साकार होणार याची शास्वती आली आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला असून, शासनाने स्मारकाच्या कामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सततच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मारकाच्या कामाला गती देण्याचे वचन दिले होते. त्यानुसार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ना. पाटील यांच्या मागणीनुसार हा निधी मंजूर केला. अमळनेर येथे संपन्न होत असलेल्या ९७ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाल्याने साहित्यिक वर्तूळात आनंद व्यक्त केला जात आहे. येथील साहित्य कला मंच या संस्थेने स्मारकासाठी सातत्याने पाठपुरवठा केला आहे.

या सोबत साईसेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट यांचे पाळधी येथील साईबाबा मंदिरात भक्त निवास व सभागृह बांधकाम करण्यासाठी २ कोटी आणि हेडगेवार ग्रामपंचायत येथे क्रांतीकारी ख्याजा नाईक स्मृती स्थळाकडे जाणारा रस्ता क्राॅंक्रीटीकरण व सुशोभीकरण करणे ०२ कोटी असे एकूण ९ कोटीच्या कामांना पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी भरीव निधीस मंजुरी दिल्याने साहित्यिक आणि भाविक भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. नागरीकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. पाटील, ना. महाजनांचे आभार व्यक्त केले आहेत.

महाराष्ट्राला अभिमान वाटेल
ना. गुलाबराव पाटील
धरणगाव हे बालकवींची जन्मभूमी असल्याचा आणि मी या परिसरातला लोकप्रतिनिधी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. बालकवींच्या जन्मगावी त्यांचे स्मारक पूर्णत्वाला येईल याचा मला आनंद आहे,असे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. महाराष्ट्राला अभिमान होईल असे स्मारक उभारु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आता स्वप्नंपूर्तीला सुरवात
प्रा. बी.एन.चौधरी
ना. गुलाबराव पाटील व ना. गिरीश महाजन यांनी घेतलेल्या या घोषणेने साहित्य कला मंचने ३३ वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्नं आवाक्यात आले आहे. आता स्वप्नंपूर्तीची वाटचाल सुरु होईल. या स्मारकामुळे बालकवींच्या साहित्याच्या अभ्यासाला देखील वाव मिळणार आहे असे प्रतिपादन साहित्य कला मंचचे अध्यक्ष प्रा. बी.एन.चौधरी यांनी व्यक्त केले.

स्मारक वाचन केंद्र व्हावे
डॉ. संजीवकुमार सोनवणे

या स्मारक स्थळी बालकवींच्या साहित्याचा अभ्यास करता येईल असे ग्रंथालय असणार आहे. हे स्मारक बालकवींची स्मृती जपत असतांनाच रसिक वाचकांचे मध्यवर्ती केंद्र व्हावे अशी अपेक्षा साहित्य कला मंचचे सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी व्यक्त केले. याठिकाणी साहित्यिक उपक्रमांना चालना देता येईल.

© प्रा.बी.एन.चौधरी.
(९४२३४९२५९३)

Leave a Comment