नायलॉन मांजा विक्रीवर कठोर निर्बंध आणण्याची गरज

नायलॉन मांजा विक्रीवर कठोर निर्बंध आणण्याची गरज

दैनिक पोलीस शोध
संपादकीय…
दि. 8/1/2024

नायलॉन मांजा विक्रीवर
कठोर निर्बंध आणण्याची गरज !

नवीन वर्षाला सुरूवात झालेली आहे. 15 जानेवारी रोजी मकर संक्रात आहे. तर 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदीराचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या दोन्ही संणांच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यात आकाशात पतंगबाजी होणार यात शंका नाही. आणि या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजा विक्री होईल. यावर पोलीस प्रशासन लक्ष देणार का ?

जानेवारी महिन्याचा एक आठवडा उलटला आहे. येत्या 15 जानेवारीला देशभर मकर संक्रांत हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात तिळ आणि गुळाचे लाडू देवून एक दूसर्‍याला ‘तीळ-गुळ घ्या आणि गोड-गोड बोला’च्या शुभेच्छा दिल्या जातात. थंडीच्या दिवसात शरीराला आवश्यक असलेले घटक तिळ आणि गुळ या निमित्ताने प्रत्येक घरात तयार केले जातात. आणि मित्र, आप्तेष्टांना देऊन गळाभेट घेण्याची एक चांगली परंपरा महाराष्ट्रात आहे.

उत्तरायण या नावाने देखील मकर संक्रांती या पर्वाला संबोधले जाते. भारत आणि नेपाल या हिंन्दु राष्ट्रात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा होतो. तामिळनाडूमध्ये पोंगल, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशात केवळ संक्रांती या नावाने हा सण साजरा होतो. तर बिहारमध्ये तिला संक्रांत नावाने संबोधले जाते. या दिवशी आकाशात पतंग उडविण्याची अजून एक परंपरा आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू राज्यात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. एकेकाळी पतंग हे घरी बनविले जात.

त्याला उडविण्यासाठी साधा जाड दोरा वापरला जात असे. परंतू नंतरच्या काळात त्याला व्यावसायिक रूप प्राप्त झाले आणि पतंगाचे आकार देखील बदलले, रंग बदलले, आणि या पतंगांना आकाशात उंच उडविण्यासाठी सरसचा वापर करून बनविलेला धागा वापरण्यात येवू लागला. त्यातच दूसर्‍याच्या पतंगाशी काटा-काटीची स्पर्धा होऊ लागली आणि हा मांजा तयार करतांना सरस सोबत काचेची बारीक पूड वापरण्यात येवू लागली. त्यामुळे बनविलेला मांजा हा काचेप्रमाणे, धारदार होतो. आणि याच मांजाच्या माध्यमातून पतंगांची कापा-कापाची स्पर्धा रंगते. यासाठी पैजा देखील लागतात. कापलेले पतंग आणि मांजा लुटण्याची मजा घेणारे अजून दूसरेच असतात. अलिकडच्या काळात साधा दोरा बंद होवून त्याठिकाणी नायलॉनचा दोरा वापरण्यात येवू लागला आहे.

अशा या घातक मांजामुळे आता आकाशातील पक्षासोबत वाहनांवर चालणारे, पायी चालणारे माणसे देखील रक्त बंबाळ होऊ लागली आहेत, मरू लागली आहेत. आधीच आकाशातील पक्षांची संख्या कमी होत असतांना पतंगांच्या माजांने शेकडो पक्षी घायाळ होत आहेत, मरत आहेत. धारदार मांजा आकाशात उडणार्‍या पक्षांच्या पायात अडकतो, गळ्यात अडकतो त्यामुळे ते घायाळ होतात आणि मृत्यू पावतात. परंतू पक्षांच्या या मृत्यूचा कुणालाही शोक नाही किंवा दुःख नाही. नागरीकांसह शासनाला, वन विभागाला याचे सोयर सुतक नाही. आकाशात उडणारे पक्षी नेमके वन विभागाच्या अखत्यारीत येतात किंवा नाही याची आम्हाला कल्पना नाही. परंतू वनातील मोरांची पिसे आणि त्यापासून बनविलेल्या शोभेच्या वस्तू शहरातून, महानगरातून विकल्या जातात.

त्यासाठी मोरांची शिकार केली जाते. लाहोरी-तितुर सारखे जीवंत पक्षी पकडून जंगलातील लोक ते मांसाहारी लोकांना सकाळी सहा ते आठच्या दरम्यान धुळे सारख्या शहरात विकायला येतात. असो. परंतू मकर संक्रांती येण्याच्या आधी पंधरा दिवस आगोदर आणि मकर संक्रांतीच्या 15 दिवसानंतर म्हणजे तब्बल महिनाभर हा पतंग उडविण्याचा उत्सव साजरा केला जातो. गुजरात राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. याच्या तिक्ष्ण व धारदार मांजामुळे जळगाव, पिंप्राळा येथील 11 वर्षीय मुलगी दुर्वा बापू माळी ही आईसोबत एक कार्यमाला जात असतांना तिच्या पायाला नायलॉनच्या मांजा गुंडाळला गेला त्यामुळे तिच्या पायाच्या तीन रक्तवाहिन्या कापल्या गेल्या. विशेष म्हणजे चालण्यासाठी बळ देणारी रक्तवाहिनी कापली गेल्याने तीचेवर शस्त्रक्रिया करावी लागली.

दूसर्‍या एका घटनेत मांजा घासला गेल्याने वैजापूर येथे एका तरूण शेतकर्‍याचा गळा चिरला गेला. गणेश बाळासाहेब गंलाडे हा 30 वर्षीय तरूण आपल्या मोटर साईकलने जात असतांना नायलॉन मांजा त्याचे गळ्यात अडकला आणि त्याचा गळा चिरला गेला. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि तरूण गाडीवरून खाली कोसळला. या दोन्ही घटना दोन दिवसापूर्वी घडलेल्या आहेत.

राज्यातील पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी असे जाहीर आवाहन आम्ही या व्यासपिठावरून करीत आहोत. त्याशिवाय 22 जानेवारी रोजी रामलल्ला प्रभूरामचंद्र मंदिराचे अयोध्येत उद्घाटन होत आहे. हा आनंदाचा क्षण म्हणून देखील नागरीक लाखो पतंग आकाशात उडवतील आणि यातून हजारो पक्षी मृत्युमूखी पडतील, यावर पोलीस प्राशासनाने करडी नजर ठेवून नायलॉन मांजा जप्त करावा, यासंदर्भात कायदा आहे परंतू त्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणून राज्यासह धुळे सारख्या शहरात देखील मोठ्या प्रमाणावर तयार होणारा नायलॉन मांजा पोलीसांनी धाडी टाकून जप्त करावा. जेणे करून कायद्याची अंमलबजावणी होऊन निरपराध पक्षी व नागरीकांचे प्राण वाचतील.

तुर्तास एव्हढेच…

Leave a Comment