जावे कवितेच्या गावा

जावे कवितेच्या गावा

( माझे अध्यक्षीय भाषण )

—————————————

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्ठान संचलित
शब्दस्वरूप साहित्य मंच ब्रह्मगाव आयोजित
श्रृंगेरीदेवी राज्यस्तरीय काव्योत्सव 2024
—————————————————————
आदरणीय स्वागताध्यक्ष , आजच्या कार्यक्रमाचे उद् घाटक ” आम्हांघरी धन शब्दांचीच रत्ने , शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू ” असे शब्दप्रभू असलेले आदरणीय चंद्रकांत दादा वानखेडे .
प्रमुख पाहुणे — कविवर्य महादेव लांडगे
                        कविवर्य ज्ञानेश्वर शिंदे
                        कवयित्री सुनीता कावसनकर
                       कविवर्य डाॅ. सुनील पवार
                      माननीय पोपट श्रीराम काळे ( शिक्षणाधिकारी पुणे )
लोकशाहीचा आधारस्तंभ असणारे माझे पत्रकार बांधव , शब्दस्वरूप साहित्य मंचच्या संस्थापक अध्यक्षा सौ पूजा राजेश घोंगडे व त्यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते , शब्दांचा , साहित्याचा हा यज्ञ सतत तेवत ठेवणारे आमचे साहित्यिक बंधू श्री . ज्ञानेश्वर काळे , कारण संस्था तर स्थापन होऊन जाते पण त्यात सातत्य ठेवून ही ज्ञानज्योत प्रज्वलित ठेवण्याचे कार्य ज्ञानेश्वरजी अगदी तन, मन,धनाने करतात . संमेलनासाठी जमलेले सर्व साहित्यिक , रसिक आणि श्रोत्यांनो सर्वांना माझा सस्नेह नमस्कार .

आज साहित्य संस्कृतीचा वारसा जपणार्‍या , महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणार्‍या छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहरात शब्दस्वरूप साहित्य मंचावरून बोलतांना मला अतिशय आनंद होत आहे .
हा  साहित्य मंच असा आहे कि जेथे नवोदित आणि प्रचलित असा भेद केला जात नाही .मराठी भाषा संवर्धनासाठी शक्य तेवढे जास्तीत जास्त प्रयत्न मंचाद्वारे केले जातात .कविसंमेलने घेऊन नवकवींना प्रोत्साहन देणे , वेळोवेळी मार्गदर्शन करणे , मंचाच्या माध्यमातून मराठीची अस्मिता जपणे , व्याख्याने , स्पर्धा , लोककलांना प्रोत्साहन असे विविध उपक्रम आयोजित करणे इ. सर्व उपाययोजना करणारी ही संस्था आपले वैशिष्ट्य जपून आहे .

 आज संभाजीनगरात संपन्न होणार्‍या काव्योत्सवाबरोबरच या ऐतिहासिक आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या , उद्योगधंद्यांचं केंद्र असणार्‍या संभाजीनगरविषयी थोडसं भौगोलिक बोलायला मला आवडेल .संभाजीनगरचं पूर्वीचं नाव खडकी. या शहरात 52 दरवाजे ,52 खिडक्या आणि 52 पूरे ( औरंगपुरा ) आहेत .हे एक पर्यटन स्थळ असून जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा लेणी ,घृृष्णेश्वर मंदिर , देवगिरी किल्ला ,पाणचक्की ,राजा शिवाजी वस्तू संग्रहालय , सिद्धार्थ गार्डन व प्राणी संग्रहालय ,पितळखोरा लेणी , जायकवाडी धरण ही संभाजीनगरची वैशिष्ट्ये आहेत .पैठण ही सातवाहन राजघराण्याची शाही राजधानी तसेच देवगिरी ही यादव घराण्याची राजधानी या आधुनिक छ. संभाजीनगराच्या हद्दीत आहेत .

सारस्वतांनो 
62 किलोची तलवार वागवितो तो येसाजी
दोन हजार शत्रूंशी एकटा झुंजतो तो बाजी 
हात तुटला तरी शत्रूंशी झुंजतो तो तानाजी
आठ तासात घोडा दिल्लीहून पुण्यात आणतो तो संताजी
शत्रूंच्या छावणीत घुसून मुकुटमणी तोडून आणतो तो धनाजी
ढाण्या वाघाला सामोरं जाऊन , त्याला उभा फाडतात ते संभाजी
आणि सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतात ते छत्रपती राजे शिवाजी

काय सारस्वतांनो नुसत्या नावाच्या उच्चारणानेही अंगात वीरश्री संचारली ना .अ अ होय ना .
अशी ही राजे , महाराजे आणि शाही घराण्यांची भूमी .
ज्यांच्या घरी साक्षात पांडुरंगानं पाणी भरलं त्या पैठण नगरीत होऊन गेलेत संत एकनाथ महाराज ज्यांनी आपल्या भारूडातून समाज प्रबोधन केले .

जगाला भागवत धर्माची ओळख मराठीतून व्हावी म्हणून ज्ञानेश्वरी रूपाने भगवत गीतेचे मराठीतून निरूपण केले त्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पैठणजवळ आपेगावला जन्म घेतला .अशी ही संतश्रेष्ठांची पावनभूमी असलेल्या संभाजीनगरात छत्रपती संभाजीनगर प्रतिष्ठान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंचावरून बोलण्याचं मला भाग्य लाभलंय हा मी माझा गौरव समजते .

आजचा हा उत्सव एका आईच्या स्व. कौशल्याबाई बबन भालेकर स्मृतिप्रित्यर्थ आहे .आई म्हणजे आनंदाचं गाव , मनाचा हळवा कोपरा , एक संवेदनशील रूप . आई म्हटली कि उरात भावना दाटून येतातच . आपण सारस्वतही काव्यदेवतेची पूजा करणारे , संवेदनशील मन असणारे , म्हणजेच आजचा उत्सव हा संवेदनेने संवेदकांशी संवेदनशीलतेने जोडलेले एक अतूट नाते आहे .जेव्हा हे संवेदनशील अतूट नाते मनाने मनाशी जोडले जाते , एका सूत्रात बांधले जाते तेव्हा ती कविता एक सुंदर कविता तर असतेच असते पण ती एक सुंदर गाणेही होऊन जाते .
प्रत्येक गाणं ही कविता असेलच असं नाही .( तुम लडके हो , मै लडकी हूँ , आया मौसम दोस्तीका ) यात कोणतं काव्य आहे?

श्रृंगेरीदेवीचा अर्थात साक्षात आई सरस्वतीचा आशीर्वाद घेऊन हा काव्योत्सव साजरा होत आहे तो ही एका आईला स्व. कौशल्याबाई बबन भालेकर यांना समर्पित आहे , त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते . आई आशीर्वाद असावा .

शेतीची कामे तशी कष्टाची. येथे सुख-समाधान तसे कमीच. कष्ट मात्र कायमचेच. हे कष्ट करताना मनाला काही करमणूक व्हावी म्हणून स्वतःच एकांतात ही कष्टकरी मंडळी गुणगुणत राहतात.  जात्यावरच्या ओव्या, शेतात काम करताना गायलेली भल्लरी.    हे सगळं सृजन अतिशय सहज असतं. उदाहरण द्यायचं झालं तर बहिणाबाई चौधरींची कविता अतिशय सहज येते. स्वतःच्या बोलीतले शब्द, अनुभव, जगातील माणसे व त्या अनुभवातून जन्माला आलेले तत्त्वज्ञान; निसर्गाशी एकरूप होत त्यांनी गायले.

“पाहून इथले व्यवहार खोटेनाटे,
बोरी बाबळीच्या अंगाले आले काटे”

आमची खेडी, गावं अशी संस्कृती, परंपरा व सृजनतेनी समृद्ध. 

 जेथे पहाटच मधूर स्वरातील जिव्हाळा, प्रेम, विश्वास, आत्मीयता, आपूलकी, माया ममत्व, सारख्या अनेकविध भावतरंगांनी भरलेल्या ओव्यांनी होते. देवादिकांचे नामस्मरण जात्यावर दळण दळतांना, कर्म करतांना होते. ती भूमी अलौकिकच. कोंबड्याचे आरवणे, चिमण्यांचा चिवचिवाट, . घराघरातून जात्याच्या सुरात मिसळलेले ओव्यांचे सूर देवालयातून येणारी भूपाळी, आरतीचे मधुर स्वर, टाळ मृदंगाचा टणटणाट झांज-घंट्याचा निनाद, विहिरीवर पाणी शेंदतांना रहाटाचा होणारा करकर आवाज. यामुळे झोपलेल्या गावाला हलकेच जाग येते. सारा आळस , शीण निघून जातो. या सुरांमध्ये आणखी एक कर्ण मधुर सुर मिसळतो वासुदेवाचा. हातातील टाळ पायातील चाळ यांच्या निनादात राम नामाचा गजर करीत त्याचंच नावानं दान मागीत वासुदेव अवतीर्ण होतो. 

“वासुदेव आला हो वासुदेव आला दान द्या याला हो दान द्या याला “

अशा या सांस्कृतिक व साहित्यिक वारसा जपणार्‍या ब्रह्मगावात शब्दस्वरूप साहित्य मंच आपले कार्य उत्तम करीत आहे .

रसिक सारस्वतांनो
” हुंकार , मग तो मनाचा , अंतःकरणाचा , ह्रदयाचा , आणि काळजाचाही . हा हुंकार येतो मनोगाभ्यातून ,खोल अंतःकरणातून , ह्रदय कोषातून तर कधी काळीज कुपीतून .कवीची अभिव्यक्ती आणि रसिकांच्या प्रेरणा व आनंद या संयोगातूनच तर जन्म होतो कवितेचा .कवीची ही अभिव्यक्ती खोल मनाच्या अंतःकरणातून शब्दरूप घेते .आपले दुःख , वेदना यांना मूर्तरूप मिळते .या वेदना , दुःखे , काही आनंद लहरी ही कोठून मिळतात कवीला , त्याच्या सभोवतालातूनच .मग या वेदना , कधी आप्तस्वकियांनी दिलेल्या , कधी अति विश्वास ठेवला त्यानेच केलेला घात , कधी आपल्या चांगुलपणाचा घेतला गेलेला गैरफायदा ,जीवन वाटेवरचे खाचखळगे , संकटे , त्यांचा सामना करतांना झालेली दमछाक , जीवनात उठलेली वादळे ,त्या वादळांचा सामना करतांना उडालेली त्रेधा तिरपीट ,सर्वस्व पणाला लागावे असे कसोटीचे प्रसंग , तर कटु घोट पिऊन घेतली गेलेली माघार , जी ह्रदयावर न भरून येणारी देऊन गेलेली जखम , पेटून उठलेलं मन या सगळ्याला शब्दरूप मिळणं , मनातील आवाज कानात पोहोचणं , ओठातून बाहेर पडणं , हा त्या वेदनेला , अभिव्यक्तीला मिळालेला काळजातील हुंकारच म्हणावा लागेल .
आपण जे भोगतो , पाहतो , सहन करतो त्याचे प्रतिबिंब कवितेत येणारच , त्या त्या कोनातून ते साकारणारच , जसे नुकताच पाऊस येवून गेलेला ,व शेतातील सर्व पायवाटा मिटलेल्या , मग आपणच आपली निर्माण केलेली नवीन पायवाट , एक नवा प्रारंभ , एक नवा आशय , अशी फुललेली कविता ही नक्कीच ह्रदयाचा ठाव घेणारी , ह्रदयातून साकारलेली ,मनो गाभार्‍यातून शब्दरूप घेऊन आलेली .

शेती विषयावर लिहायचं म्हटलं तर शेतकर्‍याचं लवकर उठणं , बैलगाडी जुंपून शेतात जाणं , दुपारी घरधनीणीचं डोईवर भाकरी घेऊन जाणं अशी कल्पना कवी करतात , पण हे एवढं सहज शक्य आहे काय ? मूळात शेती व्यवसायात सुख आणि समाधान फार कमी वेळा मिळतं , कष्ट मात्र कायम ,सतत अवर्षण तर कधी अतिवृष्टी , दुष्काळाचं सावट , सावकारी पाश , कर्जाचे डोंगर , अशा अनेक समस्यांना सामोरं जातांना झालेली दमछाक , यातूनही काही मार्ग गवसला नाहीतर आत्महत्येसारखे घेतले गेलेले अप्रिय निर्णय , कुटुंबाची झालेली वाताहात , असे वाटते या मालिकेला अंतच नाही काय ? 

मग याच दुःखाला शब्दरूप देऊन आशेचा किरण दाखवणं , नवनवीन शेतीचे प्रयोग , संशोधनात्मक अवजारांचा वापर , ठिबक सिंचन , अधिक उत्पन्न देणारे बि बियाणांचे नवनवीन वाणांचा वापर , शेतकर्‍यांना संजीवक ठरू शकतो . दुसर्‍याचं दुःख स्वतः जाणणं , स्वतः ते क्षण ह्रदयगाभ्यात जगणं आणि त्या जाणिवेला शब्दरूप देऊन साकारणं या दिव्यात तावून सुलाखून निघणं यातूनच जन्मते कविता काळजाच्या कुपीतून .

रोजचे अनुभव , जगातली माणसं ,अनुभवातून आलेलं तत्वज्ञान ,आपल्या बोलीभाषेतील साधे सरळ शब्दही हे या कवितेचे अलंकार ठरतात , अगदी सहज सृजन होते मग कवितेचे.

मित्रांनो, साहित्य समाजमनाचा आरसा असतो म्हणतात. तसेच साहित्य निर्माण करणारा साहित्यिक ही त्याच समाजाचा एक भाग असतो. आपला भोवताल, जे जे आपण पाहतो, साहतो , आपल्या आजूबाजूला जे घडतं तेच आपण लिहित असतो.  कल्पनेला वास्तवाची जोड देऊन लिहिलेलं साहित्य मनाचा वेध घेतं. म्हणूनच म्हटलं जातं की कुठल्याही संस्कृतीचं मूल्यमापन करताना त्या त्या वेळेचं  साहित्य  पाहिले जातं कारण त्या साहित्यात त्या समाजाचं, त्या  संस्कृतीचं, प्रतिबिंब असतं.  युद्धाच्या काळात वीर रसयुक्त साहित्याची निर्मिती होते. तर आपल्या स्वातंत्र्याच्या काळात गुलामगिरीविरुद्ध देशप्रेमाने ओतप्रोत, जनजागृती निर्माण करणारं साहित्य निर्माण झालं. तर भारत-पाकिस्तान फाळणीतील रक्तरंजित घटनांवर आधारित साहित्य लेखन झालं. फार काय आताच अलीकडच्या काळातील शेतकरी आत्महत्या व स्त्रीभ्रूणहत्या यावर विविध साहित्यनिर्मिती झाली कारण या साहित्यातूनच नव समाज निर्मितीस हातभार लागत असतो.

स्त्रीभ्रूण हत्येविरोधात सर्वांनी आवाज उठविला, कायदे कडक करणात आले. पण आमच्या साहित्यिकांनीही मग ती कथा, कविता, नाटक, पथनाट्य, विविध माध्यमातून समाजमन बदलण्याचा प्रयत्न केला. त्यातून निर्माण होणारे धोके , त्यायोगे समाजातील ढासळणारी नैतिक मूल्ये याविषयी जागृती केली आणि आज त्याचे परिणाम हळूहळू दिसत आहेत. घरात दोघी मुली असल्या तरी पप्पांना चालतं, कुटुंबाला चालतं, मुलगाच हवा हा अट्टाहास मागे पडत चाललाय. 

मित्रांनो कवितेची , साहित्याची ताकद अशी अफाट असते . आपण मला बोलावलंत , अध्यक्षपदाचा मान दिला , ऋणी आहे मी आपली . आपलं हे पहिलं सत्र अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे .पुढील सत्रात कवितांचा आस्वाद घ्यायचा आहे . वेळ बराच झालाय .सुग्रास भोजनही तुमची वाट पाहातेय . त्यामुळे मी त्या आड न येता , तुमचा अधिक वेळ न घेता ,इथेच थांबते.

पुनश्च छ. संभाजीनगर प्रतिष्ठान , शब्दस्वरूप साहित्य मंच ब्रह्मगाव , पूजाताई घोंगडे व श्री ज्ञानेश्वरजी काळे व सर्वांना धन्यवाद देते . नमस्कार

जयहिंद
जय महाराष्ट्र
जय मराठी

( शैलजा करोडे )

जावे कवितेच्या गावा 3
जावे कवितेच्या गावा 5
जावे कवितेच्या गावा 7

Leave a Comment