जल्दी सोये-जल्दी जागे !वो दुनियामें सबसे आगे !
रात्री आठ वाजता सर्व गाव झोपी जायचे ही गोष्ट जे आज साठीत आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. परंतू आज प्रत्येक घरात रात्री 12 पर्यंत सर्वच खोल्यांमधील लाईट सुरू असतात. कारण टी.व्ही. मोबाईलच्या या युगात आमची जीवन शैलीच पार बदलून गेली आहे. पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर भरवण्याचा एक शासकीय अध्यादेश नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ‘झोप’ या विषयावर सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
गतिमान युगात माणसांची जीवनशैली सुद्धा गतिमान झाली आहे. कृषी व्यवस्थेपासून तर औद्योगिक क्षेत्रापर्यंत आता दिवस आणि रात्र अशा दोन्ही शिप्टमध्ये काम सुरू असतांना दिसते. एके काळी शेतकरी केवळ खरीप आणि रब्बी अशी दोनच पिके घ्यायचे. त्यातही कोरडवाहू शेती ही मोठ्या प्रमाणावर असल्याने 90 टक्के शेतकरी केवळ खरीप हंगाम घेत असत. उन्हाळ्यात चार महिने शेती नांगरणी करून पडलेली असे, ज्यांचे शेतात सिंचनाची व्यवस्था होती असेच शेतकरी गहू , हरबरा असा रब्बी हंगाम घेत असत. कारखानदारी सुद्धा एकाच शिप्टमध्ये चालत असे. आता दिवसा आणि रात्री अशा दोन सत्रात करखाने चालविले जातात.
लवकर निजे-लवकर उठे त्यास ज्ञान संपत्ती मिळे
काही कारखान्यांमध्ये दिवसा दोन शिप्ट तर रात्री दोन शिप्ट अशा चार शिप्टमध्ये कारखाने चालविले जातात. ग्रामीण भागासह महानगरांमध्ये रात्र सुद्धा दिवसाप्रमाणे दिसते. प्रवासी वाहने रात्रभर चालत असतात. सांगण्याचे तात्पर्य एव्हढेच की माणसाची दैनंदिन जगण्याची जीवनशैलीच आता एव्हढी गतिमान झाली आहे की माणसाने आपल्या शरीराला सुद्धा एक ‘मशिन’ बनवून टाकले आहे. त्यामुळे जल्दी सोये, जल्दी जागे, वो दुनियामे सबसे आगे, लवकर निजे-लवकर उठे त्यास ज्ञान संपत्ती मिळे असे उद्गार आता घरांमध्ये ज्येष्ठांकडून ऐकायला मिळत नाही. विज प्रत्येक घरात नव्हती तो काळ आम्ही पाहिलेला आहे. आणि अनेक गावामध्ये विज नव्हती, त्या काळी किंबहुना अलिकडच्या विस-तीस वर्षापूर्वी सायंकाळी सात वाजता प्रत्येक घरात जेवणावळी आटापेली जात असे आणि आठ वाजता संपूर्ण गाव झोपी गेलेले असे. कारण कृषी व्यवसाय असल्याने पहाटे चार वाजता उठण्याची गावातील दैनंदिनी ही सर्व गावांमध्ये असायची. सकाळी सात वाजेपर्यंत घरातील सर्व कुटूंबांच्या आंघोळी आटोपून देवपूजा झालेली असायची, ब्रम्हमुहूर्त, पहाटे, मोठ्या पहाटे हे शब्द त्याकाळी वापरले जायचे. अलिकडे या शब्दांचा वापर होतांना दिसत नाही. किंवा हे शब्दच ऐकायला मिळत नाही अशी परिस्थिती आहे.
पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा या नऊ वाजता किंवा नऊ नंतर भरवण्यात याव्यात
परंतू ‘ब्रम्ह मुहूर्ता’ची ताकद आजच्या तरूणाईला कोण सांगेल ? अशी स्थिती आहे. आयटीच्या या युगात आणि माहितीचा स्फोट झालेला असतांना तरूण मंडळी ही उशिरा झोपतात आणि त्यांना ‘सुर्योदय’ सुद्धा कधी दिसत नाही. मोबाईलसारखी साधने निव्वळ दिड ते दोन वर्षाची मुले हाताळतांना दिसतात. त्यांना मोबाईलवरील अनेक फंक्शनचे ज्ञान असल्याने ते त्यावर खेळत बसतात. अशा काळात पूर्व प्राथमिक, आणि प्राथमिक म्हणजे पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाने नुकताच एक अध्यादेश काढला आहे. ज्यामध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा या नऊ वाजता किंवा नऊ नंतर भरवण्यात याव्यात. निर्णय अंत्यत चांगला आहे, यात दुमत असल्याचे कारण नाही. कारण सात वाजेच्या शाळेसाठी त्या लहान मुलाला किमान एक तास आधी उठवावे लागेल. लहान मुले अलिकडे रात्री लवकर झोपत नाहीत ही ‘घर-घर की कहानी’ झाली आहे. त्यामुळे झोपेचा आणि मेंदूच्या विकासाचा शारिरीक, मानसिक विकासाचा संबंध हा खूप जवळचा आहे. लहान मुलांची पूर्ण झोप होणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारचा हा अध्यादेश मुलांच्या मानसिक विकासाशी व आरोग्याशी संबंधीत आहे. परंतू या अध्यादेशामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळा, महानगरांमधील हायफाय, प्रोफाईल असलेल्या शाळांना यामुळे गैरसोयीचे होणार आहे. अर्थात यात थोड्याफार प्रमाणात जीआरमध्ये मुभा देखील देण्यात आलेली आहे. शिक्षणाधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून काही शाळांना यात आपल्या सुविधेनुसार बदल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
परंतू उशिरापर्यंत झोपू देण्याची सवय आणि संस्कार लहान मुलांवर या माध्यमातून होऊ नये असे आम्हाला वाटते. प्रातःमुहुर्तावर उठण्याची शक्ती ही खूप मोठी आहे. प्रदुषणाच्या या जगात शुद्ध हवा, प्रत्येक शरीरासाठी महत्वाची आहे. आरोग्य त्यातही ‘सुदृढ आरोग्य’ ही प्रत्येकासाठी महत्वाची बाब आहे. लहान मुले, किशोरवयीन मुले, तरूणांसाठी झोप जेव्हढी महत्वाची आहे तेव्हढे शरीर उत्तम असणे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे सकाळची हवा, पहाटेचा वारा, आणि ब्रम्हमुहुर्तावरील वातावरण हे आरोग्यासह आत्मीकशक्ती वाढविणारे असतात. मजबुत फुफ्फुसे करायचे असतील तर यावेळी दिर्घश्वसन हे मेंदूसह संपूर्ण शरीरासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीनुसार घेतलेला निर्णय हा किती फायदेशीर आहे हा संशोधनाचा विषय आहे. यावर चर्चा होऊ शकते. परंतू भारतातील पूर्वापारपासून चालत आलेली पहाटे लवकर उठण्याची संस्कृती अशा अध्यादेशांमुळे लोप पावणार नाही याची दक्षता घेणेही गरजेचे आहे. साधणे ही माणसाच्या सुख-सोयींसाठी असली तरी साधणे हे ध्येय असू शकत नाही. त्यामुळे लाहन मुलांवर सकाळी लवकर उठण्याची, आंघोळ करण्याची वडीलधार्यांना, देवाला नमस्कार करण्याची परंपरा खंडीत होवू नये आम्हास वाटते.
5 thoughts on “लवकर निजे लवकर उठे त्यास ज्ञान संपत्ती मिळे”