अंधाराला हरवू आपण
नव वर्षा ये स्वागत तुझे, सरत्यालाही सलाम रे.
अंधाराला, हरवू आपण, आणू दिव्य प्रकाश रे. llधृll
कुणी गमवला आप्त-सखा, कुणी गमवले मायबाप,
या हातांनी केले किती, आठवून बघ पुण्य अन पाप.
आठवण होता त्या क्षणांची, मनी वाटते भकास रे,
अंधाराला, हरवू आपण, आणू दिव्य प्रकाश रे. ll१ll
जगात नाही दुःख कुणाला, कश्यास अरे तू रडतो,
ठेच लागता पडतो माणूस, उठतो अन सावरतो.
जगात चाले रीत सदा ही, ज्ञानी करतो विकास रे,
अंधाराला, हरवू आपण, आणू दिव्य प्रकाश रे. ll२ll
स्वतःसाठी जो जगला येथे,अर्थ न त्या जगण्याला
संकट येता पळ जो काढी, अर्थ न त्या लढण्याला.
धैर्याने जो दटला जगती, खुले त्यास मग आकाश रे,
अंधाराला, हरवू आपण, आणू दिव्य प्रकाश रे. ll३ll
संकल्पांचे दीप पेटवू अन्, माणुसकीची गाणी गाऊ
एक दुज्या मदत करुनी, आनंदामध्ये सचैल न्हाऊ
मित्र न ज्याला सावरण्याला, तोच एक इथं हताश रे,
अंधाराला, हरवू आपण, आणू दिव्य प्रकाश रे.ll४ll
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, धरणगांव.
(९४२३४९२५९३)
३१ डिसेंबर २०२३