काय कमवायचं? पैसा की माणसं?

काय कमवायचं? पैसा की माणसं?

लेखक:- ©अनिल आत्माराम उदावंत

आपल्या दैनंदिन व्यवहारांसाठी पैसा लागतोच परंतु आपल्या भावनिक आणि मानसिक व्यवहारांसाठी पैशापेक्षा माणूस आधिक उपयुक्त ठरत असतो. भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, गुलझारीलाल नंदा, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसिद्ध विनोदी लेखक पु.ल. देशपांडे, यांनी कधीच पैसा कमावण्याचा आग्रह धरला नाही मात्र त्यांनी माणसं भरपूर कमावली होती. विशेष म्हणजे आजही ही माणसं प्रचंड लोकप्रिय आहेत आणि जगातल्या अत्यंत यशस्वी माणसांत त्यांची गणना होते.*

परवा माझ्या कन्येनं पॉडकास्टवरील एक चर्चा मला ऐकवली. चर्चेचा विषय होता- “पैसा महत्वाचा की माणसं?” त्यांनी चांगली चर्चा केली. विषयाच्या अनेक पैलूंना योग्य न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्नही चांगला होता. चर्चेच्या शेवटी त्यांनी असा निष्कर्ष मांडला की, पैसा आणि माणसं दोन्हीही महत्वाची आहेत. आपण पैसा आणि माणसं दोन्हीही कमावली पाहिजेत. त्यांना जपलं पाहिजे. त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि त्यांचा योग्य प्रकारे उपयोगही केला पाहिजे! त्याचवेळी मला आठवलं की हरे राम हरे कृष्णचे श्री गोपाल गौर दास यांनाही एका टीव्ही चॅनलवरच्या चर्चेमध्ये असा प्रश्न विचारला होता की, माणसानं पैसा किंवा माणसं यापैकी कशाला प्राधान्य द्यावं? तेव्हा त्यांच उत्तर होतं- “जीवन जगताना पैसा आणि माणसं दोन्हीही लागतात. त्यामुळे आपण दोन्ही कमावली पाहिजेत.”
गोपाल गौर दास यांचं उत्तर आणि पॉडकास्टवरील चर्चेच्या निष्कर्षाने मला प्रश्न पडला की, हे सारं करायचं कसं? माझ्या प्रमाणेच अनेक वाचकांना असा प्रश्न पडला असेल, पडत असेल. या विचाराने माझ्या मनात या लेखाची बीजं रोवली गेली.

पॉडकास्टवरची चर्चा ऐकल्यानंतर पैसा कमावणं म्हणजे नेमकं काय? पैसा कसा कमवायचा? पैसा का कमवायचा? पैसा किती कमवायचा? पैसा कुणाला कमावता येतो? आणि माणसं कमावणं म्हणजे काय? माणसं कशी कमवायची? माणसं का कमवायची? आणि किती माणसं कमवायची? माणसं कुणाला कमविता येतात? असे अनेक प्रश्न माझ्या मनात पिंगा घालत होते. या सगळ्या प्रश्नांमध्ये ‘कमावणं’ हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. ‘कमावणं’ म्हणजे ‘मिळवणं’ असं ढोबळमानाने म्हणता येईल. असं करताना मिळवणं आणि मिळणं या दोन वेगळया गोष्टी आहेत हे आपण बारकाईनं समजून घेतलं पाहिजे. समाजात दोन प्रकारचे लोक आहेत. त्यातील पहिल्या प्रकारचे लोक पैसे कमावतात म्हणजे मिळवतात. तर दुसऱ्या प्रकारच्या लोकांना पैसे मिळतात. पहिल्या प्रकारातल्या लोकांना कितीही पैसा कमावता येतो. त्यांच्यासाठी कोणतीच मर्यादा नसते. “स्काय इज द लिमिट” असं ” म्हणत ते वारेमाप पैसा कमावत असतात.
दुसऱ्या प्रकारच्या लोकांना त्यांच्या श्रमाचा मोबदला म्हणून अत्यंत मर्यादीत पैसे मिळत असतात. त्यांच्या श्रमाचे योग्य मोल होत नाही. त्यांना मिळालेल्या पैशांतून त्यांच्या मूलभूत गरजाही भागू शकत नाहीत. त्यामुळे “व्हाय इज धिस लिमिट?” असा प्रश्न त्यांना सतत सतावत असतो. या लोकांना पैसा अधिक महत्वाचा वाटत असतो म्हणून ते पोटाला चिमटा घेऊन प्रत्येक ठिकाणी काटकसर करीत असतात. अनेकदा त्यांना उधार- उसणवार करावी लागते. गंमत म्हणजे ज्यांच्याजवळ भरपूर पैसा उपलब्ध आहे ते इतरांना पैसा अधिक महत्त्वाचा कसा आहे याची सतत जाणीव करुन देतात; मात्र आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना पुरेसा पैसा मिळणार नाही याची ते संपूर्ण काळजी घेतात.

माणसानं पैसा कमवायचा म्हणजे असं काम करायचं की ज्याच्या मोबदल्यात त्याच्याकडे अधिक पैसा येईल. हा अधिकचा पैसा का कमवायचा? तर या पैशातून आपल्या मूलभूत आणी भौतिक गरजा भागवता येतात, सत्ता राबवता येते. असं असलं तरीही समाजकार्याचा अभ्यासक म्हणून माझं असं निरीक्षण आहे की, मूलभूत आणि भौतिक गरजांच्या पूर्तीनंतर माणसाला प्रेम, आदर, सन्मान, संरक्षण या सारख्या गरजांची पूर्ती करायची असते. समाजात भलेही पैशावाल्या माणसाला अधिक प्रेम, आदर, सन्मान मिळताना दिसत असले तरी ते चित्र अजिबात खरे नसते हे आपल्या अवतीभवतीच्या अनेक उदाहरणातून आपणास दिसून येते. “असतील शिते तर नाचतील भूते” या उक्तीचा जन्म याच पार्श्वभूमीवर झाला आहे. याऊलट ज्यांच्याकडे अधिक पैसा नाही मात्र त्यांची कर्मे समाजहिताची आहेत त्यांना मिळणारे प्रेम आदर आणि सन्मान अधिक असतो. अशा लोकांच्या संरक्षणाची गरज याच प्रेमातून पूर्ण होत असते. पैशावाल्या लोकांना आपली संरक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी पैसाच खर्च करावा लागतो. पैसा कित्ती कमवायचा? या प्रश्नाचे उत्तर ‘गरजेपुरता’ असे असले तरी माणसाच्या गरजा अनंत आहेत. त्यामुळे नेमका किती पैसा कमवायचा? हे आजवर कुणालाच ठरवता आलेले नाही.

चांगलं मार्केटींग स्कील म्हणजे बेमालूम खोटं बोलता येणं, ग्राहकांना फसवता येणं. अधिक पैसा कमावण्यासाठी तेच आवश्यक असतं. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करून दाखवण्याचं कसब असलेली व्यक्ती अधिक पैसा कमावतो. अधिक फी म्हणजे चांगली सेवा हे पटवून देऊ शकणाऱ्याला अधिक पैसे कमावता येतात. यावरून असं स्पष्ट होतं की, सरळमार्गी, प्रामाणिक, ईमानदार, दुसऱ्यांची आपल्यासारखाच विचार करणाऱ्या माणसांना त्यांनी कोणतंही काम केलं तरी जास्तीचे पैसे कधीच मिळत नाहीत हे वैश्विक सत्य आहे. मात्र लबाड, चबढब्या, बेईमान, अप्रमाणिक आणि इतरांचा मुळीच विचार न करता केवळ स्वतःचा विचार करणाऱ्या स्वार्थी लोकांना अधिक पैसा मिळतो. अवैध, बेकायदेशीर आणि गैर कामे करणाऱ्यांना त्याहून अधिक पैसा मिळतो. चोरी, दरोडा, लूटमार भ्रष्टाचार, शोषण आणि फसवणूक ही अधिक पैसा मिळवण्याची साधने झाली आहेत. डस्टोव्हस्की नावाच्या एका परदेशी सामाजिक विचारवंतानं असं लिहून ठेवलं आहे- “माझी आई असं सांगायची की, गरिबी हे पाप नाही; मात्र श्रीमंत होऊन किंवा श्रीमंत होण्यासाठी इतरांचं शोषण करणं हे खरं पाप आहे.” यावर आपण कधी विचार करणार आहोत की नाहीत? हा खरा प्रश्न आहे!

जागतिक पातळीवरच्या मानव विकास निर्देशांकानुसार शिक्षण, आरोग्य आणि रोजगारांच्या संधी यावर माणसाचं पैसा कमावणं अवलंबून आहे. भारतासारख्या विकसनशील देशातल्या बहुसंख्य लोकांना या संधी उपलब्ध होत नाहीत त्यामुळे त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा भागविता येतील इतका पुरेसा पैसा मिळू शकत नाही. ते गरिबीच्या चिखलात अडकू लागतात अशावेळी संभाव्य अडचणींच्या वेळी मदतीला येऊ शकतील अशी माणसं जोडणं हा एकच पर्याय त्यांच्याजवळ उरतो. म्हणूनच पैसा-बियसा काय नसतं रे! आपण माणसं कमावली पाहिजेत! असा सूर गरिब लोकांच्या तोडी हमखास ऐकू येतो. बरं, ही गरिब माणसं, माणसं जोडताना त्यांना होणाऱ्या कोणत्याही त्रासाचा विचार करीत नाहीत.

गावातल्या सरपंचाच्या घरी लग्न असेल तर सबंध गावाला चुलबंद आमंत्रण असतं. सरपंचानं पत्रिकेत आमदार साहेबांचं नाव टाकलेलं असतं. ते आमदार काहीही कारण सांगून लग्नाला उपस्थित राहणं टाळतात. कदाचित ते लग्नाला आलेच, तरी ते रिक्त हाताने येतात आणि १० मिनिटात निघूनही जातात; मात्र गावातला गरिब माणूस उधार-उसणवारी करुन सरपंचाला मोठा आहेर करतो. यामागचं कारण काय असतं? भविष्यात सरपंच कधीतरी आपल्या मदतीला येईल एवढ्याच एका अपेक्षेनं तो गरीब माणूस असा आतबट्टयाचा व्यवहार करीत असतो. याचा अर्थ इतकाच की प्रत्येक माणूस आपल्या गरजेनुसार पैसा किंवा माणसं जोडत असतो. सत्ता मिळवणे आणि मिळालेली सत्ता टिकविणे यासाठी अधिक पैसा लागतो. तो मिळवताना माणसं कळत- नकळत गमावली जातात. आपल्या अस्तित्वाची लढाई लढू पाहणारी काही माणसं लाचारीनं या पैशावाल्यांची सोबत करताना दिसत असली तरी मनानं त्यांच्यासोबत असतीलच असं म्हणता येत नाही. पैसा जोडणाऱ्याला पैसा जितका महत्वाचा वाटतो तितका माणूस महत्वाचा वाटत नाही अन् माणसं जोडणाऱ्याला माणूस जितका महत्वाचा वाटतो जितका पैसा महत्वाचा वाटत नाही.

आपल्या दैनंदिन व्यवहारांसाठी पैसा लागतोच परंतु आपल्या भावनिक आणि मानसिक व्यवहारांसाठी पैशापेक्षा माणूस आधिक उपयुक्त ठरत असतो. भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, गुलझारीलाल नंदा, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसिद्ध विनोदी लेखक पु.ल. देशपांडे, यांनी कधीच पैसा कमावण्याचा आग्रह धरला नाही मात्र त्यांनी माणसं भरपूर कमावली होती. विशेष म्हणजे आजही ही माणसं प्रचंड लोकप्रिय आहेत आणि जगातल्या अत्यंत यशस्वी माणसांत त्यांची गणना होते. हे लक्षात घेता पैसा कमावतानाच माणसं कमावण्याकडे आपला अधिक कल असायला हवा असाच निष्कर्ष निघतो. खरा प्रश्न आहे तो हा की, हे जमवायचं कसं?

आधी भरपूर पैसा कमावून नंतर माणसं जमवू या असा विचार आपण करीत असाल तर ते कठीण आहे. सदर लेखात याआधीच नमुद केलं आहे की, अधिक पैसा कमावण्याच्या नादात कळत-नकळत माणसं दूरावतात. आपणास पैसा कमावता कमावता माणसंही कमावता आली पाहिजेत. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्हाला किती पैसा कमवायचा आहे हे निश्चित करता येईल! एकदा ही मर्यादा तुम्हाला ठरवता आली की तुमचा संपूर्ण फोकस पैसा कमावण्याकडे ठेवण्याची गरज उरणार नाही. अधुनमधुन तुम्ही तुमचा फोकस माणसं कमावण्याकडे केंद्रीत करु शकता. बरं, आपल्याला माणसं तरी किती कमवायचीत? राजकीय पुढाऱ्यांना आपल्या भोवती लागते तशी गर्दी जमवणं अजिबात अपेक्षित नाही. तुम्हाला जाचत असलेला लहान मोठा सल, तुमचं दुःख, तुमचा त्रास, तुमच्या मनातली तुमची अपुरी राहीलेली उत्कट इच्छा, कळत नकळत तुम्ही केलेला गुन्हा, तुमच्या स्वभावातले व वर्तनातले तुम्हाला निपटता न आलेले दोष यापैकी कोणतीही गोष्ट आपण ज्याच्याशी बिनधास्तपणे बोलू शकू अशा माणसांशी आपल्याला नातं जोडायचं आहे. जरुरी नाही की, ही माणसं तुमच्या वयाची असावीत. ही वेगवेगळया वयाची माणसं असु शकतात. त्यात स्त्रिया आणि पुरुष असे .दोघेही असू शकतात. ही माणसं गरीब, श्रीमंत किंवा अधली मधली असू शकतात. ती आपल्या नोकरीतील सहकारी किंवा समव्यावसायिक असु शकतात तशीच ती अन्य नोकरी व्यवसायातली सुद्धा असु शकतात. अर्थात अशी माणसं भविष्यात आपले कोणत्याही पद्धतीने स्पर्धक होऊ शकणार नाहीत एवढी एक खबरदारी आपण घेतली पाहिजे. कमावलेली ही माणसं नियमित संपर्कात असावीत. त्यांच्याशी आपला सुसंवाद असावा. त्यांच्या जीवनातल्या सुख दु:खांच्या प्रसंगात तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही सहभागी व्हायला हवं. अडचणीतल्या माणसांना दरवेळी पैसा लागत नसतो. त्यांना थोडासा धीर धरता येईल एवढा मानसिक आधारसुद्धा पुरेसा असतो. अनेकदा तर समोरच्याला त्याचं म्हणणं नीट ऐकून घेणारा हवा असतो. कधी अनुभवाचे बोल, किंवा सल्ला हवा असतो. आपल्याला दुसऱ्याच्या जागी ठेऊन पाहू शकणारी माणसं माणसं कमावण्यात कधीच कमी पडत नाहीत. एखाद्यावेळी एखाद्या माणसाकडून त्याच्या वर्तन सवयीच्या माध्यमातून आपला अपेक्षाभंग होऊ शकतो. केवळ तेवढ्यावरुन त्या माणसाशी असलेले आपले नाते कमकुवत होऊ नये, नष्ट होऊ नये याची काळजी आपण जाणीवपूर्वक घेतली पाहिजे.

लेखक
© अनिल आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहमदनगर, संपर्क : ९७६६६६८२९५

Leave a Comment