खान्देशी तावडी बोलीतील कवितासंग्रह
‘खोप्यामधी खोपा’ ही ‘बहिणाईची गाणी’ च्या निर्मितिप्रक्रिया खानदेशी – तावडी बोलीतील निवेदन असलेली कादंबरी माझ्याकडून सहज लिहिली गेली. अनेकांनी तिचे स्वागत व कौतुक केले. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम.ए. (द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमातही ती समाविष्ट करण्यात आली.
एके दिवशी मला फोन आला.” मी भालचंद्र नेमाडे बोलतोय. मला तुम्हाला भेटायचे आहे.” मी एकदम उडालोच. स्थळ व वेळ ठरवून त्यांना भेटायला गेलो. त्यांनी त्यांच्याजवळील ‘खोप्यामधी खोपा’ ची प्रत काढली.तिच्यावर खूप सविस्तर चर्चा केली. कौतुक केले. आणि म्हणाले, “साहित्य अकादमीचा प्रकल्प आहे,’भारतीय साहित्याचे निर्माते’, त्यात तुम्हाला ‘बहिणाबाई चौधरी’ या विषयावर मोनोग्राफ लिहायचा आहे.” त्यानुसार फाॕर्र्मॕलिटी पूर्ण करून मी अल्पावधीत तो लिहून सादर केला. परीक्षकांनी ‘जसे आहे तसे छापावे’, असा अभिप्राय दिला. मोनोग्राफ प्रसिद्ध झाला. दरम्यान मा.डॉ.भालचंद्र नेमाडे यांच्याच सूचनेनुसार पुण्याच्या हार्मीक प्रकाशनच्या मा.सुशील धसकटे यांनी ‘खोप्यामधी खोपा’ या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली.
मा. मुख्यमंत्री साहेबांनी एका कार्यक्रमात ‘अहिराणी बोलीतील बहिणाईची गाणी’ असा उल्लेख केला. साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक मा.ज्ञानेश महाराव यांनीही ती बातमी देताना ‘अहिराणीतील बहिणाईची गाणी’ असा उल्लेख केला. बालभारती आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकातही ‘बहिणाईची गाणी अहिराणी बोलीत आहेत’ असा उल्लेख केलेला आढळला आहे. या सर्वांचा हेतू बुद्धिभेद वा दिशाभूल करण्याचा अजिबात नव्हता.नाही. तथापि ही चूकच आहे, हे मी चित्रलेखाचे संपादक मा.ज्ञानेश महाराव यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी खुलासा केला.(परिशिष्टात तो दिला आहे.) आचार्य अत्रे यांनी ‘बहिणाईची गाणी’ च्या पहिल्या व दुसऱ्या आवृत्तीतही स्पष्टपणे बहिणाईची गाणी ‘खानदेशी – वऱ्हाडी’ बोलीत आहेत असे म्हटलेले आहे. ( खानदेशी बोलीलाच तावडपट्टीतील असल्यामुळे ‘तावडी बोली’ असेही म्हणतात.) परंतु अनभ्यासाने व अनावधानाने ‘अहिराणी बोलीतील बहिणाईची गाणी’ असा उल्लेख केला जातो.
वारंवार होणाऱ्या या चुकीमुळे गैरसमज तसाच राहण्याची शक्यता वाढते. त्याचवेळी माझ्या मनात आले की बहिणाईची खानदेशी बोलीतील गाणी तर सर्व मराठी भाषकांना माहीत आहेत.पण अहिराणी असा गैरसमज दूर व्हायचा असेल तर ही गाणी अहिराणी बोलीत केलीत तर महाराष्ट्राला मराठी भाषक व मराठी जाणणाऱ्या वाचकांना अहिराणीचेही स्वरूप तुलनेसाठी उपलब्ध होईल आणि गैरसमज दूर होईल.
मराठीच्या ‘खानदेशी बोली’तील कवितेचा मराठीच्याच ‘अहिराणी बोलीतील अनुवाद’, अष्टाक्षरी छंद सांभाळण्याचा प्रयत्न करीत, अहिराणी बोलीचा लहेजा सांभाळण्याचा प्रयत्न करीत मी सादर करीत आहे. अहिराणी बोलीच्या व्याकरणाचे बारकावे व लहेजा सांभाळून, अष्टाक्षरीचे भान ठेवून परिष्करण करताना परममित्र प्रा.ह.भ.प. चत्रभुज पाटील सर यांची खूप मदत झाली. त्यांचे ऋण हे भूषणच आहे. ‘अहिराणी बोलीचा कोश’कर्ते व ‘अहिराणी बोलीचे व्याकरण’कर्ते प्रा.डॉ. रमेश सूर्यवंशी यांनीही व्याकरणदृष्ट्या अनुवाद अधिकाधिक निर्दोष होईल असे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य आपुलकीने केले , त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. दोघांचे बहिणाईवरील, अहिराणी बोलीवरील व माझ्यावरील प्रेम ,आपुलकी, जिव्हाळा यांमुळे दोघांनीही तत्परतेने बौद्धिक योगदान दिले आहे ,याबद्दल मी कृतज्ञ आहे.
अनुवादातील
‘न्यून ते सरते l अधिक ते पुरते’
करून घ्यावे अशी रसिक, अभ्यासक यांना नम्र विनवणी.
अहिराणी बोली भाषकांनी तसेच अनेक मित्रांनी या अनुवादाच्या उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले आहे. अहिराणी भाषक बंधुभगिनी यांना हा उपक्रम खूप आवडला आहे. रसिकांनी, अभ्यासकांनी तुलनात्मकदृष्ट्या मूळ संहिता समोर ठेवून जरूर आस्वाद घ्यावा, ही विनंती.
प्रशांत पब्लिकेशन्सचे श्री. रंगराव पाटील यांनी या प्रकल्पाचा आनंदाने प्रकाशन करण्यासाठी स्वीकार केला. सुबक व सुंदर स्वरूपात मुद्रित करून प्रकाशित केले त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.