देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला मूर्ख समजता का?

देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला मूर्ख समजता का?

देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला मूर्ख समजता का? केंद्र सरकारने रद्द केलेली योजना राज्य सरकार कशी मंजूर करू शकत?

           देवेंद्र फडणवीस साहेब नार पारचा कसला खेळ खंडोबा सुरू केला आहे? कोणाला मूर्ख बनवायला निघाला आहात तुम्ही?
         दिंडोरीचे खासदार मा भास्कर भगरे सर आणि शिरुरचे खा मा अमोल कोल्हे यांनी लोकसभेत नार-पार-गिरणा जोड प्रकल्पावर विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ति मंत्री ना चंद्रकांत पाटील यांनी लोकसभेत दिलेले उत्तर आहे कि, केंद्र सरकारने नार पार गिरणा योजना रद्द केली आहे.  केंद्र सरकारने रद्द केलेली योजना राज्य सरकार कस काय सुरू करू शकत? कलेक्टर च्या हुकुमा विरुद्ध मामलेदार वागू शकतो का?
      

देवेंद्र भाऊ ही शुद्ध बनवाबनवी आहे.  केंद्रीय जलशक्ति मंत्री ना चंद्रकांत पाटील यांनी लोकसभेत योजना रद्द केल्याची घोषणा केली.  ती योजना पुन्हा सुरू करायची तर तुम्हाला केंद्रीय जलशक्ति मंत्र्यांना सि आर ऊर्फ चंद्रकांत रघुनाथ पाटील यांची भेट घेऊन त्यांना या योजनेचे महत्व पटवून द्यायला हव होत. त्यांना पटल असत तर त्यांनी रद्द केलेला नार पार गिरणा जोड प्रकल्प आदेश रद्द केल्याचा हुकूम काढला असता. आणि मग देवेंद्रजी तुम्ही आणि सी आर पाटील दोघांनी पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प पुन्हा सुरू केल्याची घोषणा करायला हवी होती.  पण आपण यातलं काहीच केल नाही. आपण राज्यपाल यांच्याकडे सरळ जाऊन नार पार प्रकल्प मंजूर केल्याच पत्र घेऊन आलात. हे सर्व कायदेशीर आहे का? केंद्र सरकारने रद्द केलेला प्रकल्प राज्य सरकार अंमलात आणू शकत का? तुम्ही लिहून आणलेल्या पत्राला कायदेशीर किम्मत आहे का?


          मला कायद्याच ज्ञान नाही भाऊ. आपण कायदे पंडित आहात. निष्णात वकील आहात. जरा समजून सांगता का? सी आर पाटील यांनी लोकसभेत रद्द म्हणुन सांगितलेला प्रकल्प तुम्ही त्यांना न सांगता कसा मंजूर केला?
         शिवाय आपण म्हणता 10 टीएमसी पाणी गिरणेत सोडणार. एव्हढ्या पाण्यात आमच भागत नाही. तुम्ही देशभर, राज्यभर महत्त्वाकांक्षी जल प्रकल्प राबवले आहेत. तशी महत्त्वाकांक्षा खान्देशलाही आहे. आम्हाला केंदीय जल लवादाने तापी खोर्‍याला मंजूर केलेल नार पारचे आमच्या वाट्याच सर्व पाणी हव आहे. मी चुकत नसेल तर तो केंद्रीय जललवाद आयोग बच्छावत आयोग असावा. जो असेल तो. आम्हाला केमच्या डोंगरा वरील पाण्यातून गिरणा,  मोसम, बोरी, पांझरा, बुराई या सर्व नद्या बारमाही करायच्या आहेत. तरचं तापी खोर्‍यातील तुटीचे क्षेत्र जलयुक्त होईल. 


नार पार गिरणा प्रकल्प न पुरवडणारा कसा?
        गुजरातचे सरदार सरोवर आणि उकाई डॅम खान्देशच्या सीमेवर आहेत. इथून 700 किलोमीटर पाकिस्तानच्या सीमेवर कच्छ भूज मध्ये ते पाणी जाऊ शकत. हेच पाणी मांजरपाडा1 धरण बांधुन गोदावरीच्या खोर्‍यात चांदवड पर्यंत जाऊ शकत. मग आम्हाला जवळ च्या जवळ का मिळू शकत नाही?
      केंद्र सरकार लोकसभेत सांगत योजना रद्द केली. तुम्ही राज्यपालाच पत्र दाखवत म्हणता मंजूर केल. यात चूक कोण बरोबर कोण? बेकायदा कोण बोलत? तुम्ही की सी आर पाटील ते सांगा.  तुमचा भर डबल इंजीन सरकारवर आहे. आताच महाराष्ट्राच सरकार तर तीन इंजीन सरकार आहे. ड्रायव्हर सुद्धा तीन आहेत. तीन इंजीन तीन दिशेला ओढत असतील तर प्रवास कसा होईल. 


देवेंद्र भाऊ जे पत्र दाखवत आहेत तो चुनावी जुमला आहे!
ना सी आर पाटील यांनी लोकसभेत केलेली घोषणा हीच कायदेशीर घोषणा आहे. केंद्राने नार पार योजना रद्द केली हेच खरं आहे. पण ही घोषणा चुकीच्या वेळी झाली आहे.  महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत. अशा परिस्थितीत सी आर पाटील यांची घोषणा नुकसानकारक ठरू शकते.  तापी खोर महायुतीच्या हातातून जाऊ शकत. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या धुळे, नंदुरबार, दिंडोरी या तीन जागा गेल्या आहेत. त्यामुळे इथल्या 18 विधानसभाही धोक्यात आल्या आहेत. सी आर पाटील यांच्या घोषणे नंतर तापी खोर्‍यात तीव्र विरोधी प्रक्रिया उमटल्या. त्यातून बचाव करण्यासाठी देवेंद्रभाऊ यांची ही खेळी आहे. त्यावर विश्वास ठेवू नका.


हुरळली मेंढी आणि लागली लांडग्यांच्या पाठी
      देवेंद्र भाऊनी दाखविलेल्या राज्यपालांच्या पत्राने हुरळून जाऊन खान्देश पुन्हा झोपायच्या तयारीत आहे. सावध राहा.  या सरकार मध्ये दोन ज्येष्ठ मंत्री आहेत.  ना अजितदादा पवार आणि ना छगन भुजबळ साहेब. या दोघांनी 10/15 वर्षा पुर्वी असच खान्देशला फसवल होत. हे दोघे त्यावेळी सुद्धा मंत्री होते. त्यांनी नार पार गिरणेच पाणी येवल्या कडे वळविले. तेंव्हा कसमादे पट्ट्यात आंदोलन उभे राहीले.  तेंव्हा हे दोन्ही ज्येष्ठ मंत्री समोर आले.  त्यांनी खान्देशला आश्वासन दिले. घाबरू नका आम्ही आमच्यासाठी मांजरपाडा एक बांधू तुमच्या साठी मांजर पाडा दोन बनवू.  दोन्ही धरणाची काम एकाच वेळी सुरू होतील.  दोन्ही धरणे एकाच वेळी पूर्ण करू.  दोन्ही धरण एकाच वेळी कार्यान्वित करू. लोकांनी विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतल. आज मांजरपाडा धरण पूर्ण झाल आहे. त्यातलं पाणी वापरायला देखील सुरवात झाली आहे. तरी इकडे मांजरपाडा 2 वर एक वीट सुद्धा पडली नाही. हा अनुभव पाठीशी असल्या नंतर राज्यपाल यांच्या पत्राने हुरळून जायची गरज नाही. राज्यपाल यांची मंजुरी म्हणजे चुनावी जुमला आहे हे खान्देशी अहीरानी लक्षात घ्यावे.


        नार पारच्या पाण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरुन लढावे लागेल. अन्यथा खान्देशच वाळवंट होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे हे नक्की. 
बापू हटकर

Leave a Comment