कवितेची कार्यशाळा
“धनाईमातेच्या पावनपरिक्षेत्रात रंगली”
“कवितेची एकदिवसीय “कार्यशाळा”
निसर्गरम्य सातपुड्याच्या कुशीत श्री क्षेत्र म्हसदी येथे आदीशक्ती धनाईमातेच्या सानिध्यात आदिशक्ती धनदाई माता शिक्षण प्रसारक संस्थेचे स्व.अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने नवोदित कवींसाठी“कवितेची एक दिवसीय कार्यशाळा” कवितेची कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत निमंत्रित १५ कवींच्या कवीसंमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविण्याचा मान मला मिळाला. उपस्थित कवींनी कवितेचे अष्टाक्षरी, गेय, वृत्तबद्ध, मुक्तछंद, गझल, अभंग, पोवाडा, आहिराणी आदी प्रकाराच्या कविता सादर करुन नवोदीत कवींपुढे प्रात्यक्षिक साजरे केले. कला विज्ञान महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेला प्राचार्य डॉ. संजीवजी गिरासे यांनी निमंत्रित करुन ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
डॉ. संजयकुमारजी आर. देवरे (अध्यक्ष, आ.ध.मा.शि.प्र. संस्था. धुळे), भाऊसाहेब देशमुख, प्राचार्य डॉ. गिरासे व मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. डॉ. विरा राठोड यांनी बीजभाषणातून कवितेच्या निर्मितीप्रक्रियेवर अभ्यासपूर्ण भाषण केले.
दुसऱ्या सत्रात रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविता लेखन तंत्र व प्रशिक्षण या सत्रात डॉ. रमेश माने यांनी कवितेची समृध्द वाटचाल या विषयावर तर डॉ. नरेंद्र खैरनार यांनी मंचीय कवितेची सद्यस्थिती यावर साधकबाधक चर्चा केली.
दुसऱ्या सत्रात निमंत्रित कवींच्या कवीसंमेलनात प्रा.बी.एन. चौधरी (धरणगाव) यांच्या अध्यक्षतेखाली कवी रावसाहेब कुंवर (साक्री), रमेश धनगर (गिरड), सतीश पेंढारकर (साक्री), अनुपमा तंवर ( शिरपूर), संजय धनगव्हाळ, (धुळे), विलास मोरे (एरंडोल), रविंद्र पानपाटील (धुळे), अरविंदा भामरे (शिरपूर), प्रा. संगिता पाटील ( शिरपूर), शिल्पा जैन ( शिरपूर), डॉ. दिलीप लोखंडे आणि पंकज कल्याणकर यांनी कविता सादरकरणाच्या कौशल्यांसह कवितेची विविध रुपं उपस्थितांच्या समोर मांडली.
समारोपाच्या सत्रात डॉ. सतिष म्हस्के यांनी कविता मनातील व शब्दातील यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

सातपुड्याच्या कुशीत अत्यंत ग्रामीण भागात एक भव्य आणि अत्याधुनिक सभागृहात अत्यंत देखणे आयोजन करुन प्राचार्य डॉ. संजीवजी गिरासे, उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव पाटील, प्रा.डॉ. वाल्मीक आढावे (मराठी विभाग प्रमुख) यांनी गाव-खेड्यापर्यंत कविता पोहचवली.
ग्रामीण भागातील शंभरावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कवितेचं तंत्रशुद्ध मार्गदर्शन व्हावं हा त्यांचा प्रयत्न बऱ्याच अंशी फलद्रूप झाला. यानिमित्ताने ७१ कुळाची कुलदैवत असलेल्या धनाईमातेच्या दर्शनाचा लाभ झाला.
या पावन परिक्षेत्रातील परिसर न्याहाळता आला. म्हसदी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंदांनी आणि विद्यार्थ्यांनी कार्यशाळा यशस्वीतेसाठी जी शिस्त, समर्पण आणि उत्साह दाखविला तो अभिनंदनीय आणि अनुकरणीय होता.
© प्रा.बी.एन.चौधरी.
(९४२३४९२५९३)





1 thought on “कवितेची कार्यशाळा”