वैफल्याचे सहस्त्रचंद्र शरद पवार यांचे राजकीय जिवन
– प्रशांत पोळ
१० डिसेंबर ला शरद पवारांचा ऐंशी वा वाढदिवस महाराष्ट्रात थाटामाटाने साजरा झाला. यानिमित्ताने वर्तमानपत्रांनी भल्या मोठ्या पुरवण्या काढल्या. अनेक जाहिराती मिळविल्या आणि कोरोना काळातली तूट, काही अंशी भरून काढली. पवारांच्या स्वतः च्या घरच्या वर्तमानपत्राने, अर्थात ‘सकाळ’ ने, तीन – चार पुरवण्यांसकट तब्बल ३६ पानांचा अंक काढला. सकाळच्या जाहिरात विभागाने, काल पार्टी करून हे यश साजरे केले असे म्हणतात.
फक्त प्रिंट मिडियाच नाही, तर इलेक्ट्रॉनिक मिडिया सुध्दा पवारांच्या वाढदिवसामुळे धन्य धन्य जाहला. प्रत्येक मराठी वृत्त वाहिनी वर, दिवसभर पवारांवर शुभेच्छांचा रतीब होता.
एकच लहानसा मिठाचा खडा पडला. ‘दिव्य मराठी’ च्या ‘संजय आवटे’ ह्या संपादकाने, पार कुमार केतकरांना लाज वाटेल अश्या शब्दात, सोनिया गांधींच्या भाटगिरीचे संपादकीय छापले. वास्तविक शरद पवारांवर अख्खा महाराष्ट्र दिवे ओवाळत असताना, आवट्यांनी सोनिया गांधीची अवास्तव तारीफ करण्याचं काही एक कारण नव्हतं आणि औचित्यही नव्हतं. पण ते उगाच नाक खाजवल्या सारखं झालं.
एखाद्या व्यक्तीने ऐंशी वर्षाचा टप्पा गाठला, म्हणजे त्या व्यक्तीने सहस्त्र चंद्र दर्शन केले असे म्हटले जाते. या अर्थाने शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात एक हजार पूर्ण चंद्र (पौर्णिमा) पाहिले आहेत.
आयुष्याचा हा भाग एक प्रकारे आत्मचिंतनाचा असतो. गेल्या ऐंशी वर्षात आपण आपल्या जीवनाचा ताळेबंद नेमका कसा मांडला, याचा आढावा घेण्याचा असतो. हा कालखंड शांतपणे नातवा – पतवंडांबरोबर व्यतीत करण्याचा, कुटुंबाला, पक्षाला, समाजाला सल्ला देण्याचा, त्यांचे मार्गदर्शन करण्याचा आणि भावी पिढीने केलेल्या पराक्रमांना, घरी बसून दाद देण्याचा असतो. आपल्या हिंदू जीवन पध्दतीत हीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
दुर्दैवानं पवारांचं तसं नाही. आज वयाचा ऐंशी हा टप्पा गाठल्यावरही त्यांना धावपळ करावी लागतेय. सतत प्रवास करावा लागतोय. पक्षावरची पकड मजबूत ठेवण्यासाठी नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहावं लागतंय. पक्षाला निवडणूक जिंकवून देण्यासाठी चक्क पावसात भिजावं लागतंय. आणि ‘आपणच यूपीए चे अध्यक्ष होऊ’ अशी बातमीही पेरावी लागतेय.
हे पवारांचं दुर्दैव आहे. ‘राजकारणात सेवानिवृत्तीचं वय नसतं’ हे जरी खरं असलं तरीही ऐंशी हे वय काही राजकारणात सक्रिय राहून, धावपळ करत, पक्ष टिकवण्याचंही नाही. आणि हेच पवारांचं दुःख आहे. आज पवार सक्रिय राहिले नाहीत, तर पक्ष एकसंध राहणार नाही, हे सत्य आहे. ज्याप्रमाणे आयुष्यभर कॉंग्रेस च्या अनेक नेत्यांनी पवारांवर विश्वास दाखवला नाही, आणि ठेवलाही नाही, त्याचप्रमाणे शरद रावांचा विश्वासही आपल्या पुतण्यावर नाही. त्यामुळे अजित पवारांच्या हाती पक्ष सोपवून निवृत्त होता येत नाही आणि मुलीच्या हाती पक्ष सोपविताही येत नाही (जसा बाळासाहेबांनी उध्दवच्या हातात सोपवला होता).
मुलीचं नेतृत्व कार्यकर्त्यांना मान्य नाही आणि पुतण्याचा भरवसा नाही. मग अश्या स्थितीत, जमेल तसा पक्ष हाकणं, हीच पवारांची नियती आहे.
पवारांचं दुर्दैव की त्यांना आयुष्यात काही भव्य – दिव्य करून दाखवता आलं नाही. त्यांनी राजकारणात अनेक वळणं घेतली. अनेक चाली खेळल्या. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी अगदी कुठल्याही स्तरावरचं राजकारण केलं.
१८ जुलै १९७८ ला, जेंव्हा त्यांनी त्यांच्याच कॉंग्रेस चे आमदार फोडून, महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तेंव्हा त्यांचे गुरु आणि मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलेल्या वसंतदादा पाटील यांची जळजळीत प्रतिक्रिया होती, “पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला.”
पवारांचे या नंतरचे राजकारण हे अश्याच प्रकारे, उंटाच्या तिरक्या चाली सारखे चालले. ‘कुटीलतेचा पर्यायवाची शब्द म्हणजे शरद पवार’, असं त्यांच्या बद्दल माध्यमांमधून लिहून येऊ लागलं. त्यांनी त्यांची स्वतंत्र कॉंग्रेस तयार केली. मात्र इंदिराजींच्या मृत्यू नंतर राजीव गांधींना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे, १९८७ ला औरंगाबादेत, राजीव गांधींच्या उपस्थितीत तोच पक्ष कॉंग्रेस मध्ये विलीन केला. पुढे २५ मे १९९९ ला, कॉंग्रेस पक्षाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केलं नाही, म्हणून सोनिया गांधींच्या विरोधात, वेगळी कॉंग्रेस काढली. ज्या एकमात्र मुद्द्यावर ते कॉंग्रेस पासून वेगळे झाले होते, तोच मुद्दा फक्त साडे चार वर्षात बासनात गुंडाळून ठेवून, ते सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील यूपीए च्या सरकारात सामील झाले आणि दहा वर्ष कृषि मंत्री राहिले. म्हणजे सगळाच गोंधळ. वैचारिक आणि राजकीयही.
१९८५ साली, पवारांनी जेंव्हा त्यांच्या पक्षाच्या वतीने स्वतंत्रपणे विधानसभेची निवडणूक लढवली होती, तेंव्हा त्यांच्या पक्षाला मिळालेल्या जागा होत्या – ५२. पुढे कृष्णा – कोयनेत अनेक वर्षांचं पाणी वाहून गेल्यानंतर २०१९ मध्ये जेंव्हा पवारांच्या पक्षाने कॉंग्रेस बरोबर हातमिळवणी करून विधानसभेच्या निवडणुका लढवल्या, तेंव्हा त्यांना मिळालेल्या जागा आहेत, फक्त ५४..! पवार, राजीव गांधींबरोबर बरोबरीच्या नात्याने वावरत असताना ज्या नुकत्याच राजकारणात लुडबूड करू लागल्या होत्या, त्या ममता बेनर्जी यांनी आपल्या स्वबळावर आणि हिंमती वर दोनदा पश्चिम बंगाल सारख्या कठीण प्रदेशात सत्ता खेचून आणली. आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, तामिळनाडू, ओरिसा, उत्तर प्रदेश, बिहार ह्या सर्व राज्यात त्या त्या प्रादेशिक नेतृत्वाने किमान एकदा तरी स्वबळावर सत्ता मिळवून दाखवली आहे.
दुर्दैवानं ‘कुटीलतेचा पर्यायवाची शब्द’ असलेल्या पवारांना आपल्या स्वतः च्या हिंमतीवर कधीही ७१ पेक्षा जास्त आमदार आणि ९ पेक्षा जास्त खासदार निवडून आणता आलेले नाहीत, ही शोकांतिका आहे.
शरद पवार तीनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण वसंतराव नाईक आणि देवेन्द्र फडणवीस यांच्या सारखं एकदाही सलग पाच वर्ष ते मुख्यमंत्री राहू शकले नाहीत.
ज्या सलग १० वर्षे (२३ मे २००४ ते २६ मे २०१४) ते केंद्रीय कृषि मंत्री होते, तो काळ सर्वात अयशस्वी गणला जातो.
याच काळात, आजपर्यंत च्या शेतकर्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. नेमकं सांगायचं तर पवारांच्या मंत्रीपदाच्या काळात एक लक्ष एकाहत्तर हजार एकशे पस्तीस (१,७१,१३५) शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. बरं, शेतीचा विकासही नीट होऊ शकला नाही. पवारांनी जेव्हा शेतकी मंत्रालय चालवायला घेतलं, तेंव्हा देशाचा कृषि विकास दर होता, ४%. मात्र २०१४ मध्ये त्यांनी मंत्रालय सोडलं तेंव्हा देशाचा कृषि विकास दर हा ऋणात्मक झालेला होता, -०.२%.
पवारांच्या कारकीर्दीचं हे सारं वैफल्य आता बाहेर निघतंय. शेतीच्या क्षेत्रात जे रिफॉर्मस (सुधार) करायला हवेत असं त्यांना सातत्यानं वाटत होतं, अनेक भाषणात, पत्रांत त्यांनी जे मांडलं होतं, अगदी आपल्या आत्मचरित्रात (‘लोक माझे सांगाती’) सुध्दा त्यांनी ज्या सुधारांचा उल्लेख केला, ते रिफॉर्म, कायद्याच्या स्वरुपात मांडणं त्यांना शक्य झालं नाही. त्यांची राजकीय इच्छाशक्ति तिथे अपुरी पडली. मात्र तेच रिफॉर्म (सुधार) मोदी सरकार ने शेतकी कायद्याच्या रूपात मांडले तर पवारांनी त्याचा विरोध केला नाही. फक्त ते राज्यसभेत अनुपस्थित राहिले. आणि आता शेतकरी आंदोलन पेटतंय म्हटल्यावर, आपल्याच वक्तव्याच्या विरोधात ते त्या शेतीच्या सुधारांचाच विरोध करू लागले. पत्रकारांनी त्यांना त्यांच्या जुन्या पत्रांबद्दल आणि भाषणांबद्दल विचारलं, तर चिडू लागले. पत्रकारांवर डाफरू लागले!
हे सारं वैफल्य आहे.
आणि म्हणूनच आता लोकांचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी त्यांना ‘पवार यूपीए चे अध्यक्ष होतील..’ अश्या नितांत ‘बेसलेस’ बातम्या सोडाव्या लागत आहेत.
ऐंशी गाठलेल्या पवारांची ही शोकांतिका आहे. आणि म्हणूनच, ह्या लढाऊ राजकारण्याची आता कीव येतेय!
– प्रशांत पोळ