नव्या हिट अ‍ॅण्ड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन

नव्या हिट अ‍ॅण्ड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन

दैनिक पोलीस शोध

संपादकीय
दि. 3/1/2024

नव्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ कायद्याविरोधात
ट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन !

केंद्र सरकारने अलिकडेच भारतीय दंड संहिता बदलून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता आणली आणि या न्याय संहितेमध्ये निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात झाल्यास आणि पोलीसांना न कळवता पळून जाणार्‍या चालकांना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आणि याच कायद्याविरोधात देशातील ट्रक चालकांनी आंदोलन पुकारले आहे.


भारतात रोड अपघातात मरणार्‍यांची संख्या ही दिवसागणिक वाढते आहे. लहान-लहान मार्गांचे महामार्गामध्ये रूपातंर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. राष्ट्रीय महामागार्ंचे चौपदरीकरण होत असून अजून मोठ्या मार्गांचे सहापदरीकरण करण्यात येत आहेत.

देशाच्या विकासात महामार्गांचे जाळे जेव्हढे विस्तीर्ण असेल, रेल्वे महामाार्गांचे जाळे जेव्हढे जास्त असेल तेव्हढे औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. त्यामुळे ‘महामार्गा’चा ‘विकास’ आणि ‘विस्तार’ हा देशाच्या विकासातील महत्वाचा मुद्दा मानला जातो. विशेष म्हणजे हा प्रवास कमी लांबीचा व्हावा, परवडणारा व्हावा, वेळेची आणि इंधनाची बचत व्हावी या दृष्टीने देखील महामार्गांची लांबी कमी केली जाते आहे.

देशाचे केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी मागील दहा वर्षात या क्षेत्रात मोठे काम केले आहे. महामार्गाच्या विस्तारीकरणात ट्रॉफिक जाम होऊ नये, अपघात होवू नयेत या दृष्टीने देखील त्यांची रचना करण्यात आली आहे. परंतू एकीकडे महामार्गाचे विस्तारीकरण, रूंदीकरण होत असतांना वाहनांची संख्या देखील मोठ्या संख्येने वाढते आहे.

महानगरांचा विस्तार, वाढलेले औद्योगिकीकरण यामुळे वस्तूंची आवक-जावक वाढली असल्याने रस्त्यावरील प्रवासी वाहनांची आणि गुड्स वाहतूक करणार्‍या वाहनांची संख्या वाढली आहे. आणि यातून अपघातांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अपघात होण्याची अनेक कारणे आहेत. ज्यामध्ये वेगावर नियंत्रण नसणे, ड्रिंक करून वाहन चालविणे, स्पीड ब्रेकर, नियमांचे पालन न करता वाहन चालविणे, चुकीच्या पद्धतीने लेन कटींग करणे, ओव्हर टेक करणे, वाहन चालवितांना एका क्षणासाठी बस चालकाचे लक्ष विचलित होणे, डुलकी लागणे, टायर फुटणे, सुचना फलक नसणे, रोडवर पशु-प्राणी अचानक येणे, मोबाईलवर बोलतांना वाहन चालविणे अशी एक ना अनेक कारणे अपघातासाठी कारणीभूत ठरतात.आणि या अपघांतामध्ये एका चालकाच्या चूकीमुळे अनेकांचे प्राण जातात. अपघातात मरणार्‍या प्रवाशांची संख्या ही देशाच्या सर्वोच्च न्यायालयासाठी सुद्धा चिंतेचा विषय ठरली आहे.

विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर पळून जाण्याची भारतीय चालकांची मानसिकता भयावह आहे, अपघात ग्रस्त व्यक्तीस ताबडतोबीने हॉस्पिटलाईज करणे महत्वाचे असते. परंतू ट्रक चालक, कार चालक हे लोक आपल्याला मारतील या भावनेने अपघात होताच वाहन घेवून किंवा वाहन जागेवरच सोडून पळून जतात. हे कायद्याचे दृष्टीने आणि मानवीय दृष्टीने पूर्णपणे चूकीचे आहे. परंतू ‘तो मी नव्हेच’ या भावनेतून पळून जाण्याचेच प्रकार नेहमी होतांना दिसतात.

म्हणून ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणात आधी जी दोन वर्ष तुरूंगवासाची शिक्षा होती ती आता नव्या कायद्यात 10 वर्ष करण्यात आली असून 7 लाखाचा दंडांची तरतूद करण्यात आली आहे. आणि याच प्रमुख दोन बाबींसाठी अखिल भारतीय ट्रक चालक संघटनेने देशभर आंदोलन पुकारले आहे. ज्यामुळे किमान दहा राज्यांमध्ये वाहतूक प्रभावीत झाली असून पेट्रोल, डिझेल, दुध, भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या पूरवठ्यावर प्रभाव पडला आहे. प्रश्न असा आहे की देशातील लहान-मोठ्या वाहनांमध्ये होणारे अपघात हे चिंताजनक असून यात मृत्यू पावणार्‍यांची संख्या ही कमी होण्याऐवजी वाढते आहे.

2022 मध्ये देशात पावणेपाच लाख रोड अपघात झाले. ज्यामध्ये एक लाख 68 हजार लोकांचा मृत्यू झाला. 2022 मध्ये 11.92 टक्के अपघातात वाढ झली असून 9.4 टक्के मृतांची संख्या वाढली. भारतात दररोज जवळपास 1263 अपघात होतात. तर 461 लोकांचा मृत्यू होतो. प्रत्येक तासाला 53 अपघात होतात तर 19 लोक मृत्यूमुखी पडतात. ही सरासरी आकडेवारी असून यापेक्षा जास्त अपघात प्रत्यक्षात होतात, असे शासनाच्या आकडेवारीत स्पष्ट म्हटले आहे. आणि अपघातात होणारे मृत्यू हे कुटूंबासह समाजसाठी सुद्धा चिंतनिय आहेत. म्हणून हे अपघात कमी कसे होतील यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असते. मी चूकीच्या पद्धतीने वाहन चालविणार नाही, अनियंत्रित वाहन चालवणार नाही, नियमांचे पालन करून वाहन चालविणार, वाहन चालवितांना ड्रींक करणार नाही, मोबाईलवर बोलणार नाही, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणार नाही, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणार नाही, वाहनांची नियमित तपासणी करूनच वाहन चालवेल, अशा अनेक गोष्टीचे, नियमांचे पालन प्रत्येक वाहन चालकाने केले तर अपघातांची संख्या निश्चितपणे कमी झाल्याशिवाय राहणार नाही. परंतू गतीमान युगात वेळ कुणाजवळ ही नाही.

मोठे ट्रक चालक, मद्य पिऊन वाहन चालवितात, कारचालक, मोटरसायकल चालक मोबाईलवर बोलत असतांना वाहन चालवितात. मृत्यू स्वस्त झाला आहे कारण मेलो तरी चालेल, माझा परिवार उघड्यावर पडला तरी चालेल, माझ्या मुलाला बाप राहिला नाही तरी चालेल, मी मेल्यावर आईला दूसरा मुलगाच नसल्याने ती कितीही हंबरडा फोडून रडली तरी चालेल, परंतू मी माझ्या मनाप्रमाणेच गाडी चालविणार अशा पद्धतीने गाडी चालविणार्‍या ना-लायक वाहन चालकांची संख्या या देशात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यात तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

त्यांना जन्माला यायची पण घाई असते आणि मरायची पण तेव्हढीच घाई असते. म्हणून आता अपघात झाल्यावर लोक मरणार्‍यांबद्दल जास्त संवेदनशील दिसत नाहीत. ही दुखाःची बाब आहे. जीवन खुप अनमोल आहे, जीवन खुप सुंदर आहे, मी या देशाचा आदर्श नागरीक आहे, माझ्या कुटूंबासाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या आई-वडीलांसाठी मी खुप महत्वपूर्ण आहे अशी भावना दृढ होऊन जर नियमांचे पालन करून, वेळेचे नियोजन करून आम्ही प्रवास केला तर अपघात होणार नाहीत.

आपल्या चूकीच्या ड्रायव्हींगमुळे, बेजबाबदार पणामुळे अपघात होणार नाही हे निश्चित केले तर आणि सर्व वाहन चालकांनी ही भावना ठेवून वाहन चालविले तर निश्चितपणे या देशातील अपघातांची संख्या कमी झाल्याशिवाय राहणार नाही. परंतू पैशांचा ‘माज’ हा आपल्या जीवनापेक्षा जास्त असल्याने आज मृत्यू ‘स्वस्त’ झाला आहे. ट्रक चालक सुद्धा लहान कार चालकांप्रमाणे रस्त्याने मस्तीत ट्रक चालवितात, मद्य पिऊन ट्रक चालवितात. लहान चालकांना उडवून पळून जातात. त्यांचेसाठी दहा वर्षाची शिक्षा देखील कमी आहे त्यांना आजन्म कारावासाची शिक्षाच दिली पाहिजे. त्याशिवाय या देशातील वाहन चालकांचा ‘माज’ उतरणार नाही. कडक कायदे केल्याशिवाय अपघात कमी होणार नाहीत. पोलीसांनी यात प्रामाणिक भूमिका पार पाडाली पाहिजे. परंतू पोलीस पैसे घेवून नियमांचे पालन न करणार्‍यांना सोडून देतात. म्हणून कायद्याला आता लोक घाबरत नाहीत, ही देखील दूसरी बाजू आहे. म्हणून अपघातांवर चिंतन करण्याची गरज आहे. ट्रक चालकांचे आंदोलन हे आपल्या गुन्ह्यांवर पडदा टाकण्यासाठी आहे त्यामुळे सरकारने त्याचंया आंदोलनाची विशेष दखल घेण्याची गरज नाही असे आम्हाला वाटते.

तूर्तास एव्हढेच

Leave a Comment