शुन्य वाहे भार शुन्याचाच!
विश्वाच्या पसाऱ्यात पसरलेल्या प्रत्येक जीवाचं जगणं तपासुन पाहिल्यावर आपल्या असं लक्षात येतं की, शुन्यातून सुरु झालेला विश्वाचा प्रवास शुन्याच्याच दिशेने अखंडपणे सुरू आहे. याबाबतचा चिंतनशील विचार मांडणारा हा लेख.
शुन्य म्हणजे एखाद्या गोष्टीचा संपूर्ण अभाव असणे होय. शुन्य म्हणजे काहीही नसणे किंवा काहीच नाही हे दाखवणारा अंक होय. या अंकाचा शोध पाचव्या शतकात म्हणजे इ.स. ४५६ मध्ये आर्यभट्ट यांनी लावला अशी नोंद इतिहासात आढळून येते. याबाबत अनेक वादविवादही आहेत; मात्र शुन्याचा शोध आणि त्याच्या व्यवहारातील वापराची सुरुवात भारतातच झाली आहे. याबद्दल कुणाचेही दुमत असू नये. बीजगणितात शुन्याला अगणित महत्त्व आहे. शुन्याच्या डावीकडे अगणित ऋण संख्या आणि शुन्याच्या उजवीकडे अगणित धनसंख्या असतात. या एका गृहितकावर उभ्या राहिलेल्या बीजगणिताने अनेक विद्यार्थ्यांना शाळेत आणि आयुष्यातही अनेकदा मार खायला लावला. काही विद्यार्थ्यांना गणितातला हा शुन्य कधी कळलाच नाही; त्यामुळे गुणपत्रिकेत त्यांना कायम शुन्य मिळत राहिला. काहींचे आयुष्य या शुन्याने इतके घेरले की त्यांचे अवघे आयुष्यच शुन्य झाले! अपवाद म्हणून काही विद्यार्थी या शुन्यावर स्वार होऊन पुढे सरसावले. त्यांनी जीवनात लौकिक अर्थाने लहान-मोठे यश मिळवले. शुन्यातून आपलं विश्व निर्माण करणारे यशवंत म्हणून लोक त्यांचं कौतूक करू लागले. आपण या सगळयात कुठे आहोत? हे ज्याचं त्याला एव्हाना कळून आलं असेलच. अर्थात आपण कुठेही असलो तरी आपण सर्वजण शुन्य होऊन या शुन्याचाच भार वाहात आहोत हे मात्र कुणालाही नाकारता येणार नाही!
शुन्यातूनच हे संपूर्ण विश्व निर्माण झालं असं म्हणतात. त्याचा नेमका अर्थ काय? त्यासंबंधीचं एक मिथक सांगीतलं जातं. ते असं- अगदी सुरुवातीला विश्वात काहीच नव्हतं, म्हणजे सगळीकडे शून्य होतं! सगळीकडे शुन्य असताना ईश्वर मात्र एक होता. त्या ईश्वराने ब्रह्म आणि माया असे दोन घटक निर्माण केले. त्यातून रज, तम आणि सत्व असे त्रिगुण तयार झाले. मग पुढे त्यांची ओळख सांगणारे चार वेद निर्माण झाले. ज्याच्या आधारे पंचमहाभूतांचे जग आकाराला आले. त्यात सजीव निर्माण झाले. त्यांच्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे षडरिपू झाले. सोबतच सात रंग, आठ दिशा आणि नऊ ग्रहाची निर्मिती झाली. अस एक चक्र पूर्ण झालं. अशी दहा चक्र पूर्ण झाली आणि आपण शंभरावर पोहोचलो. विश्वाच्या निर्मितीबाबत अध्यात्म असं काहीतरी सांगत राहातं. विज्ञान देखील संपूर्ण विश्वाची निर्मिती शुन्यातून झाली असं म्हणत बिग बॅन्गची कथा आपल्यासमोर मांडतं.
यशाच्या शिखरावर विराजमान झालेली काही माणसं कधी कधी ढासळतात. त्यांचा तोल ढळतो, ती घसरतात, त्यांचं अधःपतन होतं आणि काही कळायच्या आत अशी तोल ढळलेली माणसं शुन्य होऊन जातात! त्यांचं बहूमोल आयुष्य क्षणार्धात मातीमोल होतं!
काही माणसं शुन्यात हरवतात. त्यांना भोवतालचा विसर पडतो. ती स्वमग्न होत जातात आणि एक दिवस त्यांना स्वतःचाही विसर पडतो. अशा माणसांचं नेमकं काय चाललं आहे? हे कुणालाच कळत नाही, अगदी त्यांना स्वतःलाही! अशी स्वमग्न माणसं समाजाच्या दृष्टीनं शुन्य झालेली असतात. शहाणी, चतुर व हुषार असणारी काही माणसं एखाद्या बेसावध क्षणी शुन्य होऊन जातात. त्यांची मति कुंठित होते. गति थांबते. परिणामी त्यांची प्रगती लांबते! एरव्ही इतर सामान्य माणसे ही कर्मसिद्धांताने सांगीतल्यानुसार आपल्या कर्मफलाचा भोग- उपभोग घेत- घेत आपल्या मृत्यूच्या कवेत जात असतात. म्हणजे तीही अखेर शुन्यच होत असतात! या पार्श्वभूमीवर विश्वाच्या पसाऱ्यात पसरलेल्या प्रत्येक जीवाचं जगणं तपासुन पाहिल्यावर आपल्या असं लक्षात येतं की, शुन्यातून सुरु झालेला विश्वाचा प्रवास शुन्याच्याच दिशेने अखंडपणे सुरू आहे.
संत श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या या प्रवासाला एका ओवीत बांधताना फार सुंदर शब्दांत लिहीले आहे-
उपजे तें नासे । नासलें ते पुनरपि दिसे ।
हे घटिकायंत्र जैसें । परिभ्रमे गा ॥ ( ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी क्र.१५९ )
जे उत्पन्न होते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते. रहाटगाडग्यासारखा हा क्रम अखंड चालतो. उत्पत्ती, स्थिती व लय यांचा हा क्रम अखंड सुरु आहे. उत्पत्ती, स्थिती व लय कुणालाही थांबविता येत नाहीत. ही व्यवस्था अविरत चालू आहे. जन्म-मृत्यू टाळता न येणारे आहेत. उदय आणि अस्त हे निरंतर सुरु असतात. सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते. जन्मल्यानंतरच त्यांना आकार प्राप्त होतो. प्रकार कोणताही असो, जो आकाराला येतो त्याला विकार चिकटतातच. एकदा विकार चिकटला की, त्याचा लय निश्चित होतो. जे असे लयास जातात ते त्यांच्या मूळच्या अव्यक्त स्थितीला जाऊन पोहोचतात.
थोडक्यात सांगायचं तर असं म्हणता येईल की, या विश्वाचे काही नियम आहेत. ते सर्व विश्वाला पाळावेच लागतात. या नियमांमधील एक नियम हा आहे की, या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या आहेत, होत आहेत किंवा होतील त्या सर्व गोष्टी नाश पावल्या आहेत, नाश पावत आहेत किंवा नाश पावणार आहेत. याचं संक्षिप्त वर्णन करताना “शुन्य वाहे भार शुन्याचाच!” असं म्हटलं तर ते मुळीच वावगं ठरू नये.
लेखक
© अनिल आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहमदनगर, संपर्क : ९७६६६६८२९५
1 thought on “शुन्य वाहे भार शुन्याचाच”