जीवन सुंदर आहे

जीवन सुंदर आहे

जीवन सुंदर आहे!

जीवन खूप सुंदर आहे. जीवनाचे हे सौंदर्य आपण शोधून ते आपल्या परिनं उपभोगायला हवं. जीवनातल्या अनेक आनंददायक अनुभवांनी आपण समृद्ध बनायला हवं. याच समृद्धीच्या जोरावर आयुष्यातल्या संकटांवर यशस्वीपणे मात करता येते. जीवन जगण्याची ही रीत थोरा-मोठयांनी सांगीतली आहे. “महाजनो येन गतःस पंथा” या उक्तीप्रमाणे आपण चालत राहावं हेच खरं! छोट्या-छोट्या गोष्टींचा ताण घेवून आपण आपला प्राण द्यावा, आपलं जीवन संपवावं अशी ईश्वराची इच्छा कधीच नसते. आपलं जीवन खरंच खूप सुंदर आहे हे आपण समजून घेणं ही सध्याची काळाची आणि कळीची गरज आहे.

मागच्या आठवड्यात मी स्वतःच माझ्या बिघडलेल्या तब्बेतीच्या कारणाने चार दिवसांसाठी एका हॉस्पीटलात होतो. माझ्या बाजूला दुर्धर आजाराशी सामना करीत असलेले एक सत्तरी पार केलेले आजोबा होते. त्यांना जेवण घेता येत नव्हतं. त्यामुळं फक्त मेडिकेटेड लिक्वीड अन्न त्यांना नळीद्वारे दिलं जात होतं. त्यांच्या वयामुळं त्यांच्या हाता-पायाच्या शीरा सलाईन देण्यासाठी उपयोगी ठरत नव्हत्या. आता काय करायचं असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. तेव्हा आजोबांनी मानेच्या शिरेतून सलाईन द्या असं डॉक्टरांना सुचवलं. डॉक्टरांना हा पर्याय माहित असूनही आजोबांचं वय आणि त्यांना होणारा त्रास लक्षात घेता त्यांना मानेतून सलाईन देण्याची कल्पना डॉक्टरांनी राखून ठेवली होती. चोवीस तासातल्या प्रत्येक इंजेक्शनच्या वेळी आजोबा अतिशय आर्तपणे “आई! आई!” असं म्हणत वेदना सहन करीत होते, मात्र त्यांच्या तब्बेतीची चौकशी करायला आलेल्या प्रत्येक फोनवर ते हसून आनंदानं बोलत असत. व्हीडीओ कॉलवर आजोबांना पाहून त्यांची नातवंडं त्यांच्याशी जेव्हा काळजीच्या स्वरात बोलत, तेव्हाही आजोबा त्यांच्याशी हसूनच बोलत असत. आपण आपल्या नातवंडाशी कसं बोललं पाहिजे याचा माझ्यासारख्या नव्याने आजोबा होणाऱ्या लोकांसाठी तो जणू वस्तुपाठच होता! मला डिसचार्ज मिळाल्यावर त्यांनी मला हसत हसत हात हलवून दिलेला निरोप ही माझ्यासाठी प्रेरणेची मोठी शिदोरीच होती. जीवन जगण्याचं ते अतिशय उत्तम उदाहरण म्हणता येईल. हॉस्पीटलमध्ये भेटलेल्या या आजोबांना चार दिवस याचि देही याचि डोळा अनुभवताना मनातल्या चिंतनयात्रेला बहर आला नसता तर मला नवलच वाटलं असतं.

आपल्या आजूबाजूला पाहिलं, ऐकलं आणि अनुभवलं तर जीवनाला कंटाळलेले अनेक आर्त स्वर ऐकू येतात. गांजलेले, त्रासलेले अनेक जीव दृष्टीस पडतात. कुणी कर्जबाजारी झाले म्हणून, कुणी नापास झाले म्हणून, तर कुणाला ताण असह्य झाला म्हणून, कुणी आजाराला कंटाळून आपलं जीवनच संपविण्याचा निर्दयी व निष्ठूर निर्णय घेवून टाकतात! एका क्षणात सारं संपून जात. हातातल्या सोन्याची माती होते. डोक्यावर आभाळ कोसळतं. पायाखालची जमीन फाटते. जीवनातला उजेड नाहीसा होतो. सगळीकडून अंधारुन येतं. माणसाच्या वाट्याला आलेले प्रश्न, समस्या, अडचणी, संकटं यांची सरशी होते. माणूस हिंमत हरतो आणि जीवनही! अडचणी आणि संकटांतून आलेले गांजलेपण, गांगरलेपण आणि त्यामुळे नाडलेल्या, पीडलेल्या जीवाला त्याच्या जीवनातलं सौंदर्य दिसेनासं होतं! या पार्श्वभूमीवर मी पाहिलेले हॉस्पीटलातले आजोबा मात्र संपूर्ण वेगळे होते. त्यांनी मला थेट विवेकानंदांचीच आठवण करुन दिली!

“आपल्या आयुष्यात संकटे येत नसतील तर आपण खुशाल समजावं की आपला जीवन जगण्याचा मार्ग चुकला आहे” असं स्वामी विवेकानंद म्हणत असत. त्याचा अर्थ इतकाच की, सज्जनाच्या वाट्याला दुःख येणारच. दुःखाला सज्जनाचीच संगत आवडते. म्हणूनच आपण संकटांना टाळायचे नाही! कवटाळायचे तर मुळीच नाही! हे जीवन खूप सुंदर आहे. जीवनाचे हे सौंदर्य आपण शोधून ते आपल्या परिनं उपभोगायला हवं. जीवनातल्या अनेक आनंददायक अनुभवांनी आपण समृद्ध बनायला हवं. याच समृद्धीच्या जोरावर आयुष्यातल्या संकटांवर यशस्वीपणे मात करता येते. जीवन जगण्याची ही रीत थोरा-मोठयांनी सांगीतली आहे. “महाजनो येन गतः स पंथा” या उक्तीप्रमाणे आपण चालत राहावं हेच खरं! छोट्या-छोट्या गोष्टींचा ताण घेवून आपण आपला प्राण द्यावा, आपलं जीवन संपवावं अशी ईश्वराची इच्छा कधीच नसते; मात्र
आपलं जीवन खरंच खूप सुंदर आहे हे आपण समजून घेणं ही सध्याची काळाची आणि कळीची गरज आहे.

जीवन म्हणजे आपलं कर्तृत्व, आपली जिद्द आणि नियती यांच्यामधील जुगलबंदी आहे! जीवन म्हणजे खळाळून वाहणारी नदी आहे. या नदीला सुख-दुःखाचे दोन किनारे असतात. आपण त्यांच्यामधून वाहणारा प्रवाह आहोत! नदीचा हा प्रवास मोठा गंमतीचा असतो. नदीला माघारी फिरता येत नाही. तिला केवळ पुढे जाणंच माहित असतं. नदी केवळ उताराच्या दिशेने वाहते. सखल भागात नदीचा प्रवाह मंदावत असला तरी त्याचं वाहणं थांबत नाही. प्रवाहाच्या मार्गात आलेले खड्डे भरवून, मगच प्रवाह पुढे जातो. प्रवाहमार्गात दगड गोटे आले तर त्यांच्यामधून बखुबी मार्ग काढीत प्रवाह पुढं वाहत राहतो. अशावेळी वाहणारे पाणी मंजूळ आवाजात जणू आपलं जीवनगाणं गात असतो. मानवी जीवनाचंही तसंच आहे. आपला जीवनप्रवाह पुढे वहात रहायला हवा. त्यासाठी भूतकाळाचं भूत आपण आधी गाडून टाकावं. वर्तमानाची कास धरावी. लढायला सज्ज व्हावं. आयुष्यातले आनंदाचे छोटे छोटे क्षण पकडावेत. त्यांचा मनसोक्त उपभोग घ्यावा. पुढे चालत रहावं. सतत पुढं चालत राहणारं तुमचं हे चालणं; तुम्हाला तुमचं जीवन खूप सुंदर असल्याचा प्रत्यय दिल्याशिवाय राहणार नाही!

सकाळचा सूर्योदय, संध्याकाळचा सूर्यास्त, पाखरांची किलबील, गोठ्यातल्या गाई गुरांचं हंबरणं, चंद्राचा नितळ प्रकाश, शांत आणि शीतल चांदणं, अंग गोठवणारी थंडी. घामेजून टाकणारा घामट उन्हाळा, हे सारं आपण अनुभवायला हवं. त्यातच खरी मजा आहे. दारातली सुबक रांगोळी, देवघरात तेवणारी समई, दूर मंदीरात वाजणारी घंटा आपण एकदा अनुभवायलाच हवी. मग आपली खात्री पटेल की, हे जीवन सुंदर आहे!
आई, वडिल, भाऊ, बहिण, आत्या, मामा, काका, मावशी यांचे प्रेमळ हात आपल्या पाठीवरुन फिरावेत यासाठी आपणही त्यांना प्रेम द्यायला हवं. अडलेल्यांना सोडवा, पिडलेल्यांना मदत करा आणि मग तुम्हीही अनुभवु शकता की, हे जीवन सुंदरआहे!

आणखी एक महत्वाची गोष्ट- आपण जीवंत असतो तेव्हा आपल्या शरीरातील अब्जावधी पेशी त्यांचं ठरलेलं काम अगदी इमाने इतबारे करीत असतात. एखादी व्यक्ती आत्महत्या करते तेव्हा तिच्यासाठी राबणाऱ्या या अब्जावधी पेशींनाच ती मारुन टाकते. केवढे हे क्रौर्य? आणि केवढा हा कृतघ्नपणा? युद्धात सारे सैनिक जीवाची बाजी लावून लढत असताना सेनापतीनेच युद्धभूमीवरुन पळून जावं, अगदी तसं! महाभारतातला अर्जुनही एका क्षणी याच निर्णयावर आला होता. त्यावेळी “गीता” उभी राहीली अन् अर्जून सावरला! ही गीता आपणही समजून घ्यायला हवी बरं का! निराश होणं हेच मूळी पाप आहे! आजवर ज्यांना-ज्यांना हे नीट समजलं, त्यांनी या भूतलावर मोठे मोठे चमत्कार केले आहेत. तुम्हाला ‘यशस्वी’ वाटणाऱ्या अगदी कुणालाही विचारा. त्यांच्याकडून तुम्हाला हेच सांगीतलं जाईल की, “हे जीवन खूप सुंदर आहे!”

लेखक
श्री अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर, संपर्क: ९७६६६६८२९५