अन्तरराष्ट्रीय महिला दिवस
स्त्री शक्तीचा जागर महिला दिवस
स्त्री शक्तीचा जागर करण्यात महिला दिनाचा सर्वात मोठा सहभाग आहे. पहिल्या महिला दिनापासूनच खऱ्या अर्थाने निद्रित स्त्री शक्ती जागृत व्हायला सुरुवात झाली.
प्रा.अरुण सु.पाटील (असु), डोंबिवली
महिला दिवस पार्श्वभूमी
८ मार्च १९०८ रोजी वस्त्रोद्योगातील स्त्री कामगारांनी न्यूयॉर्क येथील रूटगर्स चौकात जमून कामाचे तास व कामाच्या जागी सुरक्षितता याबाबतच्या मागण्यांबरोबरच मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. १९१० साली कोपनहेगन येथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला व तो पासही झाला.
तेव्हापासून महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून पाळण्यात येतो.
भारतात महिला दिनाची सुरुवात
भारतात मुंबईला १९४३ साली ८ मार्च हा महिला दिन म्हणून पहिल्यांदा साजरा झाला. युनोने १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले.
महिला दिन का?
महिला दिवस आवश्यक का?
आज-काल वर्षातला प्रत्येक दिवस कुठला ना कुठला ‘दिन’ म्हणून साजरा केला जातो. अगदी व्हॅलेंटाईन डे पासून रोझ डे, हग डे, किस डे अशी ही यादी लांबत गेल्यास ती कुठल्या स्तराला जाईल याचा विचारच न केलेला बरा. पण आपल्या समाजात महिला दिनासारखे दिन साजरे करण्याची मात्र अत्यंत आवश्यकता आहे.
महिला दिन साजरा केल्याने स्त्रियांचे विविध प्रश्न समाजासमोर प्रकर्षाने आले. स्त्री संघटनांना बळ मिळाले. बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार महिलांचे प्रश्न बदलले, तसे त्यांच्या मागण्यांचे स्वरूपही बदलत गेले. महिला दिनामुळे पुरुष प्रधान समाजात स्त्रियांवर होणार्या अन्याय, अत्याचारांना वाचा फुटली व आपल्या हक्कांसाठी लढण्याचे महिलांना बळ मिळाले.
महिला दिवस आणी पुरुष
प्रथमच स्पष्ट करतो की, ‘महिला दिन’ हा केवळ महिलांनीच पाळू नये तर, खरं म्हणजे तो पुरूषांनी पाळायला पाहिजे. पुरुष दिन कधी आपण पाळतो का? नाही. कारण पुरुषप्रधान समाजरचनेत अजूनही प्रत्येक दिवस पुरुषाचाच असतो. महिलांनी त्यांच्या हक्कासाठी लढणे म्हणजे, पुरुषांकडून आपल्या जन्मसिद्ध हक्कांची मागणी करणे. म्हणजे, जे हक्क पुरुषांनी स्वार्थी नीतिनियम करून स्त्रियांकडून हिरावून घेतलेले आहेत ते त्यांचे स्वतःचे पुरुषांनी बळकावलेले हक्कच त्यांना परत हवे आहेत.
खरं म्हणजे निदान आतातरी पुरुषांनी स्वतःहून हे अधिकार स्त्रियांना द्यायला हवेत. म्हणून मी म्हणतो की, आपण पुरुषांनीच महिला दिन पाळून आतापर्यंत स्त्री जातीवर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन करायला पाहिजे.
महिला दिवस आणी पुरुष समाजसुधारक
महाराष्ट्रात स्त्रीउद्धारासाठी झटणाऱ्या पुरुष समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. त्याचीच फळे आता महाराष्ट्रातील महिलांना मिळत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, न्यायमूर्ती रानडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वगैरे वगैरे. अशी कितीतरी नावं घेता येतील.
या थोर समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांमुळे निदान महाराष्ट्रात तरी आज स्त्रिया बऱ्याच क्षेत्रात पुढे गेलेल्या दिसतात. या थोर पुरुषांनी खऱ्या अर्थाने त्या काळीही महिला दिन खरा अर्थाने साजरा केला. त्यांचा कित्ता आपण आज गिरवला पाहिजे.
स्त्री-पुरुषा समन्वय
पण आज स्त्रियांवर होणारे अत्याचार, बलात्कार, जळीताची प्रकरणे बघता ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी परिस्थिती झालेली आहे. पुरुषांकडून हक्कांची भीक मागण्याऐवजी आता स्त्रियांनी ते त्यांच्याकडून हिसकावून घेण्याची वेळ आली आहे. पण यातील मेख अशी की, हे करतांना पुरुषांना शत्रू समजून त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून चालणार नाही.
भारतमातेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या इंग्रजांना म्हटले तसे ‘चलेज्जाव’ असे पुरुषांना म्हणून चालणार नाही. कारण संसाररुपी गाड्याची स्त्री आणि पुरुष अशी दोन आवश्यक चाके आहेत. दोन्ही चाके सारखीच सामर्थ्यवान असली पाहिजे. म्हणून स्त्रीपुरुषांनी शहाणपणाने समन्वय करणेच योग्य!
अबला’पणाचा हा बागुलबुवा स्त्रियांनी झुगारून घ्यावा
समाजपुरुषाने ‘अबला’ म्हणून जी चुकीची प्रतिमा स्वतःच्या स्वार्थापोटी स्त्रियांच्या मनावर बिंबवली आहे, ते त्यांनी सर्वप्रथम ओळखलं पाहिजे. महिला वर्गाच्या मनात हे वर्षानुवर्षांपासून एवढे भिनले आहे की, त्या स्वतःला खरोखरच अबला मानायला लागल्या.
त्यामुळे त्यांना पुरुषांवर अवलंबून राहायला लागलं व त्यामुळे त्या पुरुषांच्या लंपित झाल्या.’अबला’पणाचा हा बागुलबुवा स्त्रियांनी झुगारून द्यायला पाहिजे.
महिलांनी योनीशुचितेचे भूत झुगारून द्या
अनेक पुरुष असतील तर वेगळी गोष्ट आहे. पण एक पुरुष एका स्त्रीवर बलात्कार करूच कसा शकतो? पुरुषाएवढी शक्ती स्त्रीची पण असतेच. पण योनीशुचितेचे सामाजिक दडपण व बदनामीची भीती यामुळे याप्रसंगी लढण्याआधीच स्त्री पराभूत झालेली असते. म्हणून तिने योनीशुचितेचे भूत झुगारून द्यायला पाहिजे.
समाजानेही आता अशा पुरुष अत्याचार पीडित स्त्रियांबाबत उदार धोरण स्वीकारायला हवे. स्त्रियांनी आता असा काही कालीचा रौद्र अवतार धारण करायला हवा की, त्या रुपाकडे पाहूनच अशा राक्षसांचा वीर्यपात व्हायला हवा. स्त्रियांनी हेही लक्षात ठेवावे की, बलात्कारित स्त्रीसाठी हजारोंच्या संख्येने कँडल मार्चमध्ये सामील होणाऱ्यांपैकी प्रत्यक्षात अशी घटना समोर घडत असतांना एकही जण पुढे येत नाही.
कुणी श्रीकृष्ण असे वस्त्रहरण थांबवण्यासाठी पाठीराखा म्हणून धावून येणार नाही. त्यांनी स्वतःच श्रीकृष्ण बनून हाती सुदर्शन चक्र घेऊन या पाप्यांचे निर्दालन करायला हवे.
महिलांना त्यांच्या हक्काचे भान हवे
महिला दिनाच्या निमित्ताने का होईना, स्त्रियांना त्यांच्या हक्काचे भान आले आहे. विविध क्षेत्रात आज पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया कार्यरत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे, डॉ.माधुरी कानिटकर यांची सैन्यात लेफ्टनंट जनरलपदी झालेली नेमणूक.
स्त्री म्हणजे भोगदासी नाही
तरीही ‘स्त्री म्हणजे भोगदासी’ ही पुरुषांच्या मनातील तिची प्रतिमा अजून काही कमी होत नाही. स्त्रीचं शरीर तिनं कसं वापरावं किंवा कसा वापर करू द्यावा हा तिचा सर्वस्वी वैयक्तिक अधिकार आहे. बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःचं शरीर कुणाला वापरण्यास नकार देण्याचा अधिकार स्त्रीला आहे.
व्यभिचाराची व्याख्या आता बदलली पाहिजे. विवाहबाह्य संबंध म्हणजे व्यभिचार समजला जायचा. पण आता कोणत्याही सज्ञान स्त्री-पुरुषांनी परस्पर संमतीने केलेला शरीरसंबंधाला व्यभिचार म्हणता येणार नाही. किंबहुना परिस्थितीच अशी आहे की, आपल्याला हे मान्यच करावे लागेल.
शिक्षणानिमित्त नोकरीधंद्यानिमित्त स्त्री-पुरुष एकत्र येतात. घरापासून, देशापासून दूर राहून एकेकट्याने जीवन जगतात. अशावेळी किती आईबाप आपला मुलगा वा मुलगी कुंवार वा कुंवारी आहेत याची खात्री देऊ शकतील? जे टाळणे आपल्या हातात नाही ते नाकारण्यात काय अर्थ!
‘लिव्ह इन रिलेशनशिप’ आता आपण जवळजवळ स्वीकारलीच आहे. संस्कार करणं फक्त आता पालकांच्या हातात आहे. बाकी मुलांवर विश्वास ठेवून सर्व त्यांच्यावर सोडावं. खरं तर, पालकांना याशिवाय पर्यायच नाही. बदलत्या परिस्थितीनुसार आता स्त्रियासुद्धा असे अधिकार मागायला लागतीलच.
समाजाला ते मान्य करणं भाग आहे. पुरुषांना असे अधिकार मागण्याची जरूरच नाही. कारण अशी अलिखित सूट समाजाने त्यांना आधीच दिलेली आहे. आजही पुरुषांनी काहीही केले तरी चालते पण स्त्रियांनी मात्र संस्कृती रक्षणासाठी योनीशुचिता सांभाळली पाहिजे, हा दुटप्पीपणा नाहीसा होईल ते खरे महिला दिनाचे फलित असेल.

हक्कांसाठी लढतांना स्त्रियांनी लक्षात ठेवावयाच्या बाबी
आपण बघितले की, आता स्त्रियासुद्धा बदलत्या परिस्थितीनुसार त्यांच्या चांगल्या किंवा वाईट हक्कासाठी जागरूक झालेल्या आहेत. जो न्याय पुरुषांना तोच न्याय स्त्रियांना लागू झाला पाहिजे. समान हक्कांसाठी लढण्याचे भान त्यांना महिला दिनाने दिलेले आहे.
अर्थात पुरुष काही स्वतःहून त्यांना सहजासहजी मानसन्मान किंवा समान हक्क देणार नाहीत. आणि त्यासाठीच बळ मिळावे, एकजूट व्हावी म्हणून त्या लढ्याच्या दिवसाची आठवण म्हणून महिला दिन साजरा करायला हवा. पण तो साजरा करतानाच स्त्रियांनी खालील गोष्टी लक्षात घ्यायला हव्या.
महिला दिवस साजरा करतानां
१) स्त्री-स्वातंत्र्याचा पुकार म्हणजेच महिला दिन. पण त्याचबरोबर स्त्रियांनी हेही लक्षात ठेवावं की, स्त्रीस्वातंत्र्य म्हणजे स्त्री स्वैराचार नव्हे.
२) ज्याच्याविरुद्ध आपण ही लढाई लढत आहोत तो काही आपला शत्रू नाही तर वाट चुकलेल्याला खरा मार्ग दाखवून देण्यासाठी ही लढाई आहे. शेवटी स्त्री-पुरुष दोघांचंही एकमेकांशिवाय जगणं अपूर्णच आहे.
३) सर्वच पुरुष वाईट नसतात तसेच सर्वच पुरुष चांगलेही नसतात. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये बहुदा जवळच्याच व्यक्ती असतात. बलात्कारी पुरुषाला चेहरा नसतो. असते फक्त पिसाट लिंग! त्यामुळे स्वसंरक्षण हा अशा लिंगपिसाटांपासून वाचण्याचा उत्तम मार्ग. त्यासाठी स्त्रियांनी कराटे सारखे स्वसंरक्षणाचे मार्ग शिकून घ्यायला हवेत. स्वसंरक्षणासाठी आवश्यक आयुधं नेहमीच पर्समध्ये ठेवायला हवीत. व प्रसंगी लढण्याची मानसिकता ठेवावी.
४) एकाकी जागी म्हणजे, कमी वर्दळ असलेल्या जागी जाण्याचे टाळावे. रात्री एकटीने फार उशीरा फिरू नये. रात्र भुतांची असते, असं म्हणतात. प्रसंगी आरडाओरडा करून लोकांचे लक्ष आकर्षित करून घ्यावे.
५) स्त्रियांनी कपडे कसे वापरावे हे त्यांचे स्वातंत्र्य असले तरी, पुरुषी वृत्तीचा विचार करता अतिशय तोकडे कपडे वापरायचे टाळणे उत्तम. अन्यथा त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत हवी. थोडक्यात, विष पचवण्याची हिंमत असेल तरच विषाची परीक्षा बघावी. उगाच तात्विक वाद घालून व्यावहारिक प्रश्न सुटत नसतात.
महिला दिनाची सुरुवात आपल्या पाषाण
महिला दिनाची सुरवात आपल्या पासुनच
महिला दिनाची सुरुवात आपण स्वतःच्या घरापासूनच करायला हवी. या दिवसाच्या निमित्ताने तरी घरातल्या सर्व पुरुष मंडळींनी शपथ घ्यायला हवी की, ‘मी समस्त स्त्रीवर्गाचा मान-मरातब राखीन व त्याची सुरुवात घरापासून करीन.’ घरातल्या मोठ्यांनीच घरातल्या स्त्रियांना मान दिल्यास लहान मुलांवर आपोआप तसे संस्कार होतील.
त्यामुळे, अत्याचाराच्या घटना थोड्या तरी कमी होतील. ज्या सध्या फाशीच्या शिक्षेमुळे सुद्धा कमी होत नाहीत. तसेच,’अशीच अमुची आई असती सुंदर रुपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती’ असे चारित्र्यसंपन्न सुपुत्र घडविणाऱ्या जिजाऊ माता घरोघरी असतील तर स्त्रियांचे बरेच प्रश्न सुटतील.
महिला दिन एक युद्धच
महिला दिन साजरा करणे म्हणजे, एक युद्धच आहे, पुरुषांच्या विरुद्ध! लढण्यासाठी योद्ध्याच्या एका हातात तलवार असली तरी स्वसंरक्षणासाठी दुसऱ्या हातात ढाल असतेच! महिला दिनानिमित्त हक्कांसाठी लढण्याचा संकल्प करतानांच स्वतःच्या संरक्षणासाठी वरीलप्रमाणे काळजी घेण्याचा संकल्पही करावा.
त्यासाठी सर्व महिलांनी स्वतःची मानसिक व शारीरिक तयारी करावी. तरच खऱ्या अर्थाने महिलादिन साजरा होईल.
प्रा.अरुण सु.पाटील (असु), डोंबिवली
Artificial intelligence आर्टिफिशियल इन्टेलिजन्स समोर आपला निभाव लागेल का?
4 thoughts on “महिला दिवस स्त्री शक्तीचा जागर”